आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१६ जानेवारी, दिवस १६, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी १०१ ते १२५, सार्थ तुकाराम गाथा अभंग १८१ ते १९२
“१६ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 16 January
राम कृष्ण हरी आज दिनांक 16 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
101-2
परी मूर्खपणे नेणसी । न चिंतावे ते चिंतीसी । आणि तूचि नीति सांगसी । आम्हाप्रति ॥101॥
या अज्ञानामुळे (मोहाने, मूर्खपणामुळे) तुला या गोष्टी समजत नाहीत. ज्याची चिंता करू नये, त्या गोष्टीची चिंता करत आहेस, मनात आणू नये ते तू आणतो आहेस; आणि उलट तूच आम्हाला नीतीच्या गोष्टी सांगत आहेस ! !
102-2
(आश्चर्यकारक)
देखै विवेकी जे होती । ते दोहीतेही न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनिया ॥102॥
(हे पार्थ ! ) हे पहा, जन्म आणि मृत्यू हा केवळ भ्रम आहे, जे (ज्ञानी विद्वान, विवेकी) विचारवंत आहेत ते या दोनोंचाहि शोक करत नाहीत.
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥2. 12॥
भावार्थ :–
एक लक्षात घे, मी, तू आणि हे सर्व राजे पूर्वी (भूतकाळात) नव्हतो असे नाही. भविष्यकाळात (आपल्या या देहाच्या मृत्यू नंतर) आपण सर्वजण असणार नाही, असेंहि नाही.
103-2
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥103॥
अर्जुना ! ! आणखी ऐक सांगतो, ते तू ऐक, पाहा येथे जमलेले आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे सगळेच, (आपण जे आहोत)
104-2
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाही ॥104॥
(आता आपण जसे आहोत तसेच) ते सर्वकाळ (निरंतर) असेच राहू किंवा लय (नाश होईल) पावू, याची (चिंता)भ्रांती सोड, कारण (मुळामध्ये, वास्तविक पाहता)या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत.
105-2
हे उपजे आणि नाशे । ते मायावशे दिसे । एर्हवी तत्त्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि ॥105॥
(मायेमुळे, भ्रांतीला वश झाल्यामुळे) जन्म आणि मृत्यू हे अनुभवास येतात, एरव्ही खरोखर (म्हणजेच वास्तवात) आत्मवस्तु (आत्मा) जी आहे, ती अविनाशी आहे.
106-2
जैसे पवने तोय हालविले । आणि तरंगाकार जाहले । तरी कवण के जन्मले । म्हणो ये तेथ ? ॥106॥
जसे वाऱ्यामुळे पाणी हलविले (जर वाऱ्यामुळे निर्माण झालेले तरंग) त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले; तर मग या ठिकाणी कोणाला व कुठें जन्म आला, असे म्हणता येईल. ?
107-2
तेचि वायूचे स्फुरण ठेले । आणि उदक सहज सपाट जाहले । तरी आता काय निमाले । विचारी पा ॥107॥
पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप (शांत) सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला ? याचा तूच विचार कर.
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥2. 13॥
भावार्थ :-
ज्याप्रमाणे जीवाला बाल्य, तरुण, आणि वार्धक्य या अवस्था प्राप्त होतात, त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते, (असे असल्यामुळे जो आत्मा हा अविनाशी आहे हे जाणतो) त्यामुळे धैर्यवान (विद्वान)पुरुषाला(मोहित होत नाही) जन्ममरणाची भ्रांती उत्पन्न होत नाही.
108-2
आइके शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ॥108॥
आणखी असे पाहा की, शरीर तर एकच आहे, परन्तु वयोमानाप्रमाणे त्यास अनेक अवस्था प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा तूच पाहा.
109-2
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यी ते भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवे ॥109॥
या शरीरावर बालपण उमटलेले दिसते, मग तारुण्यात तेच बालपण नाहीसे होते. अशा अवस्था बदलत असतात, पण(शरीर) तोच असतो, त्याचा नाश होत नाही.
