आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

५ मार्च, दिवस ६४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ७५७ ते ७६८
“५ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan XX March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ५ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ७५७ ते ७६८ चे पारायण आपण करणार आहोत.
५, मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २५१ ते २७५,
251-6
जैसी आभाळाची बुंथी । करुनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरू नये ॥251॥
सुर्यासमोर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते आणि ढग दूर गेल्यावर त्याचे तेज आवरून धरता येत नाही.
252-6
तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥252॥
त्याप्रमाणे शरीरावर त्वचेचा जो कोरडा पापुद्रा असतो, तो धान्यावरील कोंड्याप्रमाणे निघून जातो.
253-6
मग काश्मीराचे स्वयंभ । का रत्नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीचि भांब । तैसी दिसे ॥253॥
मग स्फटिकाचे मूर्तिमंत स्वयंभु लिंग जसे असावे अथवा रत्नरूप बिजाला जणू अंकुर निघावा, त्याप्रमाणे त्या अवयवांची शोभा दिसते
254-6
नातरि संध्यारागीचे रंग । काढूनि वळिले ते आंग । की अंतर्जोतीचे लिंग । निर्वाळिले ॥254॥
अथवा संध्याकाळी आकाशात पसरलेले रंग काढून जणू ते शरीर बनविले आहे किंवा देहातील आत्मज्योतीची तेजस्वी शिवलिंगच. ! ! !
255-6
कुंकुमाचे भरीव । सिध्दरसांचे वोतीव । मज पाहता सावेव । शांतिचि ते ॥255॥
केशराने पूर्ण भरलेला आकार अथवा शरीररूपी मुशीत अमृत ओतून झालेला आकार अथवा मला असे जाणवते की, देहाच्या रूपाने मोक्षरूपी शांतीच सर्व अवयवासह प्रगट झालेली आहे.
256-6
ते आनंदचित्रीचे लेप । नातरी महासुखाचे रूप । की संतोषतरूचे रोप । थांवले जैसे ॥256॥
योग्याचे शरीर म्हणजे जणू आनंदरुपी चित्रातील रंग अथवा महासुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे जणू विकसित झालेले रोप होय.
257-6
तो कनकचंपकाचा कळा । की अमृताचा पुतळा । नाना सासिन्नला मळा । कोवळिकेचा ॥257॥
तो देह म्हणजे जणू सोनचाफ्याची मोठी कळी, अमृताचा पुतळा अथवा कोवळीकतेचा बहरून आलेला मळा आहे.
258-6
हो का जे शारदियेचे वोले । चंद्रबिंब पाल्हेले । का तेजचि मूर्त बैसले । आसनावरी ॥258॥
अथवा शरद ऋतूतील पौर्णिमेच्या ओलाव्याने प्रफुल्लित झालेले चांद्रबिंबच किंवा आसनावर विराजमान झालेले तेजच होय.
259-6
तैसे शरीर होये । जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥259॥
ज्यावेळी कुंडलिनी शक्ती चंद्रामृत प्राशन करते, त्यावेळी शरीर असे तेजोमय होते, अशा देहाला पाहून यमदेखील घाबरतो.
260-6
वृध्दाप्य तरी बहुडे । तारुण्याची गाठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ॥260॥
वार्धक्य तर संपून जाते, तारुण्य नाहीसे होते आणि नाहीसे झालेले रसरशीत बालपण प्रगट होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-6
वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवी बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपम ॥261॥
एरवी वयाने तो एवढासा दिसतो; परंतु त्याचा पराक्रम मोठा असतो. त्याच्या धैर्याच्या थोरपणाला उपमा देता येत नाही.
262-6
कनकद्रुमाचा पालवी । रत्नकळिका नित्य नवी । नखे तैसी बरवी । नवी निघती ॥262॥
सोन्याच्या वृक्षाची पालवी अथवा रत्नांची नित्यनुतन कळी यावी, त्याप्रमाणे योगी पुरुषाला नवी उत्तम नखे येतात.
