आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२० मार्च, दिवस ७९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ९३७ ते ९४८
“२० मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २० March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २० मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९३७ ते ९४८ चे पारायण आपण करणार आहोत.
२० मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १२६ ते १५०,
126-7
येऱ्हवी ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझे । हे न म्हणावे परी काय कीजे । न बोलणे बोलो ॥126॥
येऱ्हवी ज्ञानी ज्याला म्हणतात; तो केवळ माझा जीव की प्राण होय. हे सांगू नये, पण काय करावे ? ही न बोलण्याची गोष्ट तुला प्रसंगोपात सांगितली.
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ॥7. 19॥
127-7
जे तो विषयांची मोट झाडी । माजी कामक्रोधांची सांकडी । चुकावूनि आला पाडी । सद्वासनेचिया ॥127॥
जो विषयरूप दाट झाडीतून कामक्रोधादिक संकटे टाळून व सद्वासनेच्या पहाडावर चढून आला
128-7
मग साधुसंगे सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृतीचा अव्हांटा । डावलूनि ॥128॥
नंतर, हे वीरश्रेष्ठा अर्जुना, साधूंच्या संगतीने, सत्कर्माच्या सरळ वाटेने; दुराचरणाच्या आडमार्गाला डावलून, ,
129-7
आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविचि आस्थेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥129॥
आणि आस्थेच्या (फलाशेच्या) वाहणा पायात न घालता शेकडो जन्म भक्तीची वाट चालणारा जो ज्ञानी भक्त तो फलाच्या हेतूंचा का हिशेब करील ?
130-7
ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजी धावता सडिया आयती । तव कर्मक्षयाची पाहती । पाहाट जाली ॥130॥
याप्रमाणे शरीसंबंधी अज्ञानरूप रात्रीत उपाधिरहीत वाट चालत असता सहज कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पहाट होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-7
तैसीच गुरुकृपा उखा उजळली । ज्ञानाची ओतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥131॥
त्याच वेळेस गुरुकृपारूप उषःकाल होतो आणि मग ज्ञानरुप सुर्याची कोवळी किरणे पडून समदृष्टीचे ऐश्वर्य त्याच्या दृष्टीस पडते.
132-7
ते वेळी जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एकु आहे । अथवा निवांत जरी राहे । तऱ्ही मीचि तया ॥132 ।
त्या वेळी तो जिकडे जिकडे पाहातो, तिकडे तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही. अथवा तो जरी स्वस्थ बसला, तरी त्याला मीच दिसतो.
133-7
हे असो आणिक काही । तया सर्वत्र मीवाचूनि नाही । जैसे सबाह्य जळ डोही । बुडालिया घटा ॥133 ।
फार काय सांगावे ? त्याला सर्व ठिकाणी माझ्यावाचून दुसरे काही दिसत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या घटाच्या आत व बाहेर पाणीच असते,
134-7
तैसा तो मजभीतरी । मी तया आंतु बाहेरी । हे सांगिजे बोलवरी । तैसे नव्हे ॥134॥
त्याप्रमाणे तो माझ्या आत व मी त्याच्या अंतर्बाह्य आहे; हे बोलून दाखविण्यासारखे नाही.
135-7
म्हणोनि असो हे इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणे संसरलेनि करी । आपु विश्व ॥135॥
म्हणून ते असो. याप्रमाणे त्याला ज्ञानाची वखारच दृष्टीस पडते; आणि तो जिकडे जिकडे संचार करितो, तिकडे तिकडे त्याला आपणच विश्व आहो असे भासते.
136-7
हे समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो । म्हणोनि भक्तामाजी रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥136॥
या सर्व विश्वांत वासुदेव भरला आहे असा त्याचा पुर्ण अनुभव असतो, म्हणून भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी होय.
137-7
जयाचिये प्रतीतीचा वाखौरा । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥137॥
धनुर्धरा, ज्याच्या अनुभवाच्या वखारीत सर्व चराचर विश्व सांठविले आहे, असा हा महात्मा फार दुर्लभ आहे.
138-7
येर बहु जोडती किरीटी । जयांची भजने भोगासाठी । जे आशातिमिरे दृष्टी- । मंद जाले ॥138॥
ज्याच्याशिवाय, अर्जुना, पुष्कळ मला भजतात, पण त्यांची भक्ती फक्त विषयसुखाशेने असते; कारण आशातिमिराने त्यांची दृष्टी विषयांध झालेली असते.
कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना:प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ॥7. 20॥
139-7
आणि फळाचिया हावा । हृदयी कामा झाला रिगावा । की तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥139 ।
आणि फलाच्या इच्छेने त्याच्या ह्रदयात कामाचा रिघाव झाला की, त्याच्या संसर्गाने ज्ञानरुपी दिवा मालवतो.