110-2
तैसी चैतन्याच्या ठायी । इये शरीरांतरे होती जाती पाही । ऐसे जाणे तया नाही । व्यामोहदुःख ॥110॥
त्याचप्रमाणे हे पाहा, एका अविनाशी अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी निरनिराळे शरीर येतात व जातात, असे जो जाणतो (ज्याला समजते, ), त्याला भ्रांतिजन्य (अपूर्ण ज्ञानामुळे झालेले त्रास, दुःख) दुःख कधीहि होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥2. 14॥
भावार्थ :-
हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की, शीत-उष्ण, सुख-दुःख, इत्यादी द्वंद्व (अंतःकरणात) निर्माण होते (किंवा देणारे आहेत); उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत; म्हणून हे भारता ! त्यांना तू सहन केले पाहिजे.
111-2
एथ नेणावया हेचि कारण । जे इंद्रिया आधीनपण । तिही आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥111॥
इंद्रियांच्या आधीन झाल्यामुळे मानवाला ते समजत नाही(किंवा इंद्रियावर संयम राहिले नाही की), हेच एक कारण आहे आणि ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवितात; (किंवा आपल्यावर अधिकार गाजवतात)म्हणून (मानवाला) त्याला भ्रम निर्माण होते.
112-2
इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती । ते अंतर आप्लविती । संगे येणे ॥112॥
सुरुवातीस (प्रारंभी) इंद्रिये विषयांचे सेवन करतात. त्यामुळे सुख- दुःखे उत्पन्न होतात. मग ती (मिळालेली) सुख- दुःखे आपल्या संसर्गाने मानवाच्या अंतःकरणात (ग्रासून टाकतात) भ्रम निर्माण करतात.
113-2
जया विषयांच्या ठायी । एकनिष्ठता कही नाही । तेथ दुःख आणि काही । सुखही दिसे ॥113॥
ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयापासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते.
114-2
देखे शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारे ॥114॥
असे पाहा की, स्तुती आणि निंदा ही शब्दांची व्याप्ती आहे. कानांनी जर स्तुती ऐकली तर आनंद मिळतो पण, निंदा ऐकताच (अंतःकरणात) द्वेष निर्माण होतो.
115-2
मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगे कारण । संतोषखेदा ॥115॥
मृदूता आणि कठीणता, हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत; परंतु त्वचेच्या (ठिकाणी भासल्यास) संयोगाने संतोषाला आणि खेदाला कारण होतात.
116-2
भ्यासुर आणि सुरेख । हे रूपाचे स्वरूप देख । जे उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारे ॥116॥
तसेच, भेसूर आणि सुरेख ही दोन लक्षणे रूप या विषयीची आहेत. पण नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात.
117-2
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगे विषादु । तोषु देता ॥117॥
सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुखदुःख उत्पन्न करतात.
118-2
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥118॥
त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस असतो. एकातुन त्रास (नावड) आणि एकातून प्रीती (आवड) निर्माण होते. म्हणून विषयांची संगती मानवाला अधोगतीला (घेऊन जाते) नेणारी आहे.
119-2
देखे इंद्रिया आधीन होईजे । तै शीतोष्णाते पाविजे । आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपे ॥119॥
असे पाहा की, माणूस ज्यावेळी इंद्रियांच्या ताब्यात जातो, तेंव्हा त्याला शितोष्णाचा (द्वंद्वे निर्माण होणे) अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो सुखदुःखाच्या चक्रात सापडतो.
120-2
या विषयांवाचूनि काही । आणीक सर्वथा रम्य नाही । ऐसा स्वभावोचि पाही । इंद्रियांचा ॥120॥
पाहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की, त्यांना या विषयावाचून दुसरे काहीच (म्हणून आपण गुंतत जातो) गोड वाटत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-2
हे विषय तरी कैसे । रोहिणीचे जळ जैसे । का स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥121॥
मग हे (इंद्रियांचे स्वभाव)विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक (म्हणजे खरे नसते, कल्पना) किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती, वगैरे जसा केवळ भासमय असतो.
