आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१० मे, दिवस १३० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १५४९ ते १५६०
“१० मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १० May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १० मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १५४९ ते १५६० चे पारायण आपण करणार आहोत.
१० मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ७६ ते १००,
76-11
तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेचि सारोनि परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केले ॥76॥
त्याप्रमाणे माझ्या व आत्मस्वरूपाच्या मध्ये जो अज्ञानप्रकृतिचा पडदा होता, तो आपण देवा ! दूर सारला आणि माझ्या बुध्दी परतत्वाचे शय्याघर केले.
77-11
म्हणौनि इयेविषयींचा मज देवा भरवसा कीर जाहला जीवा । परी आणीक एक हेवा । उपनला असे ॥77॥
म्हणून या आत्मस्वरूपाविषयी आता माझा दृढ विश्वास झाला आहे; पण आणखी एक उत्कट इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली आहे.
78-11
तो भिडा जरी म्हणो राहो । तरी आना कवणा पुसो जावो । काय तुजवाचोनि ठावो । जाणत आहो आम्ही ? ॥78॥
भिडेने ती इच्छा बोलून दाखवत नाही असे म्हणावे. , तर दुसर्या कोणाला मी तिच्याविषयी विचारणार ? तुझ्यावाचून आम्ही दुसरे ठिकाण जाणतो काय ?
79-11
जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानी उपरोधु करी । तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ? ॥79॥
पाण्यात राहणार्या प्राण्यांनी पाण्यात राहण्याचा संकोच केला किंवा लहान मुलाने आईच्या स्तनपानाविषयी भीड धरली, तर त्याच्या जगण्याला दुसरा उपाय काय आहे ?
80-11
म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेही तुजपुढा बोलावे । तव राहे म्हणितले देवे । चाड सांगै ॥80॥
म्हणून भीड किंवा संकोच धरू नये व आपल्या मनाला वाटते ते खुशाल तुमच्यासमोर बोलावे, असे वाटते. तेव्हा भगवान म्हणाले, अर्जुना ! बोलू नकोस. मनातली इच्छा सांग
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥11. 3॥
81-11
मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्ही केली जे गोठी । तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥81॥
त्यावर तो अर्जुन बोलला; अर्जुन म्हणतो, देवा ! तुम्ही आपल्या परमेश्वरस्वरूपाविषयी जे निरूपण केले, त्यायोगे आता माझ्या बौध्दिक अनुभवदृष्टिने समाधान झालें.
82-11
आता जयाचेनि संकल्पे । हे लोकपरंपरा होय हारपे । जया ठायाते आपणपे । मी ऐसे म्हणसी ॥82॥
आता ज्याच्या संकल्पाने ही सृष्टिपरंपरा होते व लय पावते व ज्या स्वरूपाला ‘ते स्वतः मी आहे’ असे म्हणतोस.
83-11
ते मुद्दल रूप तुझे । जेथूनि इये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचेनि व्याजे । घेवो घेवो येसी ॥83॥
जेथून तू द्विभूज किंवा चतुर्भुज रूप धारण करून देवादिकांचे कार्य करण्याकरिता वारंवार जगात प्रगट होतोस, ते तुझे मुळचे रूप
84-11
पै जळशयनाचिया अवगणिया । का मत्स्य कूर्म इया मिरवणिया । खेळु सरलिया तू गुणिया । सांठविसी जेथ ॥84॥
क्षीराब्धींतील जलावर शयन करणारे सोंग असो किंवा मत्स्य, कुर्म इत्यादिरूपाने मिरवणे असो, हे खेळ करणार्या गारूड्या ! हे तुझे खेळ संपले की ही तुझी रूपे ज्याठिकाणी सांठविली जातात
