आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१८ एप्रिल, दिवस १०८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ३७६ ते ४०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १२८५ ते १२९६
“१८ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १८ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १८ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१८ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ३७६ ते ४००,
376-9
ऐसे जियेचिया जवळिका । सामर्थ्य घरीचिया पाइका । ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥376॥
असे जिच्या घरातील दासींचे सामर्थ्य आहे, त्या पट्टराणी श्रीलक्ष्मीचीहीया ठिकाणी प्रतिष्ठा नाही.
377-9
मग सर्वस्वे करुनि सेवा । अभिमान सांडूनि पांडवा । ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली ॥377॥
मग अर्जुना, मनोभावाने सेवा करून व सर्व अभिमान टाकून ती पाय घुण्याच्या अधिकारास पात्र झाली ! म्हणून,
378-9
म्हणोनि थोरपण पऱ्हाचि सांडिजे । व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जै जगा धाकुटे होइजे । तै जवळीक माझी 378॥
म्हणून, थोरपणा एकीकडे ठेवून व सर्व शास्त्रीय ज्ञान विसरून जेंव्हा जगतांत नम्रपणाने वागावे, तेव्हांच माझी प्राप्ति होते. हे किरीटी, ज्या ठिकाणी सुर्याचे तेजापुढे चंद्रही लोपून जातो,
379-9
अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढा चंद्रही लोपे किरीटी । तेथ खद्योत का हुटहुटी । आपुलेनि तेजे ॥379॥
हे किरीटी, ज्या ठिकाणी सुर्याचे ते जापुढे चंद्रही लोपून जातो, तेथे काजव्याने आपल्या तेजाबद्दल का घमेंड मारावी ?
380-9
तैसे लक्ष्मियेचे थोरपण न सरे । जेथ शंभूचेही तप न पुरे । तेथ येर प्राकृत हेंदरे । केवि जाणो लाहे ॥380॥
त्याचप्रमाणे, लक्ष्मीचेही ऐश्वर्य जेथे शोभत नाही, व शंभूचे तपही पुरत नाही, त्या ठिकाणी अज्ञानी व हेंदरा मला कसा जाणू शकेल ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-9
यालागी शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचे लोण उतरिजे । संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करुनी ॥381॥
याकरिता, सर्व अभियान टाकून, सर्व गुणांचे लिंबलोण उतरून, आणि संपत्तीचा मद सोडून आपला देह मजवरून ओवाळून टाकला पाहिजे.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥9. 26॥
382-9
मग निस्सीमभाव उल्हासे । मज अर्पावयाचेनि मिसे । फळ एक आवडे तैसे । भलतयाचे हो ॥382॥
नंतर, दृढ भक्तीने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने, हव्या त्या झाडाचे हवे ते फळ
383-9
भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्ही हात वोडवी । मग देठु न फेडिता सेवी । आदरेसी ॥383॥
भक्ताने माझ्या पुढे केले म्हणजे मी ते दोन्ही हात पुढे करून घेतो, व त्याचा देंठ न तोडता ते आदराने सेवन करतो.
384-9
पै गा भक्तीचेनि नांवे । फूल एक मज द्यावे । ते लेखे तरि म्या तुरंबावे । परि मुखीचि घाली ॥384॥
हे पहा, भक्तिभावाने जर मला कोणी एखादे फूल दिले, तर वास्तविक पाहता ते हुंगावयाचे; पण ते सोडून देऊनप्रेमाच्या भरांत मी तोंडातच घालतो ! फार काय सांगावे ?
386-9
हे असो कायसी फुले । पानचि एक आवडे ते जाहले । ते साजुकही न हो सुकले । भलतैसे ॥385॥
फुलेचशी काय, परंतु मला एका झाडाचे पानही प्रिय आहे; मग ते कोणत्याही झाडाचे आणि ताजे किंवा सुकलेले कसेही असो,
386-9
परि सर्वभावे भरले देखे । आणि भुकेला अमृते तोखे । तैसे पत्रचि परि तेणे सुखे । आरोगू लागे ॥386॥
पण ते भक्तिभावाने अर्पण केलेले आहे असे पाहतांच, ज्याप्रमाणे एखादा क्षुधित मनुष्य अमृताने तृप्त होतो, त्याप्रमाणे भक्तिभावाने अर्पण केलेले ते पान अमृततुल्य मानुन मी खाऊ लागतो.