263-6
दांतही आन होती । परि अपाडे सानेजती । जैसी दुबाही बैसे पांती । हिरेयांची ॥263॥
दुसरे नवीन दातही येतात. परंतु ते फार छोटे असतात, जणू काही दोन्ही बाजुंनी हिऱ्यांची पंगत बसली आहे.
264-6
माणिकुलियांचिया कणिया । सावियाची अणुमानिया । तैसिया सर्वांगी उधवती अणिया । रोमांचिया ॥264॥
ज्याप्रमाणे माणिकाचे बारीक कण असावेत आणि ते अनुऐवढे असावेत, त्याप्रमाणे सर्व शरीरावर रोमांचाची टोके वर येतात.
265-6
करचरणतळे । जैसी का रातोत्पळे । पाखाळी होती डोळे । काय सांगो ॥265॥
हाताचे आणि पायाचे तळवे लाल कमळाप्रमाणे लालसर आणि नाजूक होतात. डोळे किती स्वच्छ होतात, हे काय सांगू ?
266-6
निडाराचेनि कोंदाटे । मोतिये नावरती संपुटे । मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥266॥
मोत्ये मोठी होऊन दाटल्यामुळे लहान शिंपीत मावत नाहीत, म्हणून जसा शिंपीच्या दोन भागांचा सांधा उकलतो,
267-6
तैशी पातिचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघो पाहे । आधिलीची परि होये । गगना कळिती ॥267॥
त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात मावत नाही; आणि त्या पात्यांना व्यापून बाहेर निघावायस पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते; परंतु ती आकाश व्यापणारी होते.
268-6
आइके देह होय सोनियाचे । परि लाघव ये वायूचे । जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाही ॥268॥
अर्जुना, ऐक. त्या योगी पुरुषाचा देह सोन्यासमान कंतीमय होतो; परंतु देह वायूसमान हलका होतो. कारण त्यातील पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश नाहीसे झालेले असतात.
269-6
मग समुद्रपैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत ओळखे । मुंगियेचे ॥269॥
मग तो समुद्राच्या पलीकडे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो.
270-6
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकी पाऊल न लागे । येणे येणे प्रसंगे । येती बहुता सिध्दी ॥270॥
वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालला तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्यास प्रसंगानुसार प्राप्त होतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-6
आइके प्राणाचा हातु धरुनि । गगनाची पाउटी करुनी । मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली ॥271॥
अर्जुना, ऐक. जी प्राणाचा हात धरून हृदय-आकाशच्या पायऱ्या करून सुषुम्नेच्या जिन्याने हृदयात आली,
272-6
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥272॥
ती कुंडलिनी संपूर्ण जगताची आई आहे, ती ब्रम्हचैत्यन्यरूप सार्वभॊम राजाची शोभा आहे, जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला शीतल सावली केली आहे,
273-6
जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची कंरडी । जे प्राणाची उघडी । जन्मभूमी ॥273॥
जी निराकार ब्रम्हाची साकार अशी मूर्ती, जी परमात्मा शिव ठेवण्याची करंडी, जी ओंकाराची प्रत्यक्ष जन्मभूमी आहे.
274-6
हे असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली । तव अनाहताचा बोली । चावळे ते ॥274॥
हे असो. ती कुंडलिनी अनाहत चक्रात आल्यानंतर तेथे अनाहत नाद सुरु होतो.
275-6
शक्तीचिया आंगा लागले । बुद्धीचे चैतन्य होते जाहले । ते तेणे आइकिले । अळुमाळु ॥275॥
कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञानरुप चैत्यन्य, त्या साक्षीचैत्यन्याच तो अनाहत शब्द किंचित ऐकलेला असतो.