(येथे ‘खेळ’ या शब्दाचा अर्थ ” खोटा ” असा अर्थ नसून ” लिलेने विग्रह धरणे ” असा आहे. या ओवीत भगवंताच्या क्षीराब्धिजळशायीरूप व मत्स्यादिरूपे घेण्याला खेळ म्हटले आहे; म्हणून ती रूपे मिथ्या असे समजता येत नाहीत. कारण वेदान्तदृष्टिने एक अविद्येचे कार्यच मिथ्या व नाशीवंत आहे. ” नित्याविद्यानिवृत्तत्वात् ” भगवान नित्य अविद्यारहित आहे असे वेदान्तांत मानले असल्यामुळे भगवंताचे कोणतेहि रूप अविद्याजन्य नसते. अर्थात् ‘भगवंताची ही रूपे हा खेळ आहे’ या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, भगवंताची ही सर्व रूपे व विश्वरूपहि पूर्ण सच्चिदानंद स्वरूप राहूनच, ती सहज लिलेने घेतली जातात. त्यात विश्वरूप हे पहिले लीलाविग्रहीरूप असून क्षीराब्धिजळशायी किंवा मत्स्यकूर्मादि ही विश्वरूपाची लीलाविग्रही रूपे आहेत. अर्थात जडविनाशी, कल्पित अशा अविद्येच्या अपेक्षेने विद्योपाधि ही संज्ञा असलेल्या ज्ञानप्रधान विद्यावृत्तीने ही सर्व रूपे भगवान घेत असल्यामुळे व विद्यावृत्तीनेच त्यांचा अनुभव येत असल्यामुळे, ती खोटी, विनाशी म्हणता येत नाहीत. )
85-11
उपनिषदे जे गाती । योगिये हृदयी रिगोनि पाहाती । जयाते सनकादिक आहाती । पोटाळुनिया ॥85॥
उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगीलोक अंतर्मुखदृष्टि करून जे पाहतात आणि सनकादिक ज्या स्वरूपाला नेहमी मिठी मारून आहेत.
86-11
ऐसे अगाध जे तुझे । विश्वरूप कानी ऐकिजे । ते देखावया चित्त माझे । उतावीळ देवा ॥86॥
असे अतर्क्य जे तुझे विश्वरूप नुसते कानांनी ऐकतो, ते डोळ्यांनी पाहण्याकरिता मी फार उतावीळ झालो आहे.
87-11
देवे फेडूनिया सांकड । लोभे पुसिली जरी चाड । तरी हेचि एकी वाड । आर्ती जी मज ॥87॥
देवांनी माझ्या मनातील संकोच नाहीसा करून, काय इच्छा आहे ती सांग, असे मोठ्या प्रेमाने विचारलें. म्हणून सांगतो की माझ्या मनात हीच एक भारी इच्छा आहे.
88-11
तुझे विश्वरूपपण आघवे । माझिये दिठीसि गोचर होआवे । ऐसी थोर आस जीवे । बांधोनि आहे ॥88॥
तुझे संपूर्ण विश्वरूप माझ्या दृष्टिस दिसावे अशी तीव्र इच्छा मी मनात धरून आहे
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम् ॥11. 4॥
89-11
परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपाते देखावयालागी । पै योग्यता माझिया आंगी । असे की नाही ॥89॥
पण देवा ! येथे आणखी एक गोष्ट आहे, तुझ्या विश्वरूपाला पाहण्याकरिता लागणारी योग्यता माझ्या अंगी आहे किंवा नाही
90-11
हे आपले आपण मी नेणे । ते का नेणसी जरी देव म्हणे । तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचे ? ॥90॥
हे मी आपले आपणच जाणू शकत नाही. तुझी योग्यता आहे किंवा नाही, हे तू का जाणू शकत नाहीस असे जर, देवा ! तुम्ही म्हणाल, तर रोगी आपल्या रोगाचे निदान जाणतो काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-11
आणि जी आर्तीचेनि पडिभरे । आर्तु आपुली ठाकी पै विसरे । जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥91॥
आणि ज्याप्रमाणे अत्यंत तहानलेला पुरुष जसा मला समुद्रहि पुरेसा होत नाही असे म्हणतो, त्याप्रमाणे महाराज ! इच्छा करणार्या पुरुषाची इच्छा अत्यंत वाढली असता त्याला आपल्या योग्यतेचा विसर पडतो.
92-11
ऐशा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली । यालागी योग्यता जेवी माउली । बालकाची जाणे 92॥
अशाप्रकारे अत्यंत इच्छेच्या वेगामुळेच भूल पडून, माझ्याने आपली योग्यता सांभाळली जात नाही; म्हणून आई जशी आपल्या मुलाला काय व किती पचेल, हे जाणतें.
