आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२३ मे, दिवस १४३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ४०१ ते ४२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १७०५ ते १७१६
“२३ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २३ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २३ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १७०५ ते १७१६ चे पारायण आपण करणार आहोत.
२३ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ४०१ ते ४२५,
401-11
मागा थोडिया बहुवा उपपत्ती । येणे सांगितलिया विभूती । तैसा नसेचि मा पुढती । बैसलो पुसो ॥401॥
पूर्वी थोड्याबहुत युक्तीने भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या, त्या ऐकून तसाच मी राहिलो नाही आणि पुनः पुढे विश्वरूपदर्शनाविषयी विचारू लागलो.
402-11
म्हणौनि भोग्य ते त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके । माझ्या कपाळी पिटावे लोके । ते लोटेल काह्या ॥402॥
म्हणून प्रारब्धभोग चुकत नाही म्हणतात, ते त्रिवार सत्य आहे आणि प्रारब्धानुसार जे होणार असेल, त्याप्रमाणेच बुध्दि होते. लोकांनी माझ्या नावाने रडावे, असे माझ्या कपाळी होते, ते चुकले कसे ?
403-11
पूर्वी अमृतही हाता आले । परी देव नसतीचि उगले । मग काळकूट उठविले । शेवटी जैसे ॥403॥
पूर्वी समुद्रमंथन करता करता अमृत हाती लागले; पण त्यातच संतोष मानून देव मंथन सोडून उगे राहिले नाहीत, शेवटी हलाहल विष समुद्रातून निघाले.
404-11
परी ते एकबगी थोडे । केलिया प्रतिकारामाजिवडे । आणि तिये अवसरीचे ते सांकडे । निस्तरविले शंभू ॥404॥
क्षीराब्धीने केलेल्या चौदा रत्नांच्या अविष्कारामध्ये काळकूटाचा अविष्कार एका परीने थोडा होता आणि त्यावेळचे संकट भगवान शंकरांनी निवारण केले.
405-11
आता हा जळता वारा के वेटाळे ? । कोणा हे विषा भरले गगन गिळे ? । महाकाळेसि के खेळे ? । आंगवत असे ॥405॥
आताचा हा पेटलेला वारा कसा आवरला जाणार ? हे संपूर्ण विषाने भरलेले आकाश कोण गिळणार ? या महामृत्यूशी खेळण्याचे सामर्थ्य कोण अंगी वागवितो ?
406-11
ऐसा अर्जुन दुःखे शिणतु । शोचित असे जिवाआंतु । परी न देखे तो प्रस्तुतु । अभिप्राय देवाचा ॥406॥
याप्रमाणे अर्जुन, दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन, अंतःकरणात शोक करू लागला; पण भगवंताच्या विश्वरूपदर्शनाचा प्रस्तुत हेतु काय आहे, हे तो जाणत नव्हता.
407-11
जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेटाळिला होता मोहे बहुते । तो फेडावयालागी अनंते । हे दाखविले निज ॥407॥
मी मरणार व कौरव माझ्याकडून मारले जाणारे, अशा थोर अविवेकाने तो ग्रासला गेला होता. तो अविवेक नाहीसा करण्याकरिता भगवंतांनी आपले हे विश्वरूप दाखविले.
408-11
अरे कोण्ही कोणाते न मारी । एथ मीचि हो सर्व संहारी । हे विश्वरूपव्याजे हरी । प्रकटित असे ॥408॥
अरे ! कोणी कोणाचा नाश करित नाही. एक मीच सर्वाचा नाश करणारा आहे, हेच भगवंतांनी विश्वरूपाच्या मिषाने स्पष्ट दाखविले.
जगांतील प्राण्यांच्या उत्पत्तिस्थितिसंहाराचा व्यापार, जीवांच्या कर्मानुसार एक परमेश्वरच करीत असतो; उत्पत्तिस्थितिलयाशी संबंधित असलेले पदार्थ केवळ निमित्तमात्र असतात, असा वेदान्ताचा सिध्दात आहे.
409-11
परी वायाचि व्याकुलता । ते न चोजवेचि पंडुसुता । मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥409॥
पण अर्जुन हे न जाणता दुःखाने व्याकुळ होऊन नसताच थरकांप वाढवित होता.