387-9
अथवा ऐसेही एक घडे । जे पालाही परि न जोडे । तरि उदकाचे तव सांकडे । नव्हेल की ॥387॥
अथवा एखाद्या वेळेस अशी गोष्ट घडली की, झाडाला कोठेच पाला नाही, पण पाणी मिळण्याचे तर संकट पडणार नाहींना ?
388-9
ते भलतेथ निमोले । न जोडिता आहे जोडले । तेचि सर्वस्व करुनि अर्पिले । जेणे मज ॥388॥
ते वाटेल त्या ठिकाणी फुकट मेहनतीशिवाय मिळते. तेच मला मनोभावाने अर्पण करतो,
389-9
तेणे वैकुंठापासोनि विशाळे । मजलागी केली राऊळे । कौस्तुभाहोनि निर्मळे । लेणी दिधली ॥389॥
त्याने माझ्याकरिता वैकुंठाहूनही मोठी देवळे बांधल्याप्रमाणेव कौस्तुभ मण्याहूनही तेजस्वी असे दागिने दिल्याप्रमाणे होते.
390-9
दूधाची शेजारे । क्षीराब्धीऐसी मनोहरे । मजलागी अपारे । सृजिली तेणे ॥390॥
त्याने दुधासारखी स्वच्छ व क्षीरसमुद्रांतील लाटांप्रमाणे फुगीर व मनोहर अशी अगणित शय्यास्थाने माझ्याकरिता निर्माण केल्याप्रमाणे आहेत.
391-9
कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु । मज हाती लाविला दिनकरु । दीपमाळे ॥391॥
कापूर, चंदन, कृष्णागरू अशा सुगंधाच्या महामेरूएवढाल्याढिगांनी माझ्यापुढे काडवाती लावून सुर्याची दीपमाळ पाजळल्याप्रमाणेआहे;
392-9
गरुडासारिखी वाहने । मज सुरतंरुची उद्याने । कामधेनूची गोधने । अर्पिली तेणे ॥392॥
त्याने गरूडासारखी वाहने, कल्पतरूच्या बागा, व कामधेनूची खिल्लारे मला अर्पण केल्याप्रमाणे आहेत.
393-9
मज अमृताहूनि सुरसे । बोनी वोगरिली बहुवसे । ऐसा भक्तांचेनि उदकलेशे । परितोषे गा ॥393॥
मला अमृताहूनही गोड अशी पुष्कळ पक्वान्ने वाढून जो संतोष होतो, तो अशा भक्तियुक्त अंतःकरणाने अर्पण केलेल्या पाण्याच्या थेंबापासून होतो.
394-9
हे सांगावे काय किरीटी । तुम्हीचि देखिले आपुलिया दिठी । मी सुदामयाचिया सोडी गाठी । पव्हयालागी ॥394॥
हे किरीटी, मी पोह्यांसाठी सुदामजीच्या जवळील गांठोडीच्या गाठी सोडल्या, त्या तू पाहिल्या आहेस ना ? हे तुला सांगितले पाहिजे का ?
395-9
पै भक्ति एकी मी जाणे । तेथ साने थोर न म्हणे । आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥395॥
म्हणून, मी फक्त एक भक्ति ओळखतो. त्या ठिकाणी लहानथोर हे मनात आणीत नाही; आणि वाटेल त्याने भक्तीची मेजवानी केली असता आम्ही तिचा आदर करतो.
396-9
येर पत्र पुष्प फळ । ते भजावया मिस केवळ । वाचूनि आमुचा लाग निष्फळ । भक्तितत्व ॥396॥
एरव्ही पत्रे, पुष्पे, फळे, ही आमची भक्ती करण्याकरिता केवळ निमित्तमात्र आहेत. याशिवाय भक्तितत्वाखेरीजइतर सर्व सामुग्री आम्ही व्यर्थ समजतो.