140-7
ऐसे उभयता आंधारी पडले । म्हणोनि पासीचि माते चुकले । मग सर्वभावे अनुसरले । देवतांतरा ॥140॥
अशा रीतीने त्यांना अंतर्बाह्य अंधार होतो, म्हणून मी त्यांच्याजवळ असुनही ते मला अंतरतात, आणि मग सर्व भावाने इतर देवांना भजू लागतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-7
आधीच प्रकृतीचे पाईक । वरी भोगालागी तव रंक । मग तेणे लोलुप्ये कौतुक । कैसे भजती ॥141॥
अगोदर ते मायेच्या आधीन झालेले, आणि त्यात फलप्राप्तीकरिंता दीन झालेले, मग काय ? ते मोठ्या कौतुकाने लंपट होऊन देवांची कशी भक्ती करितात
142-7
कवणी तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि । का अर्पण यथाविधि । विहित करणे ॥142॥
कोणत्या नियमाने व उपचारद्रव्याने, तसेच यधाविधि, त्याला काय वस्तु अर्पण केल्या पाहिजेत इकडे लक्ष देऊन, जे जे उपचार त्याला आवडत असतील ते ते करतात !
योयो यां यां तनुं भक्त:श्रद्धयार्चितुमिच्छति l
तस्य तस्याचलां श्रद्धा तामेव विदधाम्यहम् ॥7. 21 ।
143-7
पै जो जिये देवतांतरी । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥143॥
परंतु जो जो ज्या ज्या देवतेची फलाकरिता उपासना करितो, त्याची ती इच्छा मीच पुरवितो.
144-7
देवोदेवी मीचि पाही । हाही निश्चय त्यासि नाही । भाव ते ते ठायी । वेगळाला धरी ॥144॥
हे पहा की, देव-देवी मीच आहे; परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो, म्हणून त्या त्या देवतांचे ठिकाणी त्याचा निरनिराळा भाव असतो.
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ॥7. 22॥
145-7
मग श्रद्धायुक्त । तेथिचे आराधन जे उचित । ते सिद्धिवरी समस्त । वर्तो लागे ॥145॥
मग त्यांना ज्या ज्या देवतेची श्रद्धा असेल, त्या त्या देवतेचे, आपली कार्यसिद्धी होईपर्यंत, ते यथाविधि पूजन करितात.
146-7
ऐसे जेणे जे भाविजे । ते फळ तेणे पाविजे । परी तेही सकळ निपजे । मजचिस्तव ॥146॥
याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते त्याला प्राप्त होते, परंतु ते सर्व माझ्यापासूनच मिळते
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥7. 23 ।
147-7
परी ते भक्त माते नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती । म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥147॥
परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते आशापाशांतून मुक्त होत नाहीत, (त्यातच घोटाळतात) आणि म्हणूनच, नाशवंत अशी इच्छित फले प्राप्त होतात.
148-7
किंबहुना ऐसे जे भजन । ते संसाराचेचि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥148॥
किंबहुना अशा प्रकारचे हे भजन म्हणजे संसाराचे साधनच होय. बाकी त्याचा फलभोग म्हणजे स्वप्नातील क्षणिक सुखाप्रमाणेंच होय.
149-7
हे असो परौते । मग हो का आवडे ते । परी यजी जो देवतांते । तो देवत्वासीचि ये ॥149॥
हे एकीकडे राहू द्या. त्यांचे आवडते दैवत का असेना ? त्याने त्या देवतांचे पूजन केले म्हणजे तो देवत्वच पावतो.
150-7
येर तनुमनप्राणी । जे निरंतर माझेयाचि वाहणी । ते देहाचा निर्वाणी । मीचि होती ॥150॥
बाकी तनमन अर्पण करुन जे माझ्याच भक्तीमार्गाला लागले ते देहाती माझ्याकडे येतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ७९ वा, २०, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९३७ ते ९४८
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ९३७
माझी मेली बहुवरि । तू का जैसा तैसा हरी ॥१॥
विठो कैसा वांचलासि । आता सांग मजपाशी ॥धृपद॥
तुज देखताचि माझा । बाप मेला आजा पणजा ॥२॥
आम्हा लागलेसे पाठी । बालत्व तारुण्ये काठी ॥३॥
तुज फावले ते मागे । कोणी नसता वादिलागे ॥४॥
तुका म्हणे तुझ्या अंगी । मज देखता लागली औघीं ॥५॥
अर्थ
हे देवा आज पर्यंत माझे अनेक नातेवाईक मेली आहेत परंतु हे हरी तू जसा आहेस तसा च आहेस. हे विठोबा तू कसा वाचलास आज मला ते सांग ? अरे पांडुरंगा तुझ्या देखतच माझर वडील आजोबा पणजोबा हे सर्व मरून गेली. आमच्या मागे हि बालत्व आणि तारुण्याची अवस्था लागल्या आहे. देवा तुझ्या बरोबर मागे कोणीही वाद घालयला नव्हते त्यामुळे तुझे चांगले फावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा अरे तू प्रत्येक्ष असतांना माझी माझ्या आधीच्यांची हीच अवस्था आहे यातील रहस्य काय हे आता तू मला सांग.