122-2
देखै अनित्य तियापरी । म्हणौनि तू अव्हेरी । हा सर्वथा संगु न धरी । धनुर्धरा ॥122॥
अशाप्रकारे हे विषय क्षणभंगुर आहेत; याकरिता हे धनुर्धरा, तू त्यांचा (विषयांचा) त्याग कर. त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. (संगती करू नकोस)
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥2. 15॥
हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना ! ! ज्याला इंद्रिय आणि विषयसंबंध व्याकुळ करीत नाहीत, त्याला सुख-दुःख समान (होतात) आहेत. असा तो विवेकवंत (धीर) पुरुष मोक्षप्राप्तीला योग्य होतो.
123-2
हे विषय जयाते नाकळिती । तया सुखदुःखे दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाही तया ॥123॥
जो पुरुष या विषयांच्या आधीन (तावडीत) होत नाही, त्याला सुखदुःख ही दोन्ही होत नाहीत. (सुखदुःख या दोन्ही वेळी सारखाच (संयमी) असणारा), त्याला पुनः गर्भवास सोसावे लागत नाही. (म्हणजेच मोक्षप्राप्ती).
124-2
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥124॥
जो या इंद्रियांचे जे विषय (त्यांच्या आधीन न होणारा) त्या दुष्टचक्रात सापडत नाही, (अशा मानवास) हे पार्था, तो पूर्णपणे ब्रम्हरूप आहे असे जाणावे.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥2. 16॥
अविद्यमान (अस्तित्वात नसलेल्या) वस्तूला अस्तित्व कधी नसते, आणि विद्यमान गोष्टीला कधी आभाव नसतो. विद्यमान व अविद्यमान या दोन्हीचाहि निर्णय तत्वज्ञानी लोकांनी जाणला आहे.
125-2
आता अर्जुना काही एक । सांगेन मी आईक । जे विचारपर लोक । वोळखिती ॥125॥
आता अर्जुना, तुला मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे, ऐक. जी ज्ञानी पुरुष विचारांनी जाणतात.
दिवस १६ वा, १६ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८१ ते १९२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 181
ठायीची ओळखी । येईल टाकु टाका सुखी ॥१॥
तुमचे जाईल ईमान । माझे कपाळी पतन ॥धृपद॥
ठेविला तो ठेवा । अभिलाष बुडवावा ॥२॥
मनी न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥३॥
अर्थ
हे देवा तुमची व माझी हि मुळची ओळख आहे. ही गोष्ट तूम्ही विसरत असाल तर विसरा. पण त्यामुळे तुमचे इनाम जाईल आणि माझ्या कपाळी पतन येईल. म्हणजे हे असे होईल एखाद्या जवळ आपला ठेवा ठेवला आणि त्याने तो ठेवा अभिलाषे पोटी बुडवावा. तुकाराम महाराज म्हणतात आहो दातारा या गोष्टीचा विचार तुम्ही मनात का करत नाही ?
अभंग क्र. 182
तुझे वर्म ठावे । माझ्या पाडियेले भावे ॥१॥
रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरी ॥धृपद॥
नेदी होऊ तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥
तुका म्हणे देवा । चिंतन हे तुझी सेवा ॥३॥
अर्थ
माझ्या भक्तीभावामुळे तुझे रूप, रहस्य मला सापडले आहे. कासव जैसे आपले अवयव पोटाशी आवळून घेतो, तसे तुझे रूप मी ह्रदयाशी धरले आहे. या आपल्या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होणार नाही. तुझ्या दृष्टिशी माझी दृष्टी एकरूप होईल. तुकाराम महाराज म्हणतात, आता यापुढे तुझे चिंतन आणि सेवा हेच माझे जीवन, हेच सत्य आहे.