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति
दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु
संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः । 11. 27 ।
अर्थ त्वरा करणारे हे (अगोदर) भयानक व दाढांच्या येगाने (अधिक) भयानक अशा तुझ्या मुखांमधे शिरत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांमधे अडकलेले दिसतात. ॥27॥
410-11
तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेसि दोन्ही दळे । वदनी गेली आभाळे । गगनी का जैसी ॥410॥
त्यावेळेला अर्जुन पुनः म्हणाला, अहो देवा ! पहा ! आकाशात जसे मेघ नाहीसे होतात, त्याप्रमाणे आंगावरील चिलखते व हातातील तलवारीसह दोन्हीकडील सैन्ये एकाचवेळी तोंडात गेली आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-11
का महाकल्पाचिया शेवटी । जै कृतांतु कोपला होय सृष्टी । तै एकविसांही स्वर्गा मिठी । पाताळासकट दे ॥411
किंवा महाकल्पाच्या शेवटी संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याकरिता जेव्हा कृतांत सर्व सृष्टिवर क्रुध्द होतो, तेव्हा तो पाताळासह एकवीस स्वर्गांना ग्रासून टाकतो.
412-11
नातरी उदासीने दैवे । संचकाची वैभवे । जेथीची तेथ स्वभावे । विलया जाती ॥412॥
अथवा दैव प्रतिकूल झाले असता, धनसंचय करणार्याची संपत्ति, जशी जागच्या जागी नाहीशी होते.
413-11
तैसी सासिन्नली सैन्ये एकवटे । इये मुखी जाहली प्रविष्टे । परी एकही तोंडौनि न सुटे । कैसे कर्म देखा ॥413॥
त्याप्रमाणे युध्दाला सज्ज झालेली ही दोन्ही सैन्यै, तुझ्या मुखात एकत्र शिरली आहेत. त्यापैकी तुझ्या मुखातून एकहि सुटत नाही. कसे त्यांचे कर्म आहें, पहा.
414-11
अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसे । लोक वक्त्रामाजी तैसे । वाया गेले ॥414॥
उंटाने अशोकवृक्षाचे डहाळे जसे चघळावे, त्याप्रमाणे सर्व लोक तुझ्या तोंडात व्यर्थ गेले आहेत.
415-11
परि सिसाळे मुकुटेसी । पडिली दाढांचे सांडसी । पीठ होत कैसी । दिसत आहाती ॥415॥
राजांची मुकुटासहित शिरे दाढांच्या सांडशीत सांपडून त्यांचे कसे पीठ होतांना दिसत आहे.
416-11
तिये रत्ने दांताचिये सवडी । कूट लागले जिभेच्या बुडी । काही काही आगरडी । द्रंष्ट्रांची माखली ॥416॥
मुकुटांतील रत्ने दातांच्या संधीत असून, मस्तकांचे चूर्ण जिभेच्या बुडाशी लागले आहे व काही काही दाढांची टोकेंही माखली आहेत.
417-11
हो का जे विश्वरूपे काळे । ग्रासिली लोकांची शरीरे बळे । परि जीवित्व देहीची सिसाळे । अवश्य की राखिली ॥417॥
हो ! एक गोष्ट मात्र दिसते की, या विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळ ग्रासून टाकली; पण त्या जीवांच्या शरीरांची मस्तके मात्र न गिळता तशींच ठेवलीं.
418-11
तैसी शरीरामाजी चोखडी । इये उत्तमांगे होती फुडी । म्हणौनि महाकाळाचियाही तोंडी । परि उरली शेखी ॥418॥
ही सुंदर मस्तके म्हणजे शरीरांतील खरोखर उत्तम अंगे असल्यामुळे, ती महाकिळाच्याही तोंडात शेवटी उरली आहेत.
419-11
मग म्हणे हे काई । जन्मलया आन मोहरचि नाही । जग आपैसेचि वदनडोही । संचारताहे ॥419॥
पुढे अर्जुन म्हणतो, अरे ! हे काय आश्चर्य ! जन्माला आलेल्या प्राण्यांला दुसरी गतिच दिसत नाही. सर्व जगत् आपण होऊन विश्वरूपाच्या मुखरूपी डोहांत शिरत आहे ना !
