आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१३ फेब्रुवारी, दिवस ४४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ५१७ ते ५२८
“१३ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 13 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक १३ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
151-4
विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जे द्वैतदोषसंगे । सिंपेचिना ॥151॥
ज्या ठिकाणी कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही, कोणत्याही इच्छेचा प्रवेश होत नाही, जे द्वैत दोषाच्या संगतीने कधीही लिप्त होत नाही,
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥4. 31॥
भावार्थ :-
यज्ञाचा परिणाम ज्ञानरूपी अमृत, त्याचे सेवन करणारे योगीजन सनातन परब्रम्हाला प्राप्त होतात. जो कोणाचाच यज्ञ करत नाही त्याला ऐहिक सुख मिळत नाही, मग त्याचा परलोक सुखदायक कसा होणार ?
152-4
ऐसे अनादिसिद्ध चोखट । जे ज्ञान यज्ञावशिष्ट । ते सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रे ॥152॥
असे जे अनदीसिद्ध, परिशुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञामध्ये शिल्लक राहीलेले ब्रम्ह असते, त्या ब्रम्हाचे ब्राम्हनिष्ठ लोक हे ‘अहं ब्रमास्मि ‘ मी ब्रम्ह आहे, या मंत्राचे सेवन करतात म्हणजे ब्राम्हशी एकरूप होतात.
153-4
ऐसे शेषामृते धाले । की अमर्त्यभावा आले । म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासे ॥153॥
याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरुप अमृत प्राशन करून जे तृप्त होऊन अमर होतात, ते सहजच ब्राम्हत्व पावतात.
154-4
येरा विरक्ति माळ न घालीचि । जया संयमाग्नीची सेवा न घडेचि । जे योगयागु न करितीचि । जन्मले सांते ॥154॥
जन्माला येऊन ज्यांना संयमरुपी अग्नीची उपासना घडत नाही आणि जे योग-यज्ञही करत नाहीत, त्या लोकांना विरक्ती माळ घालत नाही.
155-4
जया ऐहिक धड नाही । तयांचे परत्र पुससी काई । म्हणोनि सांगो का वाई । पंडुकुमरा ॥155॥
हे अर्जुना ! ज्यांचे इहलोकामध्ये आचार, विचार, उच्चार सात्विक नाहीत, त्यांना परलोक मिळेल काय ? म्हणून त्यांच्या विषयी बोलणे नको.
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे ॥4. 32॥
भावार्थ :-
असे विविध प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून विस्तार पावले आहेत. ते सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत, असे तू जाण. असे जाणल्याने निष्काम कार्मयोगाच्या द्वारे तू संसारबंधनातून मुक्त होशील.
156-4
ऐसे बहुती परी अनेग । जे सांगितले तुज का याग । ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥156॥
अशा प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले, त्यांच्याबद्दल वेदात उत्तम तऱ्हेने वर्णन केलेले आहे.
457-4
परि तेणे विस्तारे काय करावे । हेचि कर्मसिद्ध जाणावे । येतुलेनि कर्मबंधु स्वभावे । पावेल ना ॥157॥
परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे ? ते सर्व यज्ञ शरीर, मन व इंद्रिय यांच्या क्रियांनी उत्पन्न होतात. ते सर्व यज्ञ फलाच्या इच्छेने केल्यास बंधन प्राप्त होते. ते सूत्र जाणले, की कर्मबंधन प्राप्त होणार नाही.
श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञान् ज्ञानयज्ञः परंतप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥4. 33॥
भावार्थ :-
हे अर्जुना, सर्व प्रकारच्या द्रव्यसाधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ” ज्ञानयज्ञ ” हा श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारची कर्मे शेवटी ज्ञानामध्येच समाप्त होत असतात.
158-4
अर्जुना वेदु जयांचे मूळ । जे क्रियाविशेषे स्थूळ । जया नव्हाळियेचे फळ । स्वर्गसुख ॥158॥
हे अर्जुना, ज्याचा मूळ आधार वेद आहे आणि ज्यामध्ये अनेक कर्मे सांगितली आहेत, तसेच ज्यापासून केवळ स्वर्गसुखाचे फळ प्राप्त होते,
159-4
ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशी ॥159॥
ते द्रव्यादी यज्ञ आहे, परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोपले जाते, त्याप्रमाणे सर्व यज्ञ ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत.