397-9
*म्हणोनि अर्जुना अवधारी । तू बुद्धि एकी सोपारी करी । तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी । न विसंबे माते ॥397॥
म्हणून, ऐक; तू आपली बुद्धि स्वाधीन करून नेहमी आपल्या मनोरूप मंदिरात माझा विसर पडू देऊ नको.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥9. 27॥
398-9
तू जे जे काही करशील, किंवा ज्या वस्तूंचा उपभोग घेशील, अथवा, ज्या पुष्कळ प्रकारच्या यज्ञांनी माझे यजन करशील,
399-9
नातरी पात्रविशेषे दाने । का सेवका देसी जीवने । तपादि साधने । व्रते करिसी ॥399॥
किंवा सत्पात्री जी जी दाने करशील, अथवा चाकरमाणसांस जी वेतने देशील आणि जी जी तपादि सर्व साधने व व्रते करशील,
400-9
ते क्रियाजात आघवे । जे जैसे निपजेल स्वभावे । ते भावना करोनि करावे । माझिया मोहरा ॥400॥
ती तुझ्या हातून सहजगत्या होणारी सर्व कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्तिपुरःस्सर कर
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १०८ वा, १८, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२८५ ते १२९६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १२८५
जगी मान्य केले हा तुझा देकार । की काही विचार आहे पुढे ॥१॥
करितो कवित्व जोडितो अक्षरे । येणे काय पुरे जाले माझे ॥धृपद॥
तोवरी हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखे ॥२॥
तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण । जरी काही वचन करिसी मज ॥३॥
अर्थ
मला या जगात सर्वत्र मान्यता प्राप्त करून देणे हाच काय तो तूझ्यासाठी माझ्या सेवेचा मोबदला आहे का, का ह्यापुढे तुझा काही विचार आहे. एकाला दुसरे अक्षरे जोडून माझ्याकडून कवित्व करवून घेतोस, माझा थोरपणा वाढवतोस परंतु ह्यावर माझे पूर्ण समाधान होईल असे तुला वाटते का. जोपर्यंत माझ्यासाठीचे पुढचे विचार तू मला तुझ्या मुखावाटे सांगत नाहीस तोपर्यंत तरी माझी ही कटकट काही संपणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा तुला आता पुंडलिकाची शपथ आहे जर तू माझा अव्हेर केला आणि मला असे अर्ध्यावरच टाकलेस तर.
अभंग क्र. १२८६
झड मारोनिया बैसलो पंगती । उठविता फजिती दातयाची ॥१॥
काय ते उचित तुम्हा का न कळे । का हो झांका डोळे पांडुरंगा ॥धृपद॥
घेईन इच्छेचे मागोनि सकळ । नाही नव्हे काळ बोलायाचा ॥२॥
तुका म्हणे जालो गगनाधिकारी । नाही लोक परी लाज देवा ॥३॥
अर्थ
मी बळेच झडप घालून संतांच्या पंक्तीत जेवणास बसलो आहे. आणि तुमच्यासारख्या थोर अन्नदात्याने मला त्या पंक्तीतून उठवले तर लोक तुम्हाला नांव ठेवतील. अहो पांडुरंगा माझ्या बाबतीत काय उचित आहे हे तुम्हाला कळत नाही काय, तुम्ही असे उगाच डोळे झाकून का बसलात ? देवा संतांच्या पंगतीमध्ये मला जे काही हवे आहे ते मी तुम्हाला नक्की मागणार आहे आणि तुम्ही नाही म्हणण्याची ही योग्य वेळच नाही हे देखील मला ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या पंगतीत बसलो त्यामुळे मी गगनाधीकारी झालो आहे, मोठा मानाधिकारीपणा मला मिळाला आहे आणि लोक मला काय म्हणतील याची तर मला मुळीच परवा नाही.