अभंग क्र. 183
गहू एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥
वर्म जाणावे ते सार । कोठे काय थोडे फार ॥धृपद॥
कमाईच्या सार । जाति दाविती प्रकार ॥२॥
तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥
अर्थ
गव्हाचे अनेक खाद्य प्रकार तयार करता येतात. स्वयंपाक करणारी जर सुगरण नसेल तर ती गव्हाचा नास करेल. म्हणून पदार्थाचे गुणधर्म व त्याच वर्म ओळखून कुशलतेने त्याचा उपयोग करून घ्यावा. अनेक प्रकारच्या जातीचे धान्य असतात व त्याचे विविध प्रकारचे खादय पदार्थ तयार करणे यात खरी कुशलता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, की प्रत्येकातील गुणाला महत्त्व दिल पाहिजे, तेथे नुसती बडबड उपयोगाची नाही.
अभंग क्र. 184
पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनांची नावे ॥१॥
नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥धृपद॥
विश्रांतीचा ठाव । पायी संताचिया भाव ॥२॥
तुका म्हणे पापे । जाती संताचिया जपे ॥३॥
अर्थ
संतसज्जनांची फक्त नावे उच्चारल्याने पुण्यसंचय होतो. त्यामुळे माझी वाणी पुण्यसंचय करुण घेणार आहे, हा फुकटचा लाभ दवडण्यास ती तयार नाही. संतचरणाजवळ खरा भक्तीभाव ठेवला असता जीवाला विसावा मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या प्रकारचे संतांच्या नामस्मरामुळे पाप नाहीसे होते.
अभंग क्र. 185
देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥
दोहीकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील साटा आपुलाला ॥धृपद॥
दाखविले परी नाही वरीजिता । आला तोचि चित्ता भाग वरी ॥२॥
तुका म्हणे अंगी आवडीचे बळ । उपदेश मूळ बीजमात्र ॥३॥
अर्थ
देवाच्या, संतांच्या संगतिने जीव देवस्वरूप होतो; पण प्रपंचिकाच्या संगतीने मात्र अध:पतन घडते. प्रपंच्य व परमार्थ या सदगति व अधोगतिच्या दोन वाटा आहेत, या मार्गाने जे जिव जातील ते आपल्या मार्गाप्रमाणे पाप-पुण्याचा संचय करीत जातील. आम्ही दोन्ही मार्ग लोकांना दाखवितो, ज्याला जो मार्ग योग्य वाटला, त्या मार्गाने तो गेला. तुकाराम माहाराज म्हणतात, ज्या जीवाला परमार्थाची आवड आहे, त्यालाच पारमार्थिक उपदेश केला तर तो सफल होतो.
अभंग क्र. 186
शोधिसील मूळे । त्याचे करीसी वाटोळे ॥१॥
ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु झाले तट ॥धृपद॥
लौकिका बाहेरी । घाली रोखी जया धरी ॥२॥
तुका म्हणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥३॥
अर्थ
परमेश्वर आपल्या भक्तांच्या अज्ञानाचे मूळ शोधून त्यांना ज्ञानप्राप्ती करुण देतो; त्यामुळे त्याचे वाटोळे होते. असा तुझ्या नावलौकिकाचा बोभाटा संतानी करून ठेवला आहे. जो प्रपंच्याला सोडून परमार्थ मार्गाला आला, तो सामाजीकदृष्टया लौकिकाबाहेर गेला. तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरी गुण ज्या जीवाला लागला त्याला शून्य ब्रह्मावस्था निर्माण झाली.
अभंग क्र. 187
वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्याते देवा ॥१॥
काय जाणो कैसी परी । प्रारब्ध ते ठेवी उरी ॥धृपद॥
अंगी दैवत संचरे । मग तेणे काय उरे ॥२॥
नवसे कन्यापुत्र होती । तरि का करणे लागे पती ॥३॥
जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥४॥
अर्थ
वैद्यानेच जर माणसाचा जीव वाचवला असता तर देवाचे ध्यान कोणी केले असते. मनुष्य देह जरी कार्यशील असला तरी सारे काही प्रारब्धावर असते. जर अंगात दैवताचा संचार होतो तर तेथे काही उरत नाही. नवसाने जर मूल बाळ होत असेल तर नवरा करायची काय गरज. तुकाराम महाराज म्हणतात जो सर्वाचा दातार आहे हा विठ्ठलच हे सर्व विचार जाणत आहे.