अभंग क्र. ९३८
आणीक कोणाचा न करी मी संग । जेणे होय भंग माझ्या चित्ता ॥१॥
विठ्ठलावाचूनि आणीक जे वाणी । नाइके मी कानी आपुलिया ॥धृपद॥
समाधानासाठी बोलावी हे मात । परि माझे चित्त नाही कोठे ॥२॥
जिवाहूनि मज तेचि आवडती । आवडे ज्या चित्ती पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे माझे तोचि जाणे हित । आणिकाच्या चित्त नेदी बोला ॥४॥
अर्थ
ज्याच्या मुळे माझ्या हरी रूप चित्ताचा भंग होईल आश्या कोणाचाही मी संग करणार नाही. एका विठ्ठला वाचून मी दुसरे काहीही ऐकणार नाही म्हणजे मी फक्त विठ्ठलाचे माझ्या वाणीने नाम घेईन व कानाने त्याचेच नांव ऐकेन. व्यवहारा मध्ये मी जे काही बोलतो ते फक्त इतरांच्या समाधानासाठीच पण माझे चित्त इतर कशातही गुंतलेले नाही. ज्याच्या चित्ताला एक पांडुरंगा शिवाय दुसरे काहीच आवडत नाही ते माणसे मला माझ्या जीवा पेक्षाही ज्यादा आवडतात. एक विठ्ठल व संत यांच्या शिवाय माझे हित कोण जाणतात त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देतो व त्यांच्या बोलण्याशिवाय इतरांच्या बोलण्याकडे मी लक्ष सुद्धा देत नाही.
अभंग क्र. ९३९
आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हाचि गोसावी व्हावे तेणे ॥१॥
नाही तरी सुखे असावे संसारी । फजिती दुसरी करू नये ॥धृपद॥
आशा मारूनिया जयवंत व्हावे । तेव्हाचि निघावे सर्वातूनि ॥२॥
तुका म्हणे जरी योगाची तांतडी । आशेची बीबुडी करी आधी ॥३॥
अर्थ
चित्तातील विषय समूळ काढून त्याचा त्याग करावा तेंव्हाच त्याने गोसावी व्हावे नाहीतर संसारात सुखी राहावे वैराग्याचे ढोंग करून स्वतःची फजिती करून घेऊ नये. चित्ताती आशा मारून विजयी व्हावे मग सर्व बंधनातून बाहेर पडावे. तुकाराम महाराज म्हणतात जर तुला योग सध्या करून घ्यायचा असेल तर तू आधी तुझ्या मनातील आशेचा नाश कर.
अभंग क्र. ९४०
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुको नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास । पाहो नये वास आणिकाची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाही ऐकिला ऐसा कोणी ॥३॥
अर्थ
या विठ्ठलच्या ठिकाणी निष्ठावंत भक्ती भाव असणे हाच भक्तांचा स्वधर्म आहे हे वर्म भक्तांनी कधीही चुकवू देवू नये. विठ्ठलच्या ठिकाणी निष्काम व निश्चल विश्वास ठेवावा व इतरांचा वास व वाटकधीच पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात असा कोणता भक्त आहे की, देवाने त्याची उपेक्षा केली आहे ? असे मी कधी ऐकले देखील नाही.
अभंग क्र. ९४१
नामाचे चिंतन प्रगट पसारा । असाल ते करा जेथे तेथे ॥१॥
सोडवील माझा स्वामी निश्चयेसी । प्रतिज्ञा हे दासी केली आह्मी ॥धृपद॥
गुण दोष नाही पाहात कीर्तनी । प्रेमे चक्रपाणी वश्य होय ॥२॥
तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥३॥
अर्थ
तुम्ही जेथे असाल तेथे नामचिंतनाचा उघड उघड प्रसार करा. मग तुम्हाला बंधनातून माझा स्वामी म्हणजे हा परमात्मा निश्चिंत सोडवील हे आम्ही त्याचे दास प्रतिज्ञा करून सांगतो. कोणीही कीर्तन म्हणजे हरी चिंतन करणारा असो तो कुठल्याही प्रकरचे गुण व दोष पाहत नाही त्याला प्रेमाने आळविले म्हणजे तो आपला अंकित होतो. तुकाराम महाराज म्हणतात या हरी कीर्तना मध्ये इतके प्रेम आहे कि हा प्रपंच कडू वाटू लागतो व कीर्तन ऐकल्यावर अंगावर रोमांच उठतात त्यामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होऊन कंठ दाटून येतो.