अभंग क्र. १२८७
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥
उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवटा आम्हालागी ॥धृपद॥
वंशपरंपरा दास मी अंकिता । तुका मोकलिता लाज कोणा ॥२॥
अर्थ
पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा करणे ही माझ्या वडिलांची वतनदारी आहे. उपवास करून, पारणे करून माझ्या पूर्वजांनी तुझ्या द्वाराचे रक्षण केले आहे. आणि आम्हाला सुखोपभोग घेण्यासाठी ही वतनदारी ची तरतूद करून ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझा अंकित दास आहे आणि तुम्ही जर माझी उपेक्षा केली तर याची लाज कोणाला आहे, अर्थात तुमच्याशिवाय कोणाला असणार ?
अभंग क्र. १२८८
नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापाचा ॥१॥
हेचि ओळख तयाची । खूण जाणा अभक्तची ॥धृपद॥
ठावा नाही पांडुरंग । जाणा जातीचा तो मांग ॥२॥
ज्याची विठ्ठल नाही ठावा । त्याचा संग न करावा ॥३॥
नाम न म्हणे ज्याचे तोंड । ते चि चर्मकाचे कुंड ॥३॥
तुका म्हणे त्याचे दिवशी । रांड गेली महारापाशी ॥४॥
अर्थ
ज्याची वाणी हरीचे नाम घेत नाही तो दोन बापाचा आहे हीच त्याची ओळख आहे आणि अभक्ताची खून देखील हीच आहे. जो पांडुरंगाला मानत नाही तो जातीचा मांग आहे. ज्याला विठ्ठलच माहित नाही त्याचा संग करु नये. जो आपल्या तोंडाने हरीचे नाम घेत नाही त्याचे ते तोंड नसून चांभाराचे कातडे भिजवण्याचे कुंड आहे असे म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाचा गर्भ ज्यादिवशी राहिला असेल त्यादिवशी त्याचि रांड आई महारा जवळ निजण्यासाठी गेली होती.
अभंग क्र. १२८९
पतित मीराशी शरण आलो तुज । राखे माझी लाज पांडुरंगा ॥१॥
तारियेले भक्त न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥धृपद॥
द्रौपदी बहिणी वैरी गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥
प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार । माझा का विसर पांडुरंगा ॥३॥
सुदामा ब्राम्हण दारिद्रे पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥
तुका म्हणे तुज शरण निजभावे । पाप निर्दाळावे पांडुरंगा ॥५॥
अर्थ
पांडुरंगा मी तुझ्या सेवेचा वतनदारी जरी असलो तरी मी पतित आहे पापी आहे. त्यामुळे मी तुला शरण आलो आहे तरी, देवा तु माझी लाज राख, पांडुरंगा तु आजपर्यंत तुझ्या अनेक भक्तांचा उद्धार केलेला आहे तुझा अंतपार कोणालाही लागत नाही. मी एक मोठा थोर पापी आहे त्यामुळे हे देवा तू माझा उद्धार कर. हे देवा तुमची बहीण द्रोपदी राजसूय यज्ञात भोजन वाढत होती त्यावेळी तिच्या चोळीची गाठ सुटली त्यावेळी दुर्योधनाने तिची विटंबना केली परंतु तु तीच्या चोळीची गाठ बांधण्यासाठी तिला तुझ्यासारखे चतुर्भुज केले. पांडुरंगा प्रल्हादासाठी तू स्तंभातून अवतार घेतलास मग माझाच विसर तुला का पडला ? देवा तुमचा मित्र सुदामा ब्राम्हण दरिद्रीने पिडला होता परंतु तुम्ही त्याला तुमच्यासारखे केले सोन्याची नगरी निर्माण करून तुम्ही त्याला तुमच्यासारखे श्रीमंत केले. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला नीज भावे शरण आलेलो आहे त्यामुळे तुम्ही माझे पाप नाहीसे करा.
