आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

६ मे, दिवस १२६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी ३०१ ते ३३५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १५०१ ते १५१२
“६ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ६ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ६ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
६ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ३०१ ते ३३५,
301-10
पै महोदधीचिया तरंगा । व्यवस्था धरू नये जेवी गा । तेवी माझिया विशेष लिंगा । नाही मिती ॥301॥
परंतु महासमुद्राचे तरंगांची गणती ज्यापमाणे करता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विशेषरूपचिन्ह असलेल्या विभूतींची संख्याच करता यावयाची नाही.
302-10
ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥302॥
अशांतहि मुख्य मुख्य सातवर पांच म्हणजे पंच्याहत्तर विभूति, अर्जुना ! तुला सांगितल्या, तो हा विचारण्यापुरता जो मी थोडा विभूतिविस्तार केला, तो मनाला वरवर झाला असेच वाटते.
303-10
येरा विभूतिविस्तारांसि काही । एथ सर्वथा लेख नाही । म्हणौनि परिससी तू काई । आम्ही सांगो किती ॥303॥
बाकीच्या विभूतिविस्ताराची मर्यादा किंवा संख्याच करवत नाही; म्हणून तू ऐकणार किती व आम्ही सांगणार तरी कोठवर ?
304-10
यालागी एकिहेळा तुज । दाऊ आता वर्म निज । सर्वभूतांकुरे बीज । विरूढत असे ते मी ॥304॥
म्हणून एकदांचे तुला आपल्या विभूतीचे वर्म सांगून ठेवतो की जे बीज सर्व भूतरूप अंकुराने उगवत असते ते मी आहे — म्हणजे मीच सृष्टिरूप झालो आहे.
305-10
म्हणोनि साने थोर न म्हणावे । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसे मानावे । वस्तुजाताते ॥305॥
म्हणून येथे लहानथोर, उंच- नीच असा भेदभाव करू नये. संपूर्ण एक परमेश्वरच सर्व स्वरूपाने नटला आहे असे मानावे.
306-10
तरी यावरी साधारण । आईक पा आणिकही खूण । तरी अर्जुना ते तू जाण । विभूति माझी ॥306॥
तर यावरहि मी विभूति ओळखण्याची आणखीहि साधारण खूण सांगतो, त्यावरून अर्जुना ! माझी विभूति जाणून घेत जा.
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥10. 41॥
307-10
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया । ते ते जाण धनंजया । विभूति माझी ॥307॥
संपत्ति व दया ह्या दोन्ही ज्या वस्तुचे ठिकाणी एकत्र वसत असतील, ते ते अर्जुना ! माझे अंश होत असे जाण.
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विरष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥10. 42॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥10॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूतियोग नावाचा हा दहावा अध्याय समाप्त झाला. ॥10॥
308-10
अथवा एकले एक बिंब गगनी । तरी प्रभा फाके त्रिभुवनी । तेवी एकाकियाची सकळ जनी । आज्ञा पाळिजे ॥308॥
अथवा ज्याप्रमाणे आकाशात एकच सूर्यबिंब असते आणि किरणांच्या द्वारे त्याचा प्रकाश त्रिभुवनात पसरतो, त्याप्रमाणे सर्वत्र मी परिपूर्ण रूपानेच असल्यामुळे संपूर्ण जगात विभूतीच्या द्वारे देखील माझीच आज्ञा पाळली जाते.
309-10
तयाते एकले झणी म्हण । ते निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवे सर्व साहान । चालत असे ॥309॥
म्हणून त्यांना ऐकले — म्हणजे मर्यादित ऐश्वर्याने युक्त — असे कदाचित् म्हणशील (पण असे त्यांना म्हणू नकोस) त्यांना दरिद्री हे शब्द लावू नकोस. कामधेनुबरोबर सर्व सामग्री चालत असते काय ?