अभंग क्र. ९४२
किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठी ॥१॥
लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥धृपद॥
उपजल्या पिंडा मरण सांगाते । मरते उपजते सवेचि ते ॥२॥
तुका म्हणे माळ गुंतली राहाटी । गाडग्याची सुटी फुटलिया ॥३॥
अर्थ
या काळाचा किती वळसा सोसावा ? कोठेही जा तरी हा काळसारखा पाठीमागे असतो. आहो या पांडुरंगाला शरण जाऊन तुम्ही आम्ही या चौऱ्यांशी लक्ष योनी तून आपली सोडवणूक करू घ्या. जन्म झाला कि मृत्यू होतो आणि मृत्यू झाला कि पुन्हा जन्म होतो. तुकाराम महाराज म्हणतात गाडग्याची माळ जशी असते एक खाली आला कि दुसरा भरतो आणि एखादे गाडगे फुटले कि ते मुक्त होते त्याप्रमाणे आपल्यातून द्वैताचा नाश झाला कि आपण हि मुक्त होऊ.
अभंग क्र. ९४३
नाम म्हणता मोक्ष नाही । ऐसा उपदेश करितील काही । बधिर व्हावे त्याचे ठायी । दुष्ट वचन वाक्य ते ॥१॥
जयाचे राहिले मानसी । ते चि पावले तयासी । चांचपडता मेली पिसी । भलतैसी वाचाळे ॥धृपद॥
नवविधीचा निषेध । जेणे मुखे करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥२॥
काय सांगो वेळोवेळा । आठव नाही चांडाळा । नामासाठी बाळा । क्षीरसागरी कोंडिले ॥३॥
आपुलिया नामासाठी । लागे शंखासुरापाठी । फोडोनिया पोटी । वेद चारी काढिले ॥४॥
जगी प्रसिद्ध हे बोली । नामे गणिका तारिली । आणिके ही उद्धरिली । पातकी महादोषी ॥५॥
जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाच्या चित्ती । जळता बुडता घाती । राखे हाती विषाचे ॥६॥
काय सांगो ऐशी कीर्ती । तुका म्हणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती ती एके ॥७॥
अर्थ
नाम घेतल्यावर मोक्ष मिळत नाही असे जर कोणी सांगत असेल तर आपण बधीर व्हावे म्हणजे आपण आपल्या कानात बोटे घालावीत व त्या दुष्टाचे बोलणे ऐकू नये. या नामाने मानतील इच्छा पूर्ण होतात जे ज्याला हवे ते मिळते व जे नाम घेत नाही असे मूर्ख बडबडून मृत्यू पावतात. आहो नवविधी भक्तीचा जे निषेध करतात व उगाच त्याविषयी वाद घालतात असे जन्मला जरी आले तरी ते निंद्य आहेत त्याचे जीवन सुकरच्या जातीचे असते. अश्या या माणसांना किती वेळा सांगावे या चांडाळाना किती वेळा समजून सांगावे ? यांना आठवत का नाही कि या नामामुळेच श्रीहरीने उपमन्यु बाळाला दुधाच्या सागरात कोंडले होते. आपल्या नामासाठी या हरीने शंखसुरा मागे लागून त्याचे पोट फाडून चार वेद परत मिळवले होते. या नामचा महिमा जग प्रसिद्ध आहे सगळीकडे नामाचा बोलबाला आहे नाम चिंतना मुळे गणिकेचा उद्धार झाला आहे व अनेक कित्तेक असे आहेत कि या नामामुळे त्यांचा उधार झाला आहे नामामुळे अनेक पातकी व महादोषी हे नामामुळे तरले. पुराणात अनेक वर्णन आहे प्रल्हादाने नुसते नारायण नाम धरण केले तर हरीने त्याचे अग्नी पाण्यापासून त्याचे रक्षण केले विष पासून रक्षण केले. तुकाराम महाराज म्हणतात आहो या नामाची कीर्ती किती सांगावी जे नामाचा निषेध करतात ते नरकात जातात.