दिवस ६४ वा, ५, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७५७ ते ७६८
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ७५७
देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंती ॥१॥
जैसा भाव तैसे फळ । स्वातीतोय एक जळ ॥धृपद॥
पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदंतर तेवी ॥२॥
तुका म्हणे हिरा । पारखिया मूढा गारा ॥३
अर्थ
देवाकडे पाहण्याचे तीन प्रकार आहेत, एक म्हणजे इच्छा नसताना दुसऱ्याच्या आग्रहास्तव पाहणे, दुसरा म्हणजे दुसऱ्याने सांगितले म्हणून पाहने आणि तिसरा म्हणजे स्वतः पाहणे. जसा भाव असेल तसेच आपल्याला फळ प्राप्त होते, स्वाती नक्षत्रा चे पाणी हे एक सारखेच असते पण तेच पाणी पहिले तव्यावर टाकले तर त्याची वाफ होते, कमळावर ते मोत्यासारखे भासते, तर शिंपल्यात मोतीच दिसते. अन्न पाहणे, त्याचे वर्णन करने व भोजन करणे यात फरकच असतो. तुकाराम महाराज म्हणतात हिऱ्याची पारख ज्या कोणाला असते ते त्यालाच कळते हिरा ज्यांना माहित नाही तो हिरा त्यांना गारगोटी प्रमाणेच वाटतो.
अभंग क्र. ७५८
अनुभवे अनुभव अवघाचि साघिला । तरि स्थिरावला मन ठायी ॥१॥
पिटूनिया मुसे आला अळंकार । दग्ध ते असार होऊनिया ॥धृपद॥
एकचि उरले कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयी ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥३॥
अर्थ
अनुभवाने ( संत संगतीने हे समजले की सर्व भूत मात्रा देवाचे स्वरूप आहे) सर्व अनुभव साधला (सर्व जगात हरिरूप आहे) म्हणून मन एक जागी स्थिरावले. हिणकस सोने मुशीत घालून गरम केले जाते त्यामुळे हिणकस पणा नाहीसा होऊन शुध्द सोनेच उरते. त्याच प्रमाणे आम्हीही तापून निघालो आहे आता फक्त काया, वाचा, मन हेच उरले आहे. आता फक्त आंनद उरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या विठोबाचे फक्त दास म्हणून उरलो आहोत म्हणून आम्ही संसार जिंकला आहे.
अभंग क्र. ७५९
ऐसिया संपत्ती आम्हा संवसारी । भोगाचिया परि काय सांगो ॥१॥
काम तो कामना भोगीतसे देवा । आलिंगणे हेवा चरण चुंबी ॥धृपद॥
शांतीच्या संयोगे निरसला ताप । दुसरे ते पाप भेदबुद्धी ॥२॥
तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे । आपुले पारिखे निरसले ॥३॥
अर्थ
आम्हाला या संसारात अमाप संपत्ती लाभली आहे ती संपत्ती म्हणजे या विठ्ठलाचे प्रेम आहे, त्याचे आम्ही आंनदाने भोग घेत आहो. याचे वर्णन कसे करावे ? आमच्या सर्व कामना इच्छा देवाचे भोग घेत आहेत, त्या विठ्ठला आम्ही आलिंगन देऊन त्याच्या चरणाचे आम्ही चुंबन घेतो. आमची वृत्ती शांत झाली आहे त्या योगे आमचा ताप निरसला आहे व पापाचे निरसन होऊन आमची सर्व भेद बुद्धी संपली आहे. तुकाराम महाराज म्हणतात जिकडे पाहवे तो विठ्ठलच तिकडे दिसतो त्यामुळे आमचे व परक्याचे हे भेदच संपून गेले आहे.