420-11
यया आपेआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटी । आणि हा जेथिचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥420॥
ह्या संपूर्ण सृष्टी सहजगत्या विश्वरूपाच्या मुखात जाण्याच्या मार्गास लागल्या आहेत आणि हा विश्वरूप भगवान जागच्या जागींच स्वस्थ त्यांना गिळीत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-11
ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजी धावत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनी ॥421॥
हे सर्व ब्रह्मादिकदेव वर असलेल्या मुखा मध्ये वेगाने शिरत असून, बाकीचे सर्व सामान्य लोक हे अलीकडील मुखातच भरले जात आहेत.
422-11
आणीकही भूतजात । ते उपजलेचि ठायी ग्रासित । परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि काही ॥422॥
आणि कित्येक प्राणीजात उत्पन्न झाल्याबरोबर ग्रासले जात आहेत; पण याच्या मुखातून निश्चित काही सुटत नाही.
(येथे प्राण्यांच्या तीन गती दाखविल्या आहेत. ब्रह्मादिक देवांना उंचलोक म्हणजे सत्यलोक प्राप्त होतो. सामान्य म्हणजे भगवत्प्रीत्यर्थ निष्काम चित्ताने विहित कर्माचे अनुष्ठान न करता स्वर्गादी लोकांच्या प्राप्तीकरिता कर्म करणारे जे पुरुष असतात, त्यांना चंद्रलोकप्राप्ती होऊन, ते तेथे सुख भोगून परत संसारात येतात व अत्यंत पातकी लोक, सुख भोगण्याकरिता कोणत्याही लोकात न जाता जन्मानंतर मरण व मरणानंतर जन्म असे केवळ दुःखच भोगत असतात. )
यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति । 11-28 ।
अर्थ ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून गमन करत असतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या मुखामधे हे नरांमधील वीर प्रवेश करत आहेत. ॥11-28॥
423-11
जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचे आंग । तैसे आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखी ॥423॥
जसे महानदीचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात, तशी सर्व बाजूंनी ही सृष्टी तुझ्या मुखात प्रविष्ट होत आहे.
424-11
आयुष्यपंथे प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी । वेगे वक्त्रामिळणी । साधिजत आहाती ॥424॥
सर्व प्राणी समुदाय, आपल्या आयुष्यरूपी मार्गाने दिवस व रात्र यांच्या पायर्या करून अत्यंत त्वरेने तुझ्या मुखात पडण्याचे साधीत आहेत.
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति लोका-
स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः11. 29 ।
अर्थ अत्यंत वेगाने युक्त होत्साते पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वत:च्या नाशाकरताच प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे प्राणी अत्यंत वेगाने युक्त होत्साते (स्वत:च्या) नाशासाठीच तुझ्या मुखांमधे प्रवेश करत आहेत. ॥29॥
425-11
जळतया गिरीच्या गवखा । माजी घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनी पडती ॥425॥
पेटलेल्या पर्वताच्या दरीत ज्याप्रमाणे पतंगाच्या झुंडीच्या झुंडी जाऊन पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या मुखात पडत आहेत.
दिवस १४३ वा, २३, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १७०५ ते १७१६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १७०५
सुखे न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचे कोण ॥१॥
हे का ठायीचे न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥धृपद॥
चालोनि आड वाटे । पायी मोडविले काटे ॥२॥
तुका म्हणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥३॥
अर्थ
अहो एखाद्याला स्वतःचे अवगुण समजतच नाहीत मग त्या अवगुणा पासून होणारे दुःख कोणाला भोगावे लागेल अर्थातच त्याचे त्यालाच भोगावे लागेल. हे तुम्हाला माहीत नाही की काय, मग उगाचच डोळे झाकून तुम्ही रात्र का करता ? विनाकारण आडवाटेने जर गेले तर त्याने काय होईल तर जो आडवाटेने जाईल त्याच्याच पायात काटे मोडतील. तुकाराम महाराज म्हणतात शहाणा मनुष्य आपल्या अवगुणामुळे होणाऱ्या दुखाःला इतर कोणालाही दोषी ठरवतो काय ?