310-10
तियेते जे जेधवा जो मागे । ते ते एकसरेचि प्रसवो लागे । तेवी विश्वविभव तया अंगे । होऊनि आहाति ॥310॥
त्या कामधेनूला जो जेव्हा जे काही मागतो तेव्हा ती सर्व एकदम आपल्यापासून प्रगट करतै, त्याप्रमाणे तेहि स्वतः अंगाने, विश्वच ज्यांचे ऐश्वर्य आहे, असे भगवत्स्वरूपच असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-10
तयाते वोळखा वया हेचि संज्ञा । जे जगे नमस्कारिजे आज्ञा । ऐसे आथि ते जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥311॥
त्यांना ओळखण्याची ही एक खूण आहे की सर्व जीव त्यांची आज्ञा शिरसा मान्य करतात. बुध्दिमान् अर्जुना ! हे असे जे असतील ते माझे अवतार होत हे जाण.
312-10
आता सामान्य विशेष । हे जाणणे एथ महादोष । का जे मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि ॥312॥
आणि मीच एक सर्व जगद्रूप झालो असून, मी सर्वत्र सारखा असल्यामुळें, सामान्य-विशेष पाहणे हा मोठा दोष आहे.
313-10
तरी आता साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पा कल्पावा विभागु । वाया आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा ॥313॥
म्हणून निर्विशेष आत्मस्वरूपाचे ठिकाणी साधारण व चांगला असा विभाग का कल्पावा व व्यर्थच आपल्या बुध्दीला भेदाचा डाग का लावावा ?
314-10
एऱ्हवी तरी तूप कासया घुसळावे । अमृत का रांधूनि अर्धे करावे । हा गा वायूसि काय पा डावे । उजवे अंग आहे ॥314॥
नाही तरी तूप व्यर्थच का घुसळायचे, अमृताला शिजवून व्यर्थच का अर्धे करावे ? अर्जुना ! वायुला डावे उजवे अंग आहे काय ?
315-10
पै सूर्यबिंबासि पोट पाठी । पाहता नासेल आपुली दिठी । तेवी माझ्या स्वरूपी गोठी । सामान्यविशेषाची नाही ॥315॥
तसेंच सूर्यबिंबाचे ठिकाणी पोट पाठ पहायला गेलो तर आपली दृष्टी नष्ट होईल, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाचे ठिकाणी सामान्य-विशेष अशा भागाची मुळी गोष्टच नाही.
316-10
आणि सिनाना इही विभूती । मज अपाराते मविसील किती । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असो हे जाणणे ॥316॥
या निरनिराळ्या विभूतींच्या द्वारे माझ्या अपार स्वरूपाची काय मोजणी होणार आहे ? म्हणून सुभद्रापती अर्जुना ! हे विभूतीचे जाणणे पुरे !
317-10
आता पै माझेनि एके अंशें । हे जग व्यापिले असे । यालागी भेदू सांडूनि सरिसे । साम्ये भज ॥317॥
आता माझ्या एक अंशाने हे जग व्यापले आहे, म्हणून भेद सोडून व एक समदृष्टी ठेवूनच माझे भजन कर. (सर्वत्र एक पूर्ण सच्चिदानंद परब्रह्मच पाहा, असा अर्थ. )
318-10
ऐसे विबुधवनवसंते । तेणे विरक्तांचेनि एकांते । बोलिले जेथ श्रीमंते । श्रीकृष्णदेवे ॥318॥
याप्रमाणे ज्ञानरूपी वनाला वसंताप्रमाणे प्रसन्न करणारा, विरक्त पुरुषाचा जो एकान्त म्हणजे विरक्त पुरुष सर्वसंगपरित्याग करून ज्या एकाचाच आश्रय करतात, असे षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले.
319-10
तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुले हे राभस्य बोलिलेती तुम्ही । जे भेदु एक आणि आम्ही । सांडावा एकी ॥319॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रभो ! एक भेद आहे, असे पाहणारे जे आम्ही त्यांनी तो भेद टाकावा, असे जे तुम्ही म्हटले ते थोडा विचार न करता बोलले असे वाटते.
320-10
हा हो सूर्य म्हणे काय जगाते । अंधारे दवडा का परौते । तेवी धसाळ म्हणो देवा तूते । तरी अधिक हा बोलु ॥320॥
का हो देवा ! (जेथे सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो तेथे) आता अंधार दूर करा असे सूर्य सांगतो काय ? त्याप्रमाणे भेद टाकून दे, असे सांगणार्या तुम्हाला, देवा ! अविचारी म्हणावे, तर ते अमर्यादेचे बोलणे होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-10
तुझे नांवचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि का काना मिळे । तयांचिया हृदयाते सांडूनि पळे । भेदु जी साच ॥321॥
एक तुझे नामच जर एखादेवेळी ज्याच्या मुखात आले किंवा कानांत पडले, तर त्याच्या ह्रदयातून खरोखर भेद निघून जातो.