अभंग क्र. ७६०
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एकचि सकळ दुजे नाही ॥१॥
मंगळावाचूनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एकी रासी ॥धृपद॥
मोडले हे स्वामी ठायाठाव सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगे ॥२॥
तुका म्हणे अवघे दुमदुमिले देवे । उरले ते गावे हेचि आता ॥३॥
अर्थ
आता हे सर्व राज्य रामरूप झाले आहे, सर्व प्रजा रामरूप झाली आहे, सर्वत्र राम रूपच आहे, हे सगळे एकच आहे दुसरे काही नाही. माझी वाणी हि एक हरिनाम रूपी माल वाटणारी खान झाली आहे त्यामधून फक्त हरिरूप मंगळ वाणी प्रकट होत आहे. या अवस्थेमुळे “मी दास व तो स्वामी” हा भाव हि नाहीसा झाला, आता कशाची इच्छा वाढवावी ? तुकाराम महाराज म्हणतात आता सर्व जग हे ईश्वर रूप बनले आहे त्यामुळे माझ्या अंतःकरणातून फक्त हरीचे प्रेम बाहेर पडते व तेच मी गातो.
अभंग क्र. ७६१
निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरी ते ॥१॥
जयाचा विभाग तयासीच फळे । देखणे निराळे कौतुकासी ॥धृपद॥
शूर तो ओळखे घायडायहात । येरा होईल मात सांगायाची ॥२॥
तुका म्हणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानी जानवसा ॥३॥
अर्थ
भक्तीचे अनेक प्रकार आहेत, ते निवडून काढावे व ज्याला ज्या प्रकारची आवड आहे त्याने त्याचा स्वीकार करावा. ज्याची जशी भक्ती असेल तसी त्याला फळाची प्राप्ती होईल, कवतुकाने पाहणाऱ्यास त्याला त्याचा आंनद मिळणार नाही. जो वीर असतो त्याला युद्धातील सर्व डाव पेच हे माहित असतात, इतरांना ती केवळ एक सांगण्यापूरती असते. तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी नवीन लग्न झालेल्या वधू प्रमाणे आहे नीज स्वरूपरुपी नवीन घरात राहण्याचा तिने निश्चय केला आहे, म्हणून मी जे काही बोलतो ते श्री हरीच्या कृपेने.
अभंग क्र. ७६२
याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आता निश्चिंतीने पावलो विसावा । खुंटलिया धावा तृष्णेचिया ॥धृपद॥
कवतुक वाटे जालिया वेचाचे । नांव मंगळाचे तेणे गुणे ॥२॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी ॥३॥
अर्थ
परमेश्वराची साधना आयुष्य भर केली ती याच साठी की शेवटचा दिवस गोड व्हावा. आता मी निश्चिंत होऊन विश्रांती पावलो आहे, आता सर्व प्रकारची हाव संपली आहे. मला तर याचेच मोठे कवतुक वाटते कि या हरीचे मंगल नाम मी सदैव घेतले त्या निमित्ताने मला आत्ता प्राप्त झालेले सध्या आणि माझी अवस्था याबद्दल असून मला जास्त कौतुक वाटत आहे पूर्वी मला हरिनाम घेण्याची वेड नव्हते त्या वेळेची अवस्था आणि आता हरिनामाने प्राप्त झालेली अवस्था याचे मला जास्त कौतुक वाटते आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मुक्तीशी लग्न केले आहे, उरलेले काही दिवस खेळी मेळी घालवायचे.
अभंग क्र. ७६३
भक्तीचिया पोटी रत्नाचिया खाणी । ब्रम्हीची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥
माउलीचे मागे बाळकांची हारी । एका सूत्रे दोरी ओढतसे ॥धृपद॥
जेथील जे मागे ते रायासमोर । नाहीसे उत्तर येत नाही ॥२॥
सेवेचिये सत्ते धनीच सेवक । आपुले ते एक न वंची काही ॥३॥
आदिअंत ठाव असे मध्यभाग । भोवते भासे जग उच्चासनी ॥४॥
भावारूढ तुका झाला एकाएकी । देवचि लौकिकी अवघा केला ॥५॥
अर्थ
भक्तीच्या पोटात ब्रम्हपद, ज्ञान या रत्नांच्या खाणी आहेत. ज्या प्रमाणे आईच्या मागे बालकांची रीघ असते त्या प्रमाणेही या विठ्ठलच्या मागे भक्तांची रांग असते. राजा समोर कोणी काही जरी मागितले तर ते राजा देतो, तो कधीही नाही म्हणत नाही त्याच्या कडे नाही हे उत्तर नसते. सेवकाने जर धन्याची मनापासून सेवा केली तर तोच सेवक काही कालांतराने धनी बनतो कारण राजा त्याच्या सेवेला आतिशय भारावलेला असतो व त्याला सर्व अधिकार द्यायलाही काहीच विचार करत नाही. त्या प्रमाणे देवाच्या सेवेला जो कोणी नाही म्हणत नाही तो परमेश्वर त्याला ते सर्व अधिकार देतो मग तो सेवक एकदा कि उच्चासनावर बसला तर त्याला सर्व आदी मध्य अंत (उत्तम मध्यम कनिष्ट) कळते, तुकाराम महाराज म्हणतात मी भक्ती भावाच्या बळावर सिंहासनावर आरूढ झालो आहे, साऱ्या लौकिक गोष्ठी मला देव रूपच दिसत आहेत.