अभंग क्र. १७०६
आम्ही न देखो अवगुणा । पापी पवित्र शाहाणा ॥१॥
अवघी रूपे तुझी देवा । वंदू भावे करू सेवा ॥धृपद॥
मज मुक्ती सवे चाड । नेणे पाषाण धातु वाड ॥२॥
तुका म्हणे घोटी । विष अमृत तुजसाठी ॥३॥
अर्थ
या विश्वामध्ये कसाही मनुष्य असो मग तो पापी असो, पवित्र असो किंवा शहाणा असो मी त्याचे अवगुण पहातच नाही. देवा हे सर्व तुझेच रुपे आहेत हेच आम्ही समजू व त्यांना भक्तिभावाने वंदन करू आणि त्यांची सेवा देखील करू. मला फक्त भक्तीची आवड आहे मग ते कोणीही असो पाषाण असो धातू असो किंवा लहान-मोठे असो मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आणि त्याची मला आवडही नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या भक्ती करिता मी विष देखील अमृताप्रमाणे समजून ते सेवन करीन.
अभंग क्र. १७०७
मज नाही तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेता वाटे गोड नाम तुझे ॥१॥
नेणते लेकरू आवडीचे तान्हे । बोलतो वचने आवडीने ॥धृपद॥
भक्ती नेणे काही वैराग्य ते नाही । घातला विठाई भार तुज ॥२॥
तुका म्हणे नाचे निर्लज्ज होऊनि । नाही माझे मनी दुजा भाव ॥३॥
अर्थ
देवा मला तुझ्या ज्ञानाची अजिबात आवड नाही केवळ तुझे नाम जरी माझ्या मुखाने घेतले तरी माझ्या जीवाला खूप सुख वाटते. देवा मी तुझा अज्ञान आणि आवडीचे तान्हे बाळ, लेकरू आहे त्यामुळे मी तुझ्याशी आवडीने बोलत आहे. हे विठाई मी भक्ती आणि वैराग्य हे काहीच जाणत नाही परंतु मी माझ्या सर्व योगक्षेमाचा भार तुझ्यावर घातला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझ्या नामाच्या छंदात निर्लज्ज होऊन नाचत आहे तुझ्या वाचून इतर कोणा विषयही माझा भक्तीभाव नाही व मला लोक पर्वा देखील नाही.
अभंग क्र. १७०८
काय माझे संत पाहती जाणीव । सर्व माझा भाव त्यांचे पायी ॥१॥
कारण सरते करा पांडुरंगी । भूषणाची जगी काय चाड ॥धृपद॥
बोबडा उत्तरी म्हणे हरीहरी । आणीक भीकारी नेणे दुजे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास । करितो मी आस उच्छिष्टाची ॥३॥
अर्थ
संत माझे ज्ञान तपासणार आहेत काय आणि पाहिले तरी काही हरकत नाही पण माझा पूर्ण भक्तिभाव त्यांच्या ठिकाणी आहे. हे संत जन हो पांडुरंगाने माझा स्वीकार केला पाहिजे यासाठी तुम्ही काहीतरी करा, मला जगामध्ये माझे भूषण व्हावे याची इच्छा अजिबात नाही. मी तर भिकारी आहे मला काहीच येत नाही केवळ माझ्या बोबड्या बोला ने हरी हरी असे मी म्हणतो एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो तुम्ही विठ्ठलाचे दास आहात त्यामुळे मी तुमचे उच्चिष्ट सेवन करण्याची इच्छा धरत आहे.
अभंग क्र. १७०९
जीवाचे जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण ॥१॥
सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥धृपद॥
गोडाचे ही गोड हर्षाचे ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥२॥
भावाचा निज भाव नावाचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥३॥
तुका म्हणे जे हे साराचे हे सार । माझा अंगीकार तेणे केला ॥४॥
अर्थ
नारायण जीवाचे जीवन आहे अमृताचे स्वरूप आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे भूषण आहे. नारायणाचा संग सुखकारक आहे आणि तो काळाचाही काळ आहे आणि भक्तांचे निजस्थन आहे. नारायण गोडाचे ही गोड आहे म्हणजे गोडालाही गोड पण देणारा आहे आनंदाचे ही लाड पुरविणार आहे आणि प्रीतीचे ही लाड पुरवतो आहे. हा पंढरीराव भक्तीभावाचा ही निजरूप आहे सर्व नावाचे अधिष्ठान देखील हाच आहे असा हा सर्वत्र अवतरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात नारायण सर्व साराचे ही सार आहे व त्या नारायणनेच माझा अंगिकार केला आहे.