322-10
तो तू परब्रह्मचि असके । मज दैवे दिधलासि हस्तोदके । तरी आता भेदु कायसा के । देखावा कवणे ॥322॥
पूर्णब्रह्मच असलेला तो तूं, माझ्या सुदैवाने सर्वस्वी तू माझ्या स्वाधीन झाला आहेस तेव्हा आता कशाचा, कोठे व कोणी भेद पहावा ?
323-10
जी चंद्रबिंबाचा गाभारा । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणे शारङ्गधरा । बोला हे तुम्ही ॥323॥
देवा ! चंद्रबिंबाच्या गाभार्यामध्ये-म्हणजे मध्यभागी शिरल्यानंतरहि उकडू लागेल काय ? पण देवा ! स्वामीपणाने नात्याने हे तुम्ही बोलत आहां.
324-10
तेथ सावियाचि परितोषोनि देवे । अर्जुनाते आलिंगिले जीवे । मग म्हणे तुवा न कोपावे । आमुचिया बोला ॥324॥
अर्जुनाचे भाषण ऐकून भगवंताला खरोखर आनंद झाला व त्यांनी अर्जुनाला प्रेमाने अलिंगन दिले. नंतर भगवान म्हणतात, अर्जुना ! माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस.
325-10
आम्ही तुज भेदाचिया वाहाणी । सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदे काय अंतःकरणी । मानिली की न मने ॥325॥
आम्ही भेदाला धरूनच तुला जो विभूतीचा विस्तार सांगितला, तो अभेदपूर्वक तुझ्या अंतःकरणात ठसला की नाही.
326-10
हेचि पाहावयालागी । नावेक बोलिलो बाहेरिसवडिया भंगी । तव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ॥326॥
हे पाहण्याकरिताच असे मी थोडेसे बाह्यात्कारी बोललो; पण तुला विभूतीचा बोध उत्तम प्रकारे झाला हे समजून आले.
327-10
येथ अर्जुन म्हणे देवे । हे आपुले आपण जाणावे । परी देखतसे विश्व आघवे । तुवा भरले ॥327॥
हे ऐकून अर्जुन म्हणतो, देवा ! आपले आपण जाणां; पण सर्व जगात तूच एक व्यापून भरला आहेस, असे मात्र मी पाहत आहे.
328-10
पै राया तो पांडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥328॥
संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा ! तो पंडुसुत अर्जुन असा अभेद आणि अद्वैताचा अनुभव घेऊ लागला; परंतु संजयचे भाषण ऐकून धृतराष्ट्र स्तब्धच राहिला.
329-10
की संजयो दुखवलेनि अंतःकरणे । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणे । हा जीवे धाडसा आहे मी म्हणे । तव आंतुही आंधळा ॥329॥
हे पाहून, संजयला धृतराष्ट्राविषयी थोडे दुःख झाले व तो म्हणू लागला की भगवंताचे मुखाने असा अद्वैताचा उपदेश ऐकण्याचे सद्भाग्य प्राप्त होऊनहि, हा त्या भाग्याला दूर लोटतो हे आश्चर्य नव्हे काय ? हा धृतराष्ट्र आंधळा आहे; पण अंतःकरणातून आंधळा नसेल असे मला वाटत होते, परंतु तो आतहि आंधळाच आहे- म्हणजे त्याच्या अंतःकरणात ज्ञानसूर्याची किरणे शिरत नाहीत असे मला आता वाटू लागले.
330-10
परी असो हे तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु । की याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥330॥
पण असो. याचे आपल्याला काय करायचे आहे. आर्जुन मात्र आपले वाढते आत्मकल्याण करून घेण्याची इच्छा करू लागला; कारण यानंतरहि त्याच्या अंतःकरणात दुसर्या गोष्टीविषयी भरवसा वाटू लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-10
म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती । इये आर्तीचा पाउली मती । उठती जाहली ॥331॥
संजय म्हणतो हा ह्रदयातील अनुभव बाहेर डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा आशा इच्छेच्या पावलाने त्याची बुध्दि उसळू लागली.