अभंग क्र. 188
मार्गी बहुत । याचि गेले साधुसंत ॥१॥
नका जाऊ आडराणे । ऐसी गर्जती पुराणे ॥धृपद॥
चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥
झळकती पताका । गरुडटके म्हणे तुका ॥३॥
अर्थ
या पूर्वी या भक्तीमार्गाने अनेक साधुसंत गेले आहेत. प्रपंचातील आडवाटीने तुम्ही जावु नका, असे पुराणे गर्जना करून सांगतात. पुढे गेलेल्या संतानी या वाटा स्वच्छ केल्या आहेत, त्यामुळे कोणालाही न विचारता या धोपटमार्गावरून जाता येते. तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गावरून जाणाऱ्या विष्णुदासांच्या खांद्यावर गरुड चिन्हाकित पताका झळकतात.
अभंग क्र. 189
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊ पाहू डोळा । आले वैकुंठ जवळा । सन्निध पंढरीये ॥१॥
पीक पिकले घुमरी । प्रेम न समाये अंबरी । अवघी मातली पंढरी । घरोघरी सुकाळ ॥धृपद॥
चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥२॥
मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदे डुल्लती । शूर उठावती । एक एका आगळे ॥३॥
नामामृत कल्लोळ । वृंदे कोदली सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कापती ॥४॥
आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचे सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥
मरण मुक्ती वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाही पंढरीसि । पायापाशी विठोबाच्या ॥६॥
तुका म्हणे आता । काय करणे आम्हा चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥
अर्थ
साधकाहो, आपल्या डोळ्यांनी आपण कार्तिकिचा सोहळा पाहू चला. पंढरीच्या जवळ साक्षात वैकुंठच् आहे. तेथे हरिनामाचे अपार पिक पिकले आहे. प्रेम गगनात मावेनासे झाले आहे. सारी पंढरी त्यात मस्त झाली आहे. घरोघरी सुकाळ झाला आहे. भक्तगण स्थिरपणे चालले आहेत. गरुडध्वजांचे भार त्यांच्याजवळ आहेत. टाळ, मृदुंगाच्या नादात गंभीरपने नामघोष करीत आहेत. हत्तीचा कळप जसा डोलत असावा, त्याप्रमाणे एकाहुन एक श्रेष्ठ असे विष्णुभक्त आनंदाने डोलत आहेत. श्रीहरिच्या नामामृताच्या घोषत भक्तसमुदाय कोंडाटूंन गेला आहे आणि अश्या प्रकारे हे विष्णुदासांचे सैन्य आलेले पाहुन कळिकाळालाही कंप सुटला आहे. पंढरीतील वाळवंटामधील हे सुख पाहुन ब्रह्मादिकदेवहि त्याची इच्छ करीत आहेत, हा मृत्युलोक धन्य आहे, येथील लोक भाग्यवंत आहेत, असे ते म्हणतात. काशीत मरण आलेतर मुक्ती मिळते, गया वर्जन केल्याने पितृऋनातून मुक्तता मिळते, पंढरीत विठ्ठालाच्या चरणापाशी मात्र अशा प्रकारची उधारी नसते तिथे सर्वकाही रोखण्याचा मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला चिंता करण्याचे कारण काय ? सर्व सिद्धी देणारा श्रीहरी आमची कधीही अपेक्षा करणार नाही.