160-4
देखे परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जे न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्री ॥160॥
परमात्म – सुखाचा ठेवा प्राप्त करण्यासाठी साधक हे बुद्धीच्या डोळ्यामध्ये जे अंजन घालण्यास कधीही विसरत नाहीत,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-4
जे धावतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी । जे भुकेलिया धणी । साधनाची ॥161॥
ते ज्ञान चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. जे कर्मातीत बोधाची खाण आहे आणि आत्मज्ञानाची भूक लागलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे.
162-4
जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणे इंद्रिये विसरली । इंद्रियसंगु ॥162॥
ज्याच्या ठीकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी नाहीशी होते, ज्याच्या योगाने सर्व इंद्रिय विषयसंग विसरून जातात,
163-4
मनाचे मनपण गेले । जेथ बोलाचे बोलपण ठेले । जयामाजि सांपडले । ज्ञेय दिसे ॥163॥
ज्या ठिकाणी मनाचे मनपन संपून जाते, शब्दाची धाव थांबली जाते, ज्यामध्ये जाणवयाची वस्तू ब्रम्ह, हे प्रत्येक्ष अनुभवास येते,
164-4
जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहता सहज भेटे । आपणपे ॥164॥
जेथे वैराग्याचे दारिद्र संपून जाते, विवेकाची हाव बंद पडते आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता सहजपणे ब्रह्मची अनुभूती येते,
तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ॥4. 34॥
भावार्थ :-
साष्टांग नमस्कार करून, मनोभावे त्यांची सेवा करून, निष्कपट भावनेने त्यांना प्रश्न विचारून ते ज्ञान तू समजून घे. ते तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील.
165-4
ते ज्ञान पै गा बरवे । जरी मनी आथि आणावे । तरी संता या भजावे । सर्वस्वेशी ॥165॥
ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात असेल, तर संतांना सर्वभावाने भजावे.
166-4
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥166॥
हे संत म्हणजे ज्ञानाचे घर आहे आणि सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे. हे अर्जुना ! संतांची मनोभावे सेवा करून त्यांना आपलेसे कर.
167-4
तरी तनुमनुजीवे । चरणासी लागावे । आणि अगर्वता करावे । दास्य सकळ ॥167॥
शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणी लागावे. सर्व प्रकारचा अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे.
168-4
मग अपेक्षित जे आपुले । तेही सांगती पुसिले । जेणे अंतःकरण बोधले । संकल्पा न ये ॥168॥
ज्या आत्मज्ञानासंबंधी आपणास अपेक्षा असते, त्यासंबंधी आपण प्रश्न केला, तर त्याचे उत्तर संत सांगतात, ते ज्ञान आपल्या अंतःकरणात बिंबले जाते आणि मनात संकल्प निर्माण होत नाहीत.
यज् ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥4. 35॥
भावार्थ :-
हे पांडुपुत्रा ! ते ज्ञान प्राप्त झाले म्हणजे तुला पुनः भेदरूपी मोह होणार नाही. मी आत्मस्वरूप असून माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत, असे तू या ज्ञानाने जाणशील.
169-4
जयाचेनि वाक्यउजिवडे । जाहले चित्त निधडे । ब्रह्माचेनि पाडे । निःशंकु होय ॥169॥
संतांच्या उपदेशरूपी उजेडाने निर्भय झालेले चित्त ब्रम्हाप्रमाणे शंकारहीत होईल.
170-4
ते वेळी आपणपेया सहिते । इये अशेषेही भूते । माझा स्वरूपी अखंडिते । देखसी तू ॥170॥
त्यावेळी तू आपल्यासह ही सर्व भुते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-4
ऐसे ज्ञानप्रकाशे पाहेल । तै मोहांधकारू जाईल । जै गुरुकृपा होईल । पार्था गा ॥171॥
हे पार्था ! अशाप्रकारे सद्गुरूंची कृपा होईल, त्यावेळी तुझ्या अंतःकरणात ज्ञानप्रकाश उदयाला येईल आणि मोहरूप अंधकार नाहीसा होईल.
अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥4. 36॥
भावार्थ :-
तू सर्व पापी लोकांच्या पेक्षाही अधिक पापी असलास, तरी ज्ञानरूपी नौकेच्या आधाराने पापरूपी सागरातून अनायासे तरुण जाशील.