332-10
मिया इहीच दोही डोळा । झोंबावे विश्वरूपा सकळा । एवढी हाव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी ॥332॥
अर्जुन हा थोर भाग्यवान होता, म्हणूनच याच दोन्ही डोळ्यांनी भगवंताच्या विश्वरूपाला मिठी मारावी अशी थोर हाव करीत होता.
333-10
आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणोनि वांझोळे न लगती देखा । जे जे येईल तयाचि मुखा । ते ते साचचि करितसे येरु ॥333॥
प्रस्तुत अर्जुन कल्पतरूंची फांदी होता, म्हणूनच तिला वांझ फूल लागत नव्हते. जी जी इच्छा त्याने बोलून दाखवावी ती ती भगवान पूर्ण करीत असे.
334-10
जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपणचि जाहला । तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसी ॥334॥
जो प्रल्हादाच्या शब्दासाठी विषहि आपण झाला, तो श्रीकृष्ण भगवान, अर्जुनाला गुप्तरूपाने प्राप्त झाला होता.
335-10
म्हणोनि विश्वरूप पुसावयालागी । पार्थ रिगता होईल कवणे भंगी । ते सांगेन पुढिलिये प्रसंगी । ज्ञानदेव म्हणे नि वृत्तीचा ॥335॥
म्हणून अर्जुन आता विश्वरूपाच्या दर्शनाकरिता कोणत्या रीतीने प्रश्न करील हे निवृत्तिनाथांचे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढील अध्यायात सांगणार आहे.
श्रीसद्गुरुकृपेने श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाचा मराठी अनुवाद संपन्न झाला तो श्रीसद्गुरुचरणी समर्पण असो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगोनाम दशमोऽध्यायः ॥10॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 72॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 335॥
॥जय जय रामकृष्ण हरि॥
अध्याय दहावा समाप्त
दिवस १२६ वा, ६, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५०१ ते १५१२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १५०१
बुद्धिहीना उपदेश । ते ते विष अमृती ॥१॥
हुंगो नये गोऱ्हावाडी । तेथे जोडी विटाळ ॥धृपद॥
अळसियाचे अंतर कुडे । जैसे मढे निष्काम ॥२॥
तुका म्हणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥
अर्थ
बुद्धिहीन मनुष्यांना उपदेश करणे म्हणजे अमृतामध्ये विष कालवल्यासारखेच आहे. शौचाच्या ठिकाणी जाऊन कधीच वास घेऊ नये त्याने दुर्गंधीच येते आणि विटाळ होतो. आळशी मनुष्याचे मन दुष्ट असते, जसे मढे काहीही करू शकत नाही त्याप्रमाणे आळशी मनुष्य हे निष्काम असतात त्यांना काहीही करण्याची इच्छा होतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे श्रीपती अशा बुद्धिहीन निष्काम लोकांच्या हातातुन मला वाचवा.