93-11
तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥93॥
त्याप्रमाणे, जनार्दना ! माझ्या योग्यतेचा विचार करा व मग विश्वरूपच दाखविण्याला प्रारंभ करा.
94-11
तरी ऐसी ते कृपा करा । एऱ्हवी नव्हे हे म्हणा अवधारा । वाया पंचमालापे बधिरा । सुख केउते देणे ? ॥94॥
म्हणून योग्यता असेल, तर विश्वरूप दाखविण्याची कृपा करा, नाहीतर विश्वरूपच पाहण्याची तुझी योग्यता नाही, असे म्हणा. बहिर्याला व्यर्थ कोमल स्वराचे काय सुख द्यायचें ? (त्याप्रमाणे माझी योग्यता नसतांना आपण विश्वरूप दाखविले तरी मला काय त्याचे सुख होणार ?)
95-11
एऱ्हवी येकले बापियाचे तृषे । मेघ जगापुरते काय न वर्षे ? । परी जहालीही वृष्टि उपखे । जऱ्ही खडकी होय ॥95॥
नाही तरी एका भाग्यवान चातकाकरिता वर्षाव करतांना मेघ सर्व पृथ्वीवरच पडत नाहीत काय ? पण पृथ्वीवर वर्षाव झाला तरी खडकावर झालेला वर्षाव व्यर्थच जातो.
96-11
चकोरा चंद्रामृत फावले । येरा आण वाहूनि काय वारिले ? । परी डोळ्यांवीण पाहले । वाया जाय ॥96॥
पूर्ण चंद्राच्या प्रकाशांत चकोरांना अमृतकण मिळतात आणि बाकीच्यांना चंद्राने आपल्याप्रकाशांतील अमृतकण वेचायला शपथपूर्वक मनाई केली आहे काय ? पण चकोराची अमृतकण पाहण्याची दृष्टि इतरांना नसल्यामुळे, नुसता चंद्राचा प्रकाश पाहण्याने तो लाभ होत नाही.
97-11
म्हणौनि विश्वरूप तू सहसा । दाविसी कीर हा भरवसा । का जे कडाडा आणि गहिंसा- । माजी नीत्य नवा तू की ॥97॥
म्हणून म्हटल्याबरोबर तू एकदम विश्वरूप दाखविशील हा मला पक्का विश्वास आहे; कारण उताविळपणे व अविचाराने देणार्यांमध्ये तुझे देणे नेहमीच अपूर्व असते.
98-11
तुझे औदार्य जाणो स्वतंत्र । देता न म्हणसी पात्रापात्र । पै कैवल्या ऐसे पवित्र । जे वैरियांही दिधले ॥98॥
तुझे औदार्य निरपेक्ष आहे. हे मी जाणतों; पण देतांना तू पात्रापात्रातेचा विचार करीत नाहीस. मोक्षासारखी शुध्द अशी स्थिति तू आपल्या शत्रुलाहि दिलीस.
99-11
मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय । म्हणौनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥99॥
खरोखरच मोक्षाची आराधना करणे (मोक्ष प्राप्त करून घेणे. ) अत्यंत कठीण आहे; पण तोहि तुझ्या पायाची आराधना करतो म्हणजे तो तुझ्या पायाच्या आश्रयानेच मिळतो – म्हणून तू जेथे त्याला पाठवितोस, तेथे तो सेवकाप्रमाणे जातो.