अभंग क्र. ९४४
गासी तरि एक विठ्ठलचि गाई । नाही तरि ठायी राहे उगा ॥१॥
अद्वैती तो नाही बोलाचे कारण । जाणीवेचा सीण करिसी वाया ॥२॥
तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाही चित्ती निलाजिरा ॥३॥
अर्थ
गायचे जर असेल तर एक विठ्ठल नाम गा नाहीतर एकाजागी स्वस्त बसून राहा. अद्वैत असणाऱ्या हरी बद्दल काही बोलता येत नाही मग जर त्याचे मूळ स्वरूप जाण्याचे म्हंटले तर मग व्यर्थ सीन होतो. तुकाराम महाराज म्हणतात या माणसांची किती फजिती करावी या लोकांना लाज नाहीत.
अभंग क्र. ९४५
जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥
शत्रु तो म्या केला न म्हणे आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावे ॥२॥
जयासी नावडे विठोबाचे नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥३॥
अर्थ
ज्याच्या वाणीत विठ्ठलाचे नाम येत नाही त्याचे शब्दही मला आवडत नाही त्याचे मी शत्रुत्व मी पत्करून त्याला मी आपले मानत नाही जोविठ्ठलाला विरोधों आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला विठोबाचे नाम हि आवडत नाही तो अधम समजावा.
अभंग क्र. ९४६
आम्हासी तो नाही आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥
घालूनिया कास करितो कैवाड । वागो नेदी आड कळिकाळासी ॥धृपद॥
अबद्ध वाकुडे जैशातैशा परी । वाचे हरी हरी उच्चारावे ॥२॥
तुका म्हणे आम्हा सापडले निज । सकळा हे बीज पुराणांचे ॥३॥
अर्थ
आमचे काम हे विठोबाशी आहे विठोबाच्या नामाशी आहे बाकीच्यांशी आमचे काही प्रमाण नाही. कंबर कसून मी विठ्ठलचा भक्त आहे असे घोषित करतो बाकी मग मी कळीकाळाला सुद्धा माझ्या माझ्या समोर फिरकू देणार नाही. हरी नाम जसे येईल मग ते वाकडे तिकडे का होईना घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला विठोबारायाचे हे पुराणातील बीज सापडले आहे.
अभंग क्र. ९४७
जीव तोचि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ति पाखांड्याची ॥१॥
पिंडाच्या पोषके नागविले जन । लटिके पुराण केले वेद ॥धृपद॥
मना आला तैसा करिती विचार । म्हणती संसार नाही पुन्हा ॥२॥
तुका म्हणे पाठी उठती यमदंड । पापपुण्य लंड न विचारीती ॥३॥
अर्थ
पाखंडी माणसांची वृत्ती म्हणजे जीव म्हणजे मी देव भोजन म्हणजे भक्ती आणि मरण म्हणजे मुक्ती अशी असते. या पिंडाला म्हणजे देहाला सांभाळणाऱ्या लोकांनी लोकांची फसवणूक करू वेद व पुराणांना खोटे ठरविले. असे पाखंडी मनाला येईल ते विचार करतात व म्हन्रतात संसार पुन्हा पुन्हा नाही म्हणजे जन्म मरण पुन्हा पुन्हा नाही. असे लंड (महाराजांनी धिक्कारार्थी उच्चारलेला शब्द) माणसे यांच्या पाठीवर यम दंड उठणार आहे कि जी पाप पुण्य याचा विचार देखील करत नाही.
अभंग क्र. ९४८
भक्तांचा महिमा भक्तचि जाणती । दुर्लभ या गति आणिकासी ॥१॥
जाणोनि नेणते जाले तेणे सुखे । न बोलोनि मुखे बोलताती ॥धृपद॥
अभेदूनि भेदू राखियेला अंगी । वाढावया जगी प्रेमसुख ॥२॥
टाळघोळ कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥३॥
तुका म्हणे हे तो आहे तया ठावे । तीही एक्या भावे जाणीतला ॥४॥
अर्थ
भक्तांचा महिमा भक्तच जाणतात पण दुसऱ्याना हे समाजाने कठीण आहे. सर्व जाणून हि ते जाणत नाही असे दाखवितात व न बोलताही मुखाने बोलतात. देव जाणूनही ते आपल्या ठिकाणी सेवकत्व बाळगतात कारण जगामध्ये भक्ती प्रेमाचा सुकाळ वाढवा असे त्यांना वाटते. हे असे ज्ञानी लोक टाळघोष करून कथा करून प्रेमाचा सुकाळ करतात कारण मूर्ख या या भवसागरातून तरावा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने हा ऐक्यभाव जाणला असेल त्यालाच भक्तीची स्थिती ठाऊक असते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