अभंग क्र. १५०२
न करी तुमची सेवा । बापुडे मी पण देवा ।
बोलिलो तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥१॥
आणीक काय तुम्हा काम । आम्हा नेदी तरी प्रेम ।
कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥धृपद॥
आह्मी वेचलो शरीरे । तुम्ही बीज पेरा खरे ।
संयोगाचे बरे । गोड होते उभयता ॥३॥
एका हाते टाळी । कोठे वाजते निराळी ।
जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥३॥
रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता ।
होईन सरता । संतांमाजी पोसणा ॥४॥
ठेविले उधारा । वरी काय तो पातेरा ।
तुका म्हणे बरा । रोकडा चि निवाड ॥५॥
अर्थ
देवा मी तुमची सेवा अभिमानाने व मी पणाणे करत नाही तर मी बापडा आहे भोळा आहे म्हणून करतो आहे. मी तुमच्या जवळ जी भक्ती आणि प्रेमाची इच्छा केली आहे तेवढी पूर्ण करा. तुम्हाला अजून दुसरे कोणते काम आहे देवा की, तुम्ही आम्हाला प्रेम देण्याकरता थोडावेळ देखील देत नाहीत देवा. तुम्ही आम्हाला प्रेम दिले तर धर्म आणि अधर्म हे आमच्या जवळ निश्चयाने कसे राहतील ? देवा आम्ही तुम्हाला आमचे शरीर अर्पण केले आहे आता तुम्ही आमच्या शरीरांमध्ये भक्ती आणि प्रेमाचे खरे बीज पेरा. त्यामुळे तुमचा व माझा संयोग होईल व दोघामध्ये एकमेकांविषयी थोडी गोडी वाढेल. देवा एका हाताने टाळि वाजते काय ? स्वामीचा सेवक कितीही बलवान जरी असला तरी स्वामी नसेल तर ते चांगले वाटत नाही. हे अनंता तुम्ही नाम रूपाला या म्हणजे आम्ही तुमच्या नाम रुपाच्या सत्तेने आमच्या भक्तीला पुष्टता आणू मग मी तुझा प्रिय होऊन संतांमध्ये मान्य होईल व मग संत आमचे पालन-पोषण करतील. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही जर मला भक्ती आणि प्रेम उधार देण्याचे ठेवले तर माझा सर्वत्र पाचोळा होईल हा निवाडा जर रोखीने झाला तर बरे होईल देवा.
अभंग क्र. १५०३
भुके नाही अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥१॥
हे तो चाळवाचाळवी । केले आपण चि जेवी ॥धृपद॥
नैवेद्याचा आळ । वेचे ठाकणी सकळ ॥२॥
तुका म्हणे जड । मज न राखावे दगड ॥३॥
अर्थ
काही असे लोक आहेत की ते जिवंत असणाऱ्या बापाला जेवण देत नाही परंतु मेल्यावर मात्र पिंडदान करतात. ही तर फसवाफसवी आहे कारण श्रद्धा करिता केलेले अन्न तो स्वतः खात असतो, देवाला नैवेद्य म्हणून गोडधोड अन्न करतात आणि स्वतः खातात. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला असल्या जड असणाऱ्या लोकाप्रमाणे ठेवू नका.
अभंग क्र. १५०४
सर्व भाग्यहीन । ऐसे सांभाळिलो दीन ॥१॥
पायी संतांचे मस्तक । असो जोडोनि हस्तक ॥धृपद॥
जाणे तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥२॥
तुका म्हणे जीव । समर्पून भाकी कीव ॥३॥
अर्थ
मी सर्व प्रकारे हीन आहे दिन आहे तरीही संतांनी माझा सांभाळ केला. यामुळेच संतांच्या पायी माझे मस्तक असो व नेहमीच मी त्यांच्यापुढे हात जोडून असो. देवा माझ्यासारख्या दीनदुबळ्यांची सेवा कशी आहे हे तुम्ही जाणता आहातच. तुकाराम महाराज म्हणतात संतान जवळ मी माझा जीव अर्पण करून माझा उद्धार करा अशी किव त्यांच्यापुढे भाकत आहे.
अभंग क्र. १५०५
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥
येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥धृपद॥
होई बळकट । माझ्या मना तू रे धीट ॥२॥
तुका आला लोटांगणी । भक्तीभाग्या जाली धणी ॥३॥
अर्थ
अर्थ:–माझ्या भाग्याचा उदय झाला आहे, माझे भाग्य फळाला आले आहे म्हणून मला आता संतांच्या पायाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. आता त्यांच्या चरणांवर ठेवलेले माझे मस्तक शेवटपर्यंत तसेच राहो, मरणाआधी ते तिथून किंचित देखील हलू नये हीच काय ती आता माझी अपेक्षा, हेच काय ते आता देवाजवळ माझे मागणे आहे. तुकोबाराय आपल्या मनाला बजावतात की हे मना तू आता बळकट हो, धीट हो कारण भक्तिपंथावर चालणे वाटते तेवढे सोपे काम नाही, सरळ नाही म्हणून संतांच्या पायी आता मला लोटांगण घालू दे, त्यांचे मार्गदर्शन मला लाभू दे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तिभाग्य लाभल्यामुळे म्हणजेच एवढा मोठा भाग्योदय झाल्यामुळे माझे मन आता शांत आणि समाधान पावले आहे.