अभंग क्र. 190
जया दोषा परीहार । नाही नाही धुंडिता शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥
धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादी ॥धृपद॥
सकळतीर्थांचे माहेर । भूवैकुंठ निर्विकार । नामाचा गजर । असुरकाळ कापती ॥२॥
नाही उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जया । जे पंढरपूर देखती ॥३॥
उपजोनि संसारी । एक वेळ पाहे पा पंढरी । महा दोषा कैची उरी । देवभक्त देखिलिया ॥४॥
ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥५॥
ते सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥६॥
तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाही साचा । तो अधम जन्मांतरिचा । जया पंढरी नावडे ॥७॥
अर्थ
काही पातके अशी आहेत, की शास्रे काढून पाहिले तरी त्या पातकाचा परिहार होण्यासाठी प्रायचित्त मिळत नाही. परंतु पंढरीचे दर्शन घेतले की, घोर अशी पातके नाहीशी होतात. धन्य ते भिमातिर ! धन्य ते चंद्रभागा तीर्थ ! पद्मतीर्थाच्या ठिकाणी विठ्ठलवीर राहत असून ते वेणुनादाचि क्रीडा करतात. ती सर्व स्थान धन्य होत. पंढरी हे सर्व तीर्थाचे माहेर आहे. भूतलावरि वैकुंठ आहे. तेथे सतत नामगजर चालु असतो. तो एकूण असुर, काळही भीतीने कापतात. त्याला उपमा देण्यास दूसरे स्थळ नाही. ज्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले ते धन्य होतात. जगात जन्माला येऊन एकदातारि पंढरी पाहावि. देवभक्ताचे (पुंडलीकाचे) दर्शन घेतल्यानंतर महापातकांना जागा कशी उरेल ? अशी ही विष्णुची नगरी आहे. येथील नर-नारी चतुर्भुज आहेत. सूदर्शनाचे फेरे त्यांच्या भोवती सुरु असतात. त्यामुळे कळीकाळाला तेथे प्रवेश नाही. तेथील सुखाचे वर्णन करण्यास माझी बुद्धि असमर्थ आहे. जे पंढरपुरला जातात, त्यांना प्रत्यक्ष वैकुंठच् पावते. तुकाराम महाराज म्हणतात, या शब्दांवर ज्याचा विश्वास नाही, ज्याला पंढरी आवडत नाही, तो जन्म जन्मांतरिचा अधम होय.
अभंग क्र. 191
एक नेणता नाडली । एका जाणिवेची भुली ॥१॥
बोलो नेणे मुके । वेडे वाचाळ काय निके ॥धृपद॥
दोही सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥
तुका म्हणे कर्म । तुझे कळो नेदी वर्म ॥३॥
अर्थ
एखादा मनुष्य अडानिपणामुळे स्वतःची फजीती करून घेतो, तर दूसरा ज्ञानाच्या अहंकारामध्ये बुडून जातो. एक वेडा आती बडबड करतो, तर दुसरा मुका आहे; त्यामुळे दोघाचाहि उपयोग नाही. एक विद्या-अविध्येच्या द्वंद्वात सापडल्यामुळे त्याला ‘इकडे आड-तिकडे विहीर ” अशी परिस्तिति प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे पापकर्म तुला परमार्थाचे सत्य ज्ञान कळू देत नाही.
अभंग क्र. 192
म्हणवितो दास । मज एवढीच आस ॥१॥
परी ते अंगी नाही वर्म । करी आपुला तू धर्म ॥धृपद॥
बडबडितो तोंडे । रिते भावेविण धेडे ॥२॥
तुका म्हणे बरा । दावू जाणतो पसारा ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला, मला तुझा दास म्हणवुन घेण्याची इच्छा आहे. खरा दास कसा बनतो, याचे रहस्य मला माहीत नाही; पण तू आपला पतितांना पावन करण्याचा धर्म पाळ आणि मला तुझा दास करून घे. माझी बडबड म्हणजे भक्तीभावाविन केलेली पोकळ वाचळता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचे ढोंग मी करू शकतो; पण भक्तीचे योग्य वर्म मी जाणत नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