अभंग क्र. ७६४
सांगता दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटी कैचा घडे ॥१॥
भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्या सादर चित्त कथे ॥धृपद॥
नाइकवे कानी साधन उपाय । ऐकतो गाय हरुषे गीत ॥२॥
नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामिमना हरीकथेचा ॥३॥
काळाच्या साधना कोणा अंगी बळ । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥४॥
तुका म्हणे आम्ही खेळो भातुकुले । विभागासी मुले भोळी येथे ॥५॥
अर्थ
दुर्लभ अश्या ज्ञानाच्या गोष्टी सांगायलाच आहे, तर मग याचा अनुभव हृदयात येणे किती अवघड आहे ? भजनाचे सहाय्य घेतले तर अज्ञानी लोकांच्या दुःखाचा परिहार होतो. त्यांनी या साधना शिवाय इतर साधना ऐकू सुद्धा नाही हरी गीत ऐकून हर्षाने आंनदाने ते गीत गावे. रानावनात जाऊन कष्ट करण्याची काही गरजच नाही, आणि ते सध्य हि होणार नाही, परंतु तामसी माणसाला हरिकथा ऐकता ऐकता वेध लागतो. दीर्घकाळाने प्रयत्न करून प्राप्त होणारी साधना हि करणे अवघड आहे त्या साठी कोणाच्या अंगात तेवढी शक्ती आहे ? हरी भजनाला आठही प्रहर शुभ असतात. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही हरिनामाचे खेळ खेळू, त्या खेळात भोळी पोरे भाग घेतात.
अभंग क्र. ७६५
जाणपण बरे देवाचे ते शिरी । आम्ही ऐसी बरी नेणतीच ॥१॥
देखणियापुढे रुचे कवतुक । उभयता सुख वाढतसे ॥धृपद॥
आशंकेची बाधा नाही लडिवाळा । चित्त वरी खेळा समबुद्धी ॥२॥
तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशी खेळा ठाव झाला ॥३॥
अर्थ
ज्ञानी पण हे देवाच्या जवळ असलेला बरा, आम्ही असेच अज्ञानी बरे आहोत. शाहण्या लोकापुढे लहान मुळे खेळ खेळतात त्याचे सुख हे त्या शहाण्या माणसांना व त्या मुलांना दोघानाही होते. शंकेची बाधा हि लडिवाळ मुलांना नसते त्यांचे संपूर्ण लक्ष हे खेळा कडेच असेते. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांना सर्व दिशा सर्व काळ मोकळ्या असतात.
अभंग क्र. ७६६
वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥
जाता घरा मागे उरो नेणे खंती । मिळाल्या बहुती फांकलिया ॥धृपद॥
उदयीच अस्त उदये संपादिला । कल्पनेचा केला जागेपणे ॥२॥
जाणवूनि गेला हांडोरिया पोरा । सावध इतरा करुनी तुका ॥३॥
अर्थ
लहान मुले जर भातुकलीचा खेळ खेळावयास जमली तर त्यांचे सगळे पदार्थ हे शब्दांनीच तयार होतात. ते खरे असते का ? तो खेळ संपल्यावर मुले घरी निधून जातात व नंतर त्यांच्या मनात तो भातुकलीचा खेळ देखील राहत नाहि. दिवसा ते आपल्या कल्पनेनेच रात्र झाली असे मानून झोपतात थोड्या वेळाने दिवस उगवला आहे असे कल्पना करून उठतात. तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचाचा असाच खेळ आहे म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे तुम्ही सावध व्हा हरी नाम घ्या.