अभंग क्र. १५०६
नाही तरी आता कैचा अनुभव । जालासी तू देव घरघेणे ॥१॥
जेथे देखो तेथे लांचाचे पर्वत । घ्यावे तरि चित्त समाधान ॥धृपद॥
आधी वरी हात या नावे उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥२॥
तुका म्हणे जैसी तैसी करू सेवा । सामर्थ्याने देवा पायापाशी ॥३॥
अर्थ
देवा नाहीतरी आता तुझ्याकडून चांगला अनुभव येईल कसा कारण तू तर आमचे घर बुडवणारा झाला आहेस देवा. जिकडे पहावे तिकडे सर्व लोक लालसेने वेडे झाले आहेत मग तो परमार्थ असो किंवा व्यवहार असो आणि आमच्या देवालाही काहि दिल्याशिवाय बरे वाटत नाही. कोणीही कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न धरता दान करणे व देण्याकरता नेहमी हात वरती असणे यालाच उदार म्हणतात. नाहीतर एखाद्याने दुसऱ्याला कोणाला तरी एखादा माल दान म्हणून दिला व दुसऱ्याने त्याच्या मोबदल्यात द्रव्य घेतले तर मग हा प्रकार म्हणजे फेटाफिटीचाच झाला मग त्यात उपकाराला तरी कसला ? तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला तुमची जशी सेवा करता येईल त्याप्रमाणे आम्ही तुझी सेवा करू तुम्ही सर्वशक्तीमान आहात तरी तुम्ही कोणाला काहीच देत नाही पण असे असले तरी देखील आम्ही तुमच्या पायापाशी बसून तुमची सेवा करू.
अभंग क्र. १५०७
आम्ही सर्वकाळ कैची सावधान । व्यवसाये मन अभ्यासले ॥१॥
तरी म्हणा मोट ठेविली चरणी । केलो गुणागुणी कासावीस ॥धृपद॥
याच कानसुली मारीतसे हाका । मज घाटू नका मधी आता ॥२॥
तुका म्हणे निद्रा जागृति सुषुप्ति । तुम्ही हो श्रीपती साक्षी येथे ॥३॥
अर्थ
मनावर नेहमी संसारिक व्यवहाराचे अभ्यास करणे बिंबले आहेत त्यामुळे देवा आम्ही तुझ्या ठिकाणी एकाग्र कसे राहणार आहोत ? तरी आम्ही देवाच्या पायावर आमच्या देहाचे मुटकुळे ठेवले आहेतच म्हणा, कारण इंद्रियांच्या प्रत्येक अवयवा मुळे आम्ही कासावीस झालो आहोत. त्यामुळेच मी आता देवाच्या कानावर जवळ जाऊन म्हणत आहे की, हे देवा तुम्ही मला आता इंद्रीय आणि विषयांमध्ये गुंतून ठेवू नका त्यामध्ये घोटाळु देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात हे श्रीपती देवा तुम्ही आमच्या स्वप्न जागृती आणि सुशुप्तीचे साक्षीदार आहात.
अभंग क्र. १५०८
नसताचि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥१॥
जालो तेव्हा कळले जागा । वाउगा हा आकांत ॥धृपद॥
गंवसिलो पुढे मागे । लागलागे पावला ॥२॥
तुका म्हणे केली आयणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥३॥
अर्थ
जन्म मरणाचे भय दाखवून तुम्ही माझ्या जीवाला कष्टी केले आहे देवा, जेव्हा मला ब्रम्हज्ञान झाले त्यावेळी मला असे जाणवले की जन्म मरणाचे भय आणि त्याविषयी आक्रोश करणे व्यर्थ आहे. मला जन्म मरणाचे भय वाटत होते त्या कारणामुळे मी तुमचा शोध घेण्यास चालू केले नंतर शेवटी मला तुमचा पत्ता मिळाला. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी आणि माझी सलगी करून देणारे संत आहेत त्यांनी मला तुझ्या पुढे उभे केले व ब्रम्हानंदाचा अनुभव करून दिला.