अभंग क्र. १७१०
आता मी सर्वथा नव्हे गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥
माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयता पक्ष दोन्ही ॥धृपद॥
बापुडा मी नव्हे दुर्बळ ठेंगणा । पागिला हा कोणा आणिकासी ॥२॥
दृष्ट नव्हो आम्ही अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥
संवसार आम्हा सरला सकळ । लपोनिया काळ ठेला धाके ॥४॥
तुका म्हणे जालो निर्भर मानसी । जोडलिया रासी सुखाचिया ॥५॥
अर्थ
आता मी कुठल्याही प्रकारे यातीहीन दिनहीन आणि कुळहीन नाही कारण माझी माता रखुमाई व पिता पांडुरंग आहे. अशाप्रकारे माझी माता पिता दोन्ही पक्ष शुद्ध आहेत म्हणून मीही शुद्ध आहे. मी आता वेडा, दुर्बळ, नकटा किंवा कोणाच्याही आधीन नाही. आता मी कोणत्याही प्रकारे दृष्ट, अभागी, आनाथ नाही कारण आमचा कैवारी हा सर्व समर्थ पंढरीचा राणा आहे. आता आम्ही सर्व संसार जिंकला आहे आमच्या भीतीने काळ देखील लपून बसला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही मनात तृप्त होऊन निर्भर झालो आहोत म्हणजे आनंदित झालो आहोत कारण आम्हाला सुखाच्या राशी जोडल्या गेले आहेत.
अभंग क्र. १७११
केले नाही मनी तया घडे त्याग । उबगे उद्वेग नाही चित्ती ॥१॥
देवचि हा जाणे अंतरीचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥धृपद॥
त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी । अवघी ते परी विटंबना ॥२॥
तुका म्हणे आपआपणा विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हा ॥३॥
अर्थ
जो म्हणतो की मी काहीच केले नाही आणि सर्वस्वाचा त्याग ही जो करतो. व त्याच्या चित्तामध्ये प्रपंच याविषयी दुख नसते त्याचाच खरा त्याग घडतो. अंतःकरणातील त्यागाची वृत्ती केवळ देवच जाणत असतो आणि बाह्य रंगाने त्याग करण्याचे दाखविणे हे व्यर्थ आहे. एखाद्या विषया विषयी त्याग केला व त्याचे ध्यान तसेच अंतकरणात असेल तर तो त्याग होत नाही ती केवळ त्यागाची विटंबना आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याग करण्याविषयी तुम्ही स्वतःच स्वतःला विचारून पहा दुसरे कोण तुम्हाला सांगेन ?
अभंग क्र. १७१२
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाईजे एकांती । अलभ्य ते येती लाभ घरा ॥धृपद॥
आणीका अंतरी निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥
तुका म्हणे बाण हाचि निर्वाणीचा । वाउगी हे वाचा वेचू नये ॥३॥
अर्थ
आपले हित व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर दंभ दूर ठेवा आणि आपले चित्त शुद्ध करून देवाची सेवा करा. एकांती बसून आवडीने विठ्ठलाचे भजन करा त्यामुळे अलभ्य लाभ तुमच्या घरी स्वतःहून चालत येतील. हरी वाचून इतर कोणत्याही विषयाला अंतकरणात स्थान देऊ नका व वासनेचा नाश करा. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे नाम हा एकच निर्वाणीचा बाण आहे जो आपल्याला या संसारापासून दूर करू शकतो आणि संसाराला जिंकू शकतो त्यामुळे हरी वाचून इतर काहीच बोलू नये.
अभंग क्र. १७१३
हो का नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरी ॥१॥
ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥धृपद॥
ज्याचे अंतर निर्मळ । त्याचे सबाह्य कोमळ ॥२॥
त्यांचा संग सर्वकाळ । घडो मज हे मंगळ ॥३॥
तुका म्हणे प्राण । काया कुरवंडी करीन ॥३॥
अर्थ
नर असो अथवा नारी असो ज्यांचा आवडता हरी आहे, ते लोक मला विठोबा समान आहेत त्यांना मी आवडीने नमस्कार करीन. ज्यांचे अंतकरण निर्मळ आहे त्यांचे बाह्य शरीर देखील कोमल असते निर्मळ असते. त्यांचा संघ मला सदासर्वकाळ घडू व हेच मंगल आहे असे मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अशा नर अथवा नारी वरून मी माझे शरीर ओवाळून टाकीन.