अभंग क्र. ७६७
याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलो परि पाळिले वचन । केलियाचा प्रश्न तुह्मी संती ॥धृपद॥
संवसारे जालो अतिदुःखे दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥२॥
दुष्काळे आटिले द्रव्ये नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली ॥३॥
लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे । वेवसाय देख तुटी येता ॥४॥
देवाचे देऊळ होते ते भंगले । चित्तासी जे आले करावेसे ॥५॥
आरंभी कीर्तन करी एकादशी । नव्हते अभ्यासी चित्त आधी ॥६॥
काही पाठ केली संतांची उत्तरे । विश्वासे आदरे करोनिया ॥७॥
गाती पुढे त्यांचे धरावे धृपद । भावे चित्त शुद्ध करोनिया ॥८॥
संताचे सेविले तीर्थ पायवणी । लाज नाही मनी येऊ दिली ॥९॥
ठाकला तो काही केला परउपकार । केले हे शरीर कष्टवूनी ॥१०॥
वचन मानिले नाही सुहृदांची । समूळ प्रपंचे वीट आला ॥११॥
सत्यअसत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता ॥१२॥
मानियेला स्वप्नी गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामी ॥१३॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥१४॥
निषेधाचा काही पडिला आघात । तेणे मध्ये चित्त दुखविले ॥१५॥
बुडविल्या वह्या बैसलो धरणे । केले नारायणे समाधान ॥१६॥
विस्तारी सांगता बहुत प्रकार । होईल उशीर आता पुरे ॥१७॥
आता आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळो आले ॥१९॥
तुका म्हणे माझे सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगे ॥२०॥
अर्थ
मी शुद्र असलो, माझा व्यवसाय हा शुद्र असला तरी मी या विठोबाला पूज्य देव मनाला आहे. खरे म्हणजे हि गोष्ट सांगण्याची नाहि, परंतु तुम्ही संतानी हा प्रश्न केला म्हणून मी उत्तर देतो. संसाराला मी खरे मानल्या मुळे अति दुखी झालो आहे, शेवटी माझे आई बापही मला सोडून गेले. दुष्काळाने गरिबी आली समाजातील मान संपला, पत्नी अन्ना अचून मरण पावली. सर्व बाजूने आलेल्या संकटाने मी अतिशय दुखी झालो, माझी मलाच लाज वाटू लागली या वेळी धंद्यात तुट होऊ लागली. देऊळ पडके झाले त्याचा जीर्णोद्धार करावे अशी इच्छा मनात होती. प्रारंभी मी एकादशीच्या दिवशी कीर्तन करायाल सुरुवात केली, परंतु कीर्तनाच्या अभ्यासात माझे लक्षच लागत नव्हते. मग मीच मनाला समजावले, संताची वचणे पाठ केली. कीर्तने मध्ये जे कोणी ईश्वराचे वर्णन हर्षाने करणारे होते, त्याच्या पाठी मागे उभा राहून मी धृवपद म्हणत असायचो. संतांचे चरण तीर्थ पीत असे त्याची मला लाज नाही. माझ्या हातून होईल तेवढे उपकार मी करत होतो इतरांची सेवा करत होतो. म्हणून माझ्या शरीराला त्रास होत होता. मी आता माझ्या नातेवाईकांची वचने खरी न मानता संतांची वचने खरी मानली. लोकाचा खोटे पणा पाहून मला त्यांचा वीट आला. खरे आणि खोटे काय मी माझे ठरविले. या बाबतीत लोक काय म्हणतात याचा मी विचार करत नव्हतो. स्वप्नात मला सद्गुरूने मला उपदेश केला त्याचा मी अंगीकार केला नामावर