172-4
जरी कल्मषांचा आगरु । तू भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ॥172॥
तू पातकांचे आगर (खाण), भ्रमाचा सागर किंवा संशयाचा मोठा डोंगर जरी असलास,
173-4
तरी ज्ञानशक्तीचेनि पाडे । हे आघवेची गा थोकडे । ऐसे सामर्थ्य असे चोखडे । ज्ञानी इये ॥173॥
तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सर्व लहान आहे, इतके या ज्ञानामध्ये सर्व दोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे.
174-4
देखे विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कवडसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥174॥
निराकार परब्रम्हाची पडछाया म्हणून असणारा हा जो विश्वाचा पसारा, तो ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. म्हणजे ज्ञान झाले असता संपूर्ण विश्वभ्रम नाहीसा होऊन जातो.
175-4
तया कायसे हे मनोमळ । हे बोलताचि अति किडाळ । नाही येणे पाडे हे ढिसाळ । दुजे जगी ॥175॥
त्या दिव्य ज्ञानाच्या पुढे मनातील दोष घालविणे म्हणजे काय आहे ? पण अशी तुलना करणेही योग्य नाही. कारण, या जगात याच्यासारखे महान असे दुसरे काही नाही.
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥4. 37॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी लाकडांना भस्मसात् करतो, त्याप्रमाणे परमात्मज्ञानस्वरूप दिव्य अग्नी हा सर्व प्रकारचे कर्मबंध जाळून टाकतो.
दिवस ४४ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ५१७ ते ५२८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 517
खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढिले ठेवणे समर्थाचे ॥१॥
मजुराच्या हाते मापाचा उकल । मी तो येथे फोल सत्ता त्याची ॥धृपद॥
कुल्लाळाच्या हाते घटाच्या उत्पत्ती । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥
तुका म्हणे जीवन ते नारायणी । प्रभाते किरणी प्रकाशाची ॥३॥
अर्थ
समर्थ संतांच्या घरी विठ्ठलरूपी जुनाट नाणे जमिनीमध्ये पुरून ठेवले होते. ते मी आधी बाहेर काढले. धान्य मालकाचेच असते, मजुराच्या हाताने त्याचे माप होत असते. त्या प्रमाणे विठ्ठलरूपी ठेवा उघड करणारा मी मजूर आहे व खरी सत्ता त्याचीच आहे. कुंभार स्वतःच्या हाताने घटाची निर्मिती करतो पण योग्यते नुसार पाकशाळेत दुसराच कोणीतरी पाठवीत असतो. त्या प्रमाणे ज्ञान ठेवा उघड करून सांगण्यासाठी संतानी मला आज्ञा केली. त्या आज्ञे प्रमाणे मी कार्य करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात सूर्यकिरणातच प्रकाश असतो, तसेच आमचे जीवन नारायणाने व्यापले आहे.
अभंग क्र. 518
गंगेचिया अंतेविण काय चाड । आपुले ते कोड तृषेपाशी ॥१॥
विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालू निरंतर हृदयपुटी ॥धृपद॥
कारण ते असे नवनीतापाशी । गबाळ ते सोसी येर कोण ॥२॥
बाळाचे सोईते घास घाली माता । अट्टाहास चिंता नाही तया ॥३॥
गाऊ नाचू करू आनंदसोहळा । भावचि वेगळा नाही आता ॥४॥
तुका म्हणे अवघे जाले एकमय । परलोकीची काय चाड आता ॥५॥
अर्थ
ज्याला तहान लागलेली आहे त्याने शांत चित्ताने गंगेचे पाणी प्यावे गंगेचे पाणी किती खोल असेल अश्या निरर्थक चौकशी करत बसू नये. त्या प्रमाणे बाह्य गोष्टींचा फार विचार न करता विठ्ठलाची साजिरी गोजिरी मनमोहक मूर्ती हृदय मंदिरात स्थिर करावी. लोणी हे सार असे नवनीत असते त्याच्याशी आपला संबंध. इतर गबाळ्या गोष्टींचा विचार करू नये. बाळाच्या सोई साठी आई त्याला घास भरवित असते बाळाला मात्र कसली चिंता किंवा खटाटोप करण्याची जरुरी नसते. त्या प्रमाणे आम्ही या विठ्ठलाच्या प्रेमात नाचु गाऊ व आंनदाने सुखाचा सोहळा संपन्न करू. या खेरीज आमच्या मनात दुसरा कोणताही भाव नसतो. तुकाराम महाराज म्हणतात आता आमचे सारे जीवनच ईश्वर मय झाल्यामुळे आम्हाला आता परलोकाची अपेक्षा राहिली नाही.