100-11
तुवा सनकादिकांचेनि माने । सायुज्यी सौरसु दिधला पूतने । जे विषाचेनि स्तनपाने । मारू आली 100॥
विषाने स्तन भरून तूझा प्राण घेण्याकरिता आलेल्या पुतनेलाहि, भगवंता ! त्वां सनकादिकांच्या प्रमाणे आपल्या सायुज्यमुक्तीचे सुख दिले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १३० वा, १०, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५४९ ते १५६०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १५४९
नव्हे भिडा हे कारण । जाणे करू ऐसे जन ॥१॥
जो जो धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥धृपद॥
चाल जाऊ संतांपुढे । ते हे निवडिती रोकडे ॥२॥
तुका म्हणे तू निर्लज्ज । आम्हा रोकडी गरज ॥३॥
अर्थ
एखाद्या व्यक्तीला केलेल्या उपकाराची जाणीव नसते मग नंतर त्याच्या वर कोणत्याही प्रकारचा उपकार करायचा नाही असे ठरवले जाते. पण देवा आम्ही तुझ्या भिडेने उपकाराचे कार्य करू. परंतु आम्ही जसजसा तुझा लौकिक सांभाळतो तसेतसे तू आम्हाला रडतोस देवा. आपल्या दोघातील भांडण मिटवायचे असेल तर आपण संतांकडे जाऊ मग संत आपले भांडण व आपल्या दोघाचाही निवडा रोखपणे करतील. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू निर्लज्ज आहेस पण आम्हाला तुझी गरज आहे.
अभंग क्र. १५५०
बहु होता भला । परि या रांडेने नासिला ॥१॥
बहु शिकला रंग चाळे । खरे खोटे इचे वेळे ॥धृपद॥
नव्हते आळविते कोणी । इने केला जगॠणी ॥२॥
ज्याचे त्यासी नेदी देऊ । तुका म्हणे धावे खाऊ ॥३॥
अर्थ
देव पहिला फार चांगला होता पण याला मायारूपी रांडे ने पार बिघडवून टाकले. हा देव मायारूपी रांडे जवळ राहून राहून अनेक प्रकारचे रंग करण्याचे आणि खरेखोटे चाळे करण्याचे शिकला आहे. पूर्वी देवाला कोणी काहीच मागत नव्हते परंतु मायेने त्याला जगाचा ऋणी करून ठेवला. तुकाराम महाराज म्हणतात देवाला कोणी काही मागायला गेले तर माया त्याला काही मिळू देत नाही उलट कोणी त्याच्याकडे काही मागायला गेले तर ती माया त्याच्या अंगावर धावून जाते.
अभंग क्र. १५५१
काय करावे ते आता । जाले नयेसे बोलता ॥१॥
नाही दोघाचिये हाती । गाठी घालावी एकांती ॥धृपद॥
होय आपुले काज । तो हे भीड सांडू लाज ॥२॥
तुका म्हणे देवा । आधी निवडू हा गोवा ॥३॥
अर्थ
आता काय करावे मायेमुळे आम्हाला काही बोलता येत नाही. देवाची एकातात गाठ घ्यावी असे वाटते परंतु तेही आमच्या हातात नाही कारण देवाची माया आणि जीवाची अविद्या या गुणात आम्ही अडकलो आहोत. परंतु आता काहीही होवो देवाची आणि माझी गाठ होईपर्यंत भीड आणि लाज दोन्ही सोडून दिले पाहिजेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आधी आम्ही मायेच्या तडाख्यातून मोकळे होऊ.
अभंग क्र. १५५२
केली सलगी तोंडपिटी । आम्ही लडिवाळे धाकुटी ॥१॥
न बोलावे ते चि आले । देवा पाहिजे साहिले ॥धृपद॥
अवघ्यांमध्ये एक वेडे । तोचि खेळवितो कोडे ॥२॥
तुका म्हणे मायबापा । मजवरी कोपोनका ॥३॥
अर्थ
देवा मी तुझे लाडके मुल आहे मी लाडाने तुझ्यापुढे वाटेल ती बडबड केली आहे. देवा नको ते मी माझ्या मुखाने बोललो बडबड केली पण त्याबद्दल मला तुम्ही क्षमा केली पाहिजे. घरांमध्ये सर्वात लहान मूल असते, त्याचे सर्व लाड करतात आणि जास्त लाड करतात. तुकाराम महाराज म्हणतात हे मायबापा मी तुम्हाला वाटेल ती बडबड केली पण मी तुमचे लहान लेकरू आहे माझी चूक पदरात घ्या, माझ्यावर तुम्ही राग धरू नका.