अभंग क्र. १२९०
कस्तूरीचे रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥
आणीक ही तैसी चंदनाची झाडे । परिमळे वाढे मोल तया ॥धृपद॥
काय रूपे असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणे ॥२॥
फिरंगी आटिता नये बारा रुके । गुणे मोले विके सहस्रवरी ॥३॥
तुका म्हणे नाही जातीसवे काम । ज्याचे मुखी नाम तोचि धन्य ॥४॥
अर्थ
कस्तुरी चे रूप आती हिन असते परंतु तिच्या आत सारभूत सुगंध असतो त्यामुळे त्याला मोठे मोल मिळते. त्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला ही काही सुंदर रूप नसते परंतु त्याच्या आतील सुगंधाने त्याला मोठी किंमत प्राप्त होते. परीसाला काही चांगले रूप असते का, परंतु लोखंडालाही सोने करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असते त्यामुळे त्यालाही मोठे मोल असते. एखादी चांगली तलवार आळवली आणि ती विकली तर त्याचे बारा पैसे तरी येतील का तर नाही पण ती चांगली तलवार तशीच विकली तर तिचे हजार रुपयांवर पैसे येतील. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थामध्ये जातीचे काहीच काम नाही परंतु ज्याच्या मुखामध्ये देवाचे नाम आहे तोच धन्य आहे.
अभंग क्र. १२९१
नव्हे मी स्वतंत्र अंगाचा पाईक । जे हे सकिळक सत्ता वारू ॥१॥
तुम्हा आळवावे पाउला पाउली । कृपेची साउली करी मज ॥धृपद॥
शक्तीहीन तरी जालो शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनिया ॥२॥
तुका म्हणे भवाभेणे धरिले पाय । आणीक उपाय नेणे काही ॥३॥
अर्थ
देवा मी केवळ एक पाईक आहे, माझ्या सत्तेने मी या भवसागरातील सुख-दुःखे निवारण करू शकत नाही. त्यामुळे देवा मी तुम्हाला पावलोपावली आळवीत आहे. आता तुम्ही माझ्यावर भक्तीची छाया करा. देवा मी शक्तीहीन झालो आहे त्यामुळे मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही शक्तिमान आहात हा वृत्तांत मी पुराणात ऐकलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला शरण आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी जन्म मरणाच्या भीतीने तुमचे पाय धरले आहे व या वाचून दुसरा कोणताही उपाय मला माहित नाही.
अभंग क्र. १२९२
पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती । नाही ऐशी मति अर्थ कळे ॥१॥
होईल ते हो या विठोबाच्या नावे । अर्जिले भावे जीवी धरू ॥धृपद॥
एखादा अंगासी येईल प्रकार । विचारिता फार युक्ती वाढे ॥२॥
तुका म्हणे आळी करिता गोमटी । मायबापा पोटी येते दया ॥३॥
अर्थ
खूप ग्रंथ वाचावे परंतु इतके आयुष्य हाती नाही. समजा जरी ग्रंथ वाचण्यास मिळाले तरी तेवढी बुद्धी माझी नाही. आता विठोबाचेच नाम घेऊ आणि काय होईल ते होवो. जे साधन मिळविले आहे ते आता विश्वासाने आपल्या भक्तिभावाने जीवात साठवून ठेवू. मी जर ग्रंथाचा अभ्यास केला तर माझ्या अंगी अभिमाना सारखे प्रकार येतील आणि त्याचा फार विचार केला तर तर्ककुतर्क वाढतील. तुकाराम महाराज म्हणतात मुलाने चांगल्या गोष्टीसाठी हट्ट धरला तर त्याची आई बापाला दया येते त्याप्रमाणे हरीचे नाम आपल्या मुखाने घेतले तर या हरीला आपली दया येते व तो आपला उद्धार करतो.