अभंग क्र. 519
स्त्रीपुत्रादिकी राहिला आदर । विषयी पडिभर अतिशय ॥१॥
आता सोडवणे धावा नारायणा । मज हे वासना अनावर ॥धृपद॥
येउनिया आड ठाके लोकलाज । तो हे दिसे काज अंतरले ॥२॥
तुका म्हणे आम्हा जेथे जेथे गोवा । तेथे तुह्मी देवा सांभाळावे ॥३॥
अर्थ
स्त्री व पुत्र यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे आणि विषयाच्या अतिशय मी भरीस पडलो आहे. हे नारायणा आता मला सोडवण्यासाठी तुम्ही धाव घ्या वासना मला आता अनावर झाले आहे. जर लोकलज्जा आडवे येऊ लागेल तर परमार्थ कार्य माझ्यापासून अंतरेल असेच मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही जिथे जिथे बंधनात गुंतण्याची शक्यता आहे तेथे तुम्ही आमचे रक्षण करा आम्हाला तुम्ही सांभाळा.
अभंग क्र. 520
पडिलो भोवणी । होतो बहु चिंतवणी ॥१॥
होतो चुकलो मारग । लाहो केला लाग वेगे ॥धृपद॥
इंद्रियांचे संदी । होतो सांपडलो बंदी ॥२॥
तुका म्हणे बरे जाले । विठ्ठलसे वाचे आले ॥३॥
अर्थ
मी संसार रुपी कठीण कोपऱ्यात सापडलो होतो त्यामुळे मला फार चिंता लागली होती. माझा मार्ग चुकला होता मी संसाराला खरे मानत होतो. आता मात्र परमार्थाचा त्वरित लाभ करून घेतला आहे. इंद्रियाच्या पेचात सापडलो होतो. मी चांगलाच बंदिवासात फसत होतो. तुकाराम महाराज म्हणतात पण बरे झाले माझ्या मुखातून प्रेम स्वरूप विठ्ठलाचे नांव प्रगट होऊ लागले त्यामुळे सर्व प्रकारची चिंता नाहीशी झाली.
अभंग क्र. 521
बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा । चुकला पान्हेरा ओढाळांचा ॥१॥
बहु केले दुखी त्यांचिया सांभाळे । आता तोंड काळे तेणे लोभे ॥धृपद॥
त्यांचिया अन्याये भोगा माझे अंग । सकळ ही लाग घ्यावा लागे ॥२॥
नाही कोठे स्थिर राहो दिले क्षण । आजिवरी सिण पावलो तो ॥३॥
वेगळाल्या खोडी केली तडातोडी । सांगावया घडी नाही सुख ॥४॥
निरवूनि तुका चालिला गोवारे । देवापाशी भार सांडवूनि ॥५॥
अर्थ
देवा फार बरे झाले आपल्या स्थाना वरून बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना तू आत मध्ये आपल्या स्थानावर स्थिर केले. त्यामुळे ओढाळ इंद्रिये माझ्या ताब्यात आली इंद्रियांना आपल्या ताब्यात घेतांना मला फार दुख झाले परंतु आतामात्र त्या बद्दल असणाऱ्या लाभाचे अथवा लोभाचे तोंड काळे झाले. इंद्रियांनी काही अन्याय केला तर त्याची फळे माझ्या शरीराला भोगावी लागत होती. इंद्रिये सारखी बाहेर धावत असल्या मुळे मला क्षण भर देखील स्थिर राहू दिले नाही. इंद्रियाच्या नादाने आज पर्यंत मला फारच शीण झाला. या इंद्रियांच्या बेताल वागण्या मुळे माझी व ईश्वराची ताटातूट झाली. सांगण्या सारखे सुख त्यांनी मला एक क्षणभर देखील दिले नाही. मी हि इंद्रिय रुपी ओढाळ गुरे देवाला अर्पण केली आहे. आणि सांभाळावयास सांगितली आहे. त्यामुळे मी सर्व दुखातून पार झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मंगलमय परमार्थाच्या वाटेवरुन चाललो आहे.