अभंग क्र. १५५३
शिकवूनि बोल । केले कवतुक नवल ॥१॥
आपणिया रंजविले । बापे माझिया विठ्ठले ॥धृपद॥
हाती प्रेमाचे भातुके । आम्हा देऊनिया निके ॥२॥
तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो ॥३॥
अर्थ
या देवाने मला बोलवण्याचे शिकवले आणि मी बोलत असतानाही त्याने माझे नवल, कौतुक केले. माझे बोल ऐकून देवाने स्वतःचीच करमणूक करून घेतली आहे, देवाने माझ्या हातात प्रेमाचा चांगला खाऊ दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी प्रेमाने पांडुरंगाचा, या विठ्ठलाचा टाहो करत आहे त्यामुळे हा रुक्मिणी चा पती पांडुरंग माझ्याकडे पहात आहे.
अभंग क्र. १५५४
तेथे सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरीनामे ॥१॥
दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारी । नाही उरी परताया ॥धृपद॥
विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिले गोजिरे ॥२॥
पोट सेविता न धाये । भूक भुकेली च राहे । तुका म्हणे पाहे । कोण वास मुक्तीची ॥३॥
अर्थ
आहो तेथेच सुखाची वस्ती आहे जेथे हरिभक्त वैष्णव आनंदाने हरिनाम घेऊन हरिनाम गातात व त्या छंदात नाचतात. तेथे दिंड्या असतात, गरुड चिन्हाकित पताका झळकत असतात आणि हरी नामाची गर्जना होत असते. दोषाला त्याठिकाणी मार खाण्याची वेळ आली आहे. त्या त्रासामुळे दोषाला त्याठिकाणी मार खाण्याची वेळ आली आहे आणि या त्रासामुळे दोष चारी दिशेला पळत सुटले आहेत. दोष परत माघारी येत नाहीत परत माघारी येण्याकरता शिल्लक ही राहत नाहीत. हा पंढरीचा राणा आपला देवपणा विसरून वैष्णवांच्या मेळ्यात कायम उभा असतो. निर्गुण स्वरूपाला कंटाळून देवाने वैष्णव करिता सुंदर गोजिरे रुप धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा या सुंदर गोजिर्या स्वरूपाला कितीही पाहिले तरी पोट भरत नाही. या सुंदर स्वरूपाला पाहण्याची भूक भुकेली राहते सुंदर गोजिरे स्वरूप असले तर मग कोणाला मुक्तीची आवड वाटते.
अभंग क्र. १५५५
शूद्रवंशी जन्मलो । म्हणोनि दंभे मोकलिलो ॥१॥
अरे तूचि माझा आता । मायबाप पंढरीनाथा ॥धृपद॥
घोकाया अक्षर । मज नाही अधिकार ॥२॥
सर्वभावे दीन । तुका म्हणे यातिहीन ॥३॥
अर्थ
बरे झाले मी शुद्र वंशात जन्माला आलो त्यामुळे मी दंभाच्या मायेतून वाचलो. हे पंढरीनाथा आता तूच माझा माय बाप आहे मला वेदाक्षर घोकण्यास अधिकार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी सर्वभावे दिन आहे आणि जातीने देखील हीन आहे.
अभंग क्र. १५५६
वेडे वाकुडे गाईन । परि तुझाचि म्हणवीन ॥१॥
मज तारी दिनानाथा । ब्रीद साच करी आता ॥धृपद॥
केल्या अपराधाच्या राशी । म्हणऊनि आलो तुजपाशी ॥२॥
तुका म्हणे मज तारी । सांडी ब्रीद नाहीतरी ॥३॥
अर्थ
देवा तुझे नांव माझ्या मुखाने जसे येईल वेडेवाकडे, कसे का होईना पण मी ते गाईनच आणि तुझाच स्वतःला म्हणून घेईल. हे दीनानाथा तु या भवसागरातून मला तार आणि आता तुझे ब्रीद खरे कर. देवा मी आज पर्यंत अनेक अपराध केले आहेत त्यामुळे मी तुझ्याजवळ आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू मला या भवसागरातून तार नाहीतर तू तुझे ब्रीद सोडून द्यावे.