अभंग क्र. १७१४
हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणता तया वेळ लागे ।
मनुष्यदेही तया नाट लागले । अघोर साधिले कुंभपाक ॥१॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत का होऊन पडिला नाही ।
उपजे मरोनि वेळोवेळा भांड । परि न धरी लंड लाज काही ॥धृपद॥
ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाही घातली मुखावरी ।
देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥
राम म्हणता तुझे काय वेचेल । का हित आपुले न विचारिसी ।
जन्मोजन्मींचा होईल नरकी । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥३॥
अर्थ
ज्याला हरीकथाच आवडत नाही त्याला अधम म्हणण्यास देखील वेळ लागतो इतका तो अदम असतो. अशा मनुष्याला मनुष्यदेह मिळाला खरा परंतु तो सुद्धा त्याला नाटच ठरला आणि त्याला अखेरीस कुंभीपाका सारखा नरकच प्राप्त झाला. असा दगड जन्मालाच का आला असेल बरे जंत होऊन घाणीत का बरं नाही कुठेतरी तो पडला. असा हा निर्लज्ज मनुष्य किती वेळा जन्माला येतो आणि किती वेळा मरतो तरीदेखील त्याला लाज कशी नाही. अशा माणसाला त्याची आई का बरे प्रसवली असेल तो जन्मताच त्याच्या तोंडावर त्याच्या आईने वार घालून त्याला का बर मारले नसेल ? असा चांडाळ देव मानत नाही, धर्म मानत नाही अशा चांडाळाचा याचा भार पृथ्वीला देखील सहन करता येत नाही. अरे मुखाने नुसते राम राम जरी म्हटले तरी तुझे काही खर्च होणार आहे काय अरे तुला तुझो हीत कसे समजत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात जर असा मनुष्य देवाला, धर्माचाराला चुकत असेल तर तो केवळ जन्मोजन्मी नरकवास भोगेल.
अभंग क्र. १७१५
उपेक्षिला येणे कोणी शरणागत । ऐसी नाही मात आईकिली ॥१॥
आता काय ब्रीद सांडील आपुले । ठायीचे धरिले जाणोनिया ॥धृपद॥
माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥
तुका म्हणे रूप आमुच्या कैवारे । धरिले गोजिरे चतुर्भुज ॥३॥
अर्थ
हरीने त्याला शरण आलेल्या भक्तांची उपेक्षा केली आहे अशी वार्ता मी तरी आजपर्यंत ऐकले नाही. मग हरी आपले दिन वत्सल हे ब्रीद सोडून देईल काय, त्याने आपले ब्रीद सर्व गोष्टी जाणूनच धारण केलेले आहे. माझा असा काय दोष आहे की जेणेकरून देव मला पाठमोरा होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरीने गोजिरे चतुर्भूज रूप केवळ आम्हा भक्ता करिता धारण केले आहे.
अभंग क्र. १७१६
आवडीसारिखे संपादिले सोंग । अनंत हे मग जाले नाम ॥१॥
कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥धृपद॥
हाते जेवी एक मुखी मागे घास । माउली जयास तैसी बाळा ॥२॥
तुका म्हणे माझे ध्यान विटेंवरी । तैसीच गोजिरी दिसे मूर्ती ॥३॥
अर्थ
देवाने भक्तांच्या आवडीप्रमाणे अनेक अवतार म्हणजे सोंगे घेऊन त्याची संपादने ही केली आहे व त्याला त्याप्रमाणे अनेक नावेही प्राप्त झालीत. देवाचे ज्ञान भक्तांना व्हावे याकरिता जसा सोपा मार्ग असेल तसे भक्त देवाकडे गेले कारण तो आकाशाचा ही साक्षी आहे आणि कळण्यास ही अतिशय अवघड आहे. दोन मुलांना आई वेगवेगळ्या प्रकारचे वागणूक देते कारण जसे मुल असते तसे वागावे लागते म्हणजे एका मुलाला स्वतःच्या हाताने खाऊ घालते कारण तो ऐकत नाही तर दुसरा आपल्या हाताने स्वतः खातो. तुकाराम महाराज म्हणतात हरीची मूर्ती जी विटेवर समचरण ठेवून उभी आहे तीच मूर्ती ध्यान करताना माझ्या चित्तात असते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