अभंग क्र. १५०९
हे का आम्हा सेवादान । देखो सीण विषमाचा ॥१॥
सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मी का कलीसारिखे ॥धृपद॥
शरणागत वैऱ्या हाती । हे निश्चिंती देखिली ॥२॥
तुका म्हणे इच्छीं भेटी । पाय पोटी उफराटे ॥३॥
अर्थ
देवा आम्ही अनेक प्रकारचे दुःख पळावे आणि त्याचे व्यर्थ शीण करत बसावे हेच तुमच्या सेवेचे दान आहे काय देवा ? तुमची ब्रीदावळी म्हणजे दीनानाथ अशी आहे ती तुम्ही सांभाळा तुम्ही कली सारखे वाईट का झालात ? तुम्हाला शरण आलेल्या भक्तांना तुम्ही काळाच्या हाती द्यावे म्हणजे वैर्याच्या हाती द्यावे यातच तुम्हाला समाधान वाटते काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुमच्या भेटीची इच्छा धरतो आणि तुम्ही उलट वागतात पाय पोटात घेता याला काय म्हणावे ?
अभंग क्र. १५१०
का हो आले नेणो भागा । पांडुरंगा माझिया ॥१॥
उफराटी तुम्हा चाली । क्रिया गेली सत्याची ॥धृपद॥
साक्षी हेंगे माझे मन । आर्त कोण होते ते ॥२॥
तुका म्हणे समर्थपणे । काय नेणे करीतसा ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा तुम्ही याआधी सर्व संतांना भेट दिली परंतु माझ्याच बाबतीत असे का ? तुम्ही मला भेट का देत नाहीत देवा तुमची सत्याला धरून वागण्याची क्रिया संपली आहे की काय तुम्ही असे उरफाटे का वागतात ? देवा तुमची पूर्वीची वागणूक आणि भक्तांच्या भेटी विषय असलेली तळमळ याविषयी माझे मनच साक्षी आहे देवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही समर्थ आहात म्हणजे तुम्ही काहीही करू शकता तुम्ही माझ्या विषय असे का वागत आहात तुमचे हे वागणे मला काहीच कळत नाही.
अभंग क्र. १५११
शकुनाने लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥
भयारूढ जाले मन । आता कोण विश्वास ॥धृपद॥
प्रीत कळे आळिंगणी । संपादनी अत्यंत ॥२॥
तुका म्हणे मोकलिले । कळो आले बरवे हे ॥३॥
अर्थ
शकुन-अपशकुन याने पुढील होणारे लाभ आणि हानी कळून येते. देवा आता माझे मन भयभीत झाले आहे तुमच्यावर कोण विश्वास ठेवील ? आपल्यावर समोरच्या व्यक्तीचे प्रेम किती आहे ते त्याने आपल्याला आलिंगन दिल्यावर लगेच समजते काही लोक फक्त वरवर आपल्याला आलिंगन देतात तेही लगेच लक्षात येते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू आम्हाला मोकळेच सोडून देणार आहेस हे लक्षात आले तेवढे तरी बरे झाले.
अभंग क्र. १५१२
न होय निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतहान सहावली ॥१॥
तरि नित्य नित्य करी आळवण । माझा अभिमान भिन्न असो द्यावा ॥धृपद॥
नाही विटाळिले काया वाचा मन । संकल्पाने भिन्न आशेचिया ॥२॥
तुका म्हणे भवसागरी उतार । करावया आधार इच्छीतसे ॥३॥
अर्थ
देवा तुझी प्राप्ती करून घेण्यासाठी आम्हाला कडक उपवास करणे शक्य नाही. आपल्या देहाला कष्ट करून घेणे हे आम्हाला जमत नाही आणि तहान-भूक आम्हाला सहन होत नाही. तरी देवा आम्ही तुला नित्य आळवीत आहोत तुझी करुणा आम्ही नेहमी भाकत आहोत त्यामुळे देवा आमचा अभिमान तू बाळगावा. कोणत्याही प्रकारच्या भिन्नभिन्न आशेने संकल्पनाने माझे काया, वाचा, मन कधीही विटाळलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी या भवसागरातून तरून जाण्याकरता तुम्ही एक मला आधार द्यावा एवढीच माझी इच्छा आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