अभंग क्र. १५५७
हरीभक्ती माझे जिवलग सोइरे । हृदयी पाउले धरिन त्यांचे ॥१॥
अंतकाळी येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणे देइन त्यासी ॥धृपद॥
आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवाचोनि नाही मज ॥२॥
देइन आलिंगण धरीन चरण । संवसारशीण नासे तेणे ॥३॥
कंठी तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥४॥
तयांचे चरणी घालीन मी मिठी । चाड ही वैकुंठी नाही मज ॥५॥
आळसे दंभे भावे हरीचे नाम गाती । ते माझे सांगाती परलोकीचे ॥६॥
काया वाचा मने देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाही मज ॥७॥
हरीचे नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणीवरी ॥८॥
तुका म्हणे तया उपकारे बांधलो । म्हणऊनि आलो शरण संता ॥९॥
अर्थ
हरिभक्त माझे जिवलग सोयरे आहेत आणी मी त्यांची पावले माझ्या हृदयात धारण करीन. माझ्या अंतकाळी हेच हरिभक्त मला सोडवण्यासाठी धावत येतील. आणि मी त्यांना बसण्यासाठी माझी मस्त पुढे करील. या जगामध्ये मला वैष्णवांवाचून दुसरे कोणीही सोयरे नाहीत, सज्जन नाहीत. वैष्णवांना आलिंगन देऊन त्यांचे चरण मी धरीन त्यामुळे माझ्या सर्व संसाराचा शीण नाहीसा होईल. वैष्णवांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे कंठामध्ये हरीचे नाम आहे त्यामुळे ते मला या भवन नदीतून तारू शकतात. मी वैष्णवांच्या चरणाला मिठी घालीन आणि त्यांच्या चरणा वाचून मला वैकुंठाची ही इच्छा नाही. जे कोणी लोक आळसाने, दंभाने, भक्ती श्रद्धायुक्त भावनेने कोणत्याही वृत्तीने हरीचे नाम गातात ते माझे परलोकी चे सांगाती आहेत. मी माझ्या काया, वाचा, मनाने वैष्णवांना आलिंगन देईन त्यांच्यापुढे मला माझ्या जीवाचीही पर्वा नाही. कोणी मला हरीचे नाम घेण्यासाठी आठवण करून देईन तो काळ धन्य आहे आणि ते सुख मी माझे पोट तृप्त होईपर्यंत घेईन. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या उपकाराने बांधलो गेलो आहे त्यामुळे मी संतांना शरण आलो आहे.
अभंग क्र. १५५८
लटिका तो प्रपंच एक हरी साचा । हरीविण आहाच सर्व इंद्रिये ॥१॥
लटिके ते मौन्य भ्रमाचे स्वप्न । हरीविण ध्यान नश्वर आहे ॥धृपद॥
लटिकिया वित्पत्ति हरीविण करिती । हरी नाही चित्ती तो शव जाणा ॥२॥
तुका म्हणे हरी हे धरिसी निर्धारी । तरी तू झडकरी जासी वैकुंठासी ॥३॥
अर्थ
हा प्रपंच लटिका आहे म्हणजे खोटा आहे. एक हरिनामाच सत्य आहे. आणि सर्व इंद्रिय हरविण व्यर्थ आहे. जर मुखामध्ये हरीचे नाम नसेल मनात हरीचे स्मरण नसेल तर मौन करण्याचे सोंग देखील खोटे आहे. आणि हरी वाचून इतर कोणतेही ध्यान करणे म्हणजे स्वप्न भ्रमा प्रमाणे मीथ्या नश्वर आहे. हरीच्या ज्ञानापासून इतर कोणतेही ज्ञान संपादन केले तरी, ज्याच्या चित्तामध्ये हरीचे स्मरणच त्याने संपादन केलेले ज्ञान काहीच उपयोगाला येत नाही आणि तो मनुष्य म्हणजे जिवंत असूनही प्रेताप्रमाणे आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात तू जर हरीचे नाम निर्धाराने धारण केले तर नक्कीच वैकुंठाला जाशील.