अभंग क्र. 522
न करावी आता पोटासाठी चिंता । आहे त्या संचिता माप लावू ॥१॥
दृष्टि ते घालावी परमार्थाठायी । क्षुल्लका उपायी सिण जाला ॥धृपद॥
येथे तव नाही घेइजेसे सवे । काही नये जीवे वेचो मिथ्या ॥२॥
खंडणेचि नव्हे उद्वेग वेरझारी । बापुडे संसारी सदा असो ॥३॥
शेवटा पाववी नावेचे बैसणे । भुजाबळे कोणे कष्टी व्हावे ॥४॥
तुका म्हणे आता सकळाचे सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥५॥
अर्थ
आता पोटा पाण्याची चिंता करणे जरुरी नाही. संचिता मध्ये जे अन्न असेल ते सुखाने खाऊ. आपली दृष्टी परमार्थात रममाण करावि. सामान्य गोष्टीचा उपायांचा त्रास का बरे करून घ्यावा ? प्रपंचातील कोणतीही गोष्ट शेवटी घेऊन जाता येत नाही. खोट्या भ्रममय गोष्टींच्या लाभासाठी आपल्या जीवाची शक्ती का बरे खर्च करावी आपण कितीही चिंता केली, तरी जन्म मृत्यू चक्र थांबणार नाही. आम्ही संसारातील अश्या शाश्वत, नाशवंत गोष्टीत गुरफडून दिन झालो आहोत. नावे मध्ये बसलो तर सहज पलीकडे जातो. तर मग हाताने पोहून जाण्याचे कष्ट का करायचे ? तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाच्या नौकेत बसून भवसागर पार करावा सर्व साधनाचे सार जे नाम, त्याचे देणे घेणे करावे.
अभंग क्र. 523
आमुच्या हे आले भागा । जीव्हार या जगाचे ॥१॥
धरूनिया ठेलो जीवे । बळकट भावे एकविध ॥धृपद॥
आणूनिया केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥
तुका म्हणे अंकित केला । खाली आला वचने ॥३॥
अर्थ
सर्व विश्वाचे जे जीवन, विठ्ठल तो आमुच्या वाट्याला आला आहे. याच्या ठिकाणी बळकट भावाने मी सर्व वृत्ती स्थिर केल्या आहे. या निर्गुणरूप देवाच्या सगुण रुपास जाणले आहे. तुकाराम महाराज म्हणतात निस्वार्थ प्रेमाने त्यांना आधीन केले आणि भक्ती प्रेमात रंगण्या साठी तो पृथ्वीवर पंढरपुरात आला आहे.
अभंग क्र. 524
खरे भांडवल सापडले गाठी । जेणे नये तुटी उदमासी ॥१॥
संवगाचे केणे सापडले घरी । भरूनि वैखरी साठविले ॥धृपद॥
घेता देता लाभ होतसे सकळा । सदैवा दुर्बळा भाव तैसा ॥२॥
फडा आलिया तो न वजे निरास । जरि काही त्यास न कळता ॥३॥
तुका म्हणे आता झालीसे निश्चिंती । आणीक ते चित्ती न धरू दुजे ॥४॥
अर्थ
पांडुरंगाच्या रूपाने खरे भांडवल आमच्या हाती आले. त्यामुळे जीवन रुपी व्यापारात आता कोणत्याही प्रकारची तुट होणार नाही. हरी नाम रुपी अतिशय स्वस्त असा माल आम्हाला सापडला आहे आणि आम्ही तो वैखरी वाणीत भरून ठेवला आहे. या हरीनाम रुप मालाच्या देण्या घेण्याच्या व्यवहारात सर्वाना निश्चिंत लाभ होतो. तो सुदैवी असो वा दुर्बल असो त्यांना त्यांच्या भावनाप्रमाणे हा लाभ प्राप्त होत असतो. एकदा कि मनुष्य वैष्णवांच्या संन्निधात, फडात आला, म्हणजे तो कधीही निराश होत नाही. मग तो अज्ञानी असो