अभंग क्र. १२९३
पाहाता रूप डोळा भरे । अंतर नुरे वेगळे । इच्छावशे खेळ मांडी । अवघे सांडी बाहेरी ॥१॥
तो हा नंदनंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥धृपद॥
दिसतो हा नोहे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खेळासाठी । होता भेटी परतेना ॥२॥
म्हणोनि उभी ठाकलीये । परतलीये या वाटा । आड करोनिया तुका । जो या लोका दाखवितो ॥३॥
अर्थ
हरी चे रूप डोळ्याने पाहताच ते डोळ्यात भरते आणि अंतरंग हरी वाचून वेगळे राहत नाही. हरी आपल्या इच्छेनुसार जगामध्ये खेळ मांडत असतो आणि माया रूपाने अनेक रूपे धारण करत असतो. बाई हाच तो नंदाचा कृष्ण याची सेवा कशी करावी ? तो जसा दिसतो तसा लहान नाही तर तो सर्व दिशा व्यापक आहे. देव मोठ्या चातुर्याने या संसारात खेळ खेळत असतो आणि याची भेट झाली तर मनुष्य पुन्हा संसाराकडे वळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीची एकदा भेट झाली की मनुष्य पुन्हा भवसागराच्या वाटेला येत नाही, मी मुक्तीला प्राप्त न होता संसाराच्या वाटेला परतलो आहे, गवळण म्हणते मी तुकारामाला आड करून विरहिणी गवळणीच्या स्थितीतील अनुवाद करून तुम्हाला दाखवत आहे.
अभंग क्र. १२९४
इंद्रियांची दिने । आम्ही केलो नारायणे ॥१॥
म्हणऊनि ऐसे सोसी । काय सांगो कोणांपाशी ॥धृपद॥
नाही अंगी बळ । त्याग करीजेसा सकळ ॥२॥
तुका म्हणे मोटे । प्रारब्ध हे होते खोटे ॥३॥
अर्थ
हे नारायणा तू आम्हाला इंद्रियांच्या आधीन करून दिन केले आहे. देवा माझे दुःख मी कोणापाशी सांगावे ? देवा सर्वसंगपरित्याग करण्याचे बळ माझ्या अंगी नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझे प्रारब्धच खोटे आहे मग त्यात नारायणाला दोष तरी का द्यायचा ?
अभंग क्र. १२९५
हाती धरू जावे । तेणे परते चि व्हावे ॥१॥
ऐसा का हो आला वाटा । हीन भाग्याचा करंटा ॥धृपद॥
देव ना संसार । दोही ठायी नाही थार ॥२॥
तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥
अर्थ
एखादी वस्तू हाताने धरायला जावे आणि ती मागे सरकावी, इतके दुःख माझ्या वाट्याला आलेले अाहे, इतका मी भाग्यहीन करंट झालो आहे काय ? माझ्या नशिबी देवही नाही आणि संसार ही नाही त्यामुळे मला दोन्ही ठिकाणी आधार राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात स्वतःच्या शेतीत पीकही येऊ नये आणि गावात भीकही मागू नये अशी माझी स्थिती झाली आहे.
अभंग क्र. १२९६
मोले घातले रडाया । नाही असुं आणि माया ॥१॥
तैसा भक्तीवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥धृपद॥
वेठी धरिल्या दावी भाव । मागे पळायाचा पाव ॥२॥
काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥३॥
अर्थ
एकदा ला पैसे देऊन फक्त रडवयास सांगितले तर तशी कृती करताना त्याच्या डोळ्यात अश्रू नसतात आणि माया ही नसते कारण त्याला पैसे देऊन राडावण्यास सांगितले असते. तसे अंतकरणात हरी विषयी काहीच प्रेम नाही आणि हरिभक्ती ही नाही आणि हरिकथा करण्यास तो बसलेला आहे त्याचे असे असणे म्हणजे जसे बेडग्याच्या रंगाप्रमाणे फक्त वरती वरती सुंदर असणे असेच असल्याप्रमाणे आहे. एखाद्या मनुष्याला बळेच काम करण्यास सांगावे आणि ते काम झाल्यावर त्याने लगेच मागे पळून जावे, त्याप्रमाणे ढोंगी हरिभक्त असतात. तुकाराम महाराज म्हणतात काजव्याच्या ज्योतीने दिवा पेटत नाही, त्याप्रमाणे खोटी हरिभक्ती केल्याने ज्ञान प्राप्त होत नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