अभंग क्र. १५५९
सर्वस्वासी मुकावे तेणे हरीसी जिंकावे । अर्थ प्राण जीवे देहत्याग ॥१॥
मोह ममता माया चाड चिंता । विषया कंदुव्यथा जाळूनिया ॥धृपद॥
लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशाधडी ॥२॥
शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यासी ॥३॥
तुका म्हणे याती अक्षरे अभिमान । सांडोनिया शरण रिघें संता ॥४॥
अर्थ
ज्याला हरीला जिंकायचे आहे त्याने अर्थ, प्राण, जीव, देह सर्वाचा त्याग करावा. सर्व गोष्टीला जो मुकतो तोच हरीला जिंकू शकतो. मोह, ममता, माया, इच्छा, चिंता आणि विषय भोग, व्यथा जाळून लोकलज्जा, दंभ, अहंकार, मत्सर यांना देशोधडीला लावले. शांति, क्षमा, दया या मित्रांना विनंती करून चक्रपाणी हरीला बोलावून्या करिता मूळ पाठवावा. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही जातीचा, अक्षर अज्ञानाचा अभिमान टाकून द्या आणि संतांना शरण जावे.
अभंग क्र. १५६०
एकातांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥
ध्यानी रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडो नेदी ॥धृपद॥
मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा ॥२॥
कीर्ती ऐकोनिया जालो शरणांगत । दासाचे तू हित करितोसी ॥३॥
तुका म्हणे मी तो दीन पापराशी । घालावे पाठीशी मायबापा ॥४॥
अर्थ
अर्थ:–हे देवा पांडुरंगा संसारापासून होणारे आघात चुकवून, त्याच्या अपेक्षांचे माझ्यावर होणार आघात चुकवून आता कृपा करून एकाताचे सुख माझ्या पदरात घाल. माझ्या ध्यानात निरंतर तुझे रूप असून माझ्या जिव्हेवर सतत तुझे नाम आहे जे मला तुझा विसर किंचितदेखील पडू देत नाही. ज्याप्रमाणे आई आणि तिच्या सानुल्याची भेट होताच दोघाच्या जीवाला सुख लाभते आणि या सुखाची त्याला आवड निर्माण होते तशीच गोडी तू देखील मला भेट देऊन दे. मी तुझी अपार कीर्ती ऐकून तुला शरण आलो आहे कारण शरणागताला तू पाठीशी घालतोस आणि तुझ्या दासाचे तू हित घडवून आणतोस हे मला ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा, हे मायबापा मी दीनवाणा आहे माझ्या हातून खूप पापे घडली आहेत किंबहुना मी पापाची राशीच आहे तेव्हा तू मला तुझ्या पाठीशी घालावेस हीच काय ती तुझ्यापाशी माझी विनंती आहे, माझे मागणे आहे.
अभंग क्र. १५६०
एकातांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥
ध्यानी रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडो नेदी ॥धृपद॥
मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा ॥२॥
कीर्ती ऐकोनिया जालो शरणांगत । दासाचे तू हित करितोसी ॥३॥
तुका म्हणे मी तो दीन पापराशी । घालावे पाठीशी मायबापा ॥४॥
अर्थ
अर्थ:–हे देवा पांडुरंगा संसारापासून होणारे आघात चुकवून, त्याच्या अपेक्षांचे माझ्यावर होणार आघात चुकवून आता कृपा करून एकाताचे सुख माझ्या पदरात घाल. माझ्या ध्यानात निरंतर तुझे रूप असून माझ्या जिव्हेवर सतत तुझे नाम आहे जे मला तुझा विसर किंचितदेखील पडू देत नाही. ज्याप्रमाणे आई आणि तिच्या सानुल्याची भेट होताच दोघाच्या जीवाला सुख लाभते आणि या सुखाची त्याला आवड निर्माण होते तशीच गोडी तू देखील मला भेट देऊन दे. मी तुझी अपार कीर्ती ऐकून तुला शरण आलो आहे कारण शरणागताला तू पाठीशी घालतोस आणि तुझ्या दासाचे तू हित घडवून आणतोस हे मला ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा, हे मायबापा मी दीनवाणा आहे माझ्या हातून खूप पापे घडली आहेत किंबहुना मी पापाची राशीच आहे तेव्हा तू मला तुझ्या पाठीशी घालावेस हीच काय ती तुझ्यापाशी माझी विनंती आहे, माझे मागणे आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