विश्वास ठेवला. नंतर मला अभंगाची स्पुर्ती हृदयातून झाली. हरीचे चरण कमल मी घट्टधरले. काही लोकांनी माझा निषेध केला माझ्यावर अनेक प्रकारचे घात केले. त्याने माझे मन दुखावले होते. मी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या ह्या इंद्रायणी जळात बुडविल्या त्या वेळी मी तेरा दिवस तुमच्या जवळ धरणे धरून बसलो देवा, त्यावेळी तुम्ही माझे समाधान केले. आता मी सविस्तर जर सर्व सांगत राहिलो तर फार उशीर होईल देवा, आता पूरे झाले. आता आहे तसे आहे, पुढे काय होणार हे विठ्ठलाला माहित आहे. हा हरी माझ्या सारख्या भक्तांची कधी नुपेक्षा करणारा नाही हे मला माहित आहे, तो फार कृपावंत आहे हे हि मला कळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व जीवन हे पांडुरंगच आहे, व इथे मी जे काही बोलतो आहे ते सर्व त्याच्या कृपेनेच बोलतो आहे.
अभंग क्र. ७६८
ऐका वचन हे संत । मी तो आगळा पतित । काय काजे प्रीत । करीतसा आदरे ॥१॥
माझे चित्त मज ग्वाही । सत्य तरलो मी नाही । एकाचिये वांही । एक देखी मानिती ॥धृपद॥
बहु पीडिलो संसारे । मोडी पीसे पिटी ढोरे । न पडता पुरे । या विचारे राहिलो ॥२॥
सहज सरले होते काही । द्रव्य थोडे बहु ते ही । त्याग केला नाही । दिले द्विजा याचका ॥३॥
प्रियापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज जालो मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥
तोंड न दाखवावे जना । शिरे सांदी भरे राणा । एकात तो जाणा । तयासाठी लागला ॥५॥
पोटे पिटिले काहारे । दया नाही या विचारे । बोलाविता बरे । सहज म्हणे यासाठी ॥६॥
सहज वडिला होती सेवा । म्हणोनि पूजितो या देवा । तुका म्हणे भावा । साठी झणी घ्या कोणी ॥७॥
अर्थ
हे संतानो मी एक पतित आहे, तुम्ही माझ्या वर ऐवढी प्रीती का बरे करता तेही आदराने, मी काय म्हणतो ते ऐका. माझे मन मला साक्षी आहे कि मी अजून हि या संसारातून तरलो नाही, एकाने मला मानके कि त्या पाठोपाठ मला दुसरा मानतो. या संसाराने मला फार पिडा होत आहे, मी शेतीत गेलो कि गुरु ढोरे यांना मी मारतो, हे करून देखील मला संसारात कमी पडते. त्या वेळेला मला परमार्थाने मला स्वस्थ केले. माझ्या कडे जे काही थोडे फार द्रव्य होते ते हि संपून गेले व उरलेले थोडे धन त्याच त्याग न करता ते मी जे याचक ब्राम्हण असयाचेत्यांना मी ते द्रव्य दिले. माझे पत्नी, मुले, बंधू यांना मी तोंड दाखविण्याच्या सारखा राहिलो नाहि इतका मी भाग्यहीन झालो. कोणालाही तोंड दाखवू वाटेना, कुठे सांदि कोपऱ्या मध्ये जाऊन बसावे असे वाटे, मग एकात आवडू लागला. मला भूक लागली तेव्हा घरात काही नसल्याने मी निर्दयी झालो, कोणी हि मला जेवायला बोलावले तर मी हो म्हणू लागलो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वाड वडिलांनी या पांडुरंगाची पूजा केली ती मी पुढे चालू ठेवली त्यामुळे या भावामुळे कोणीही मला महत्व देवू लागले.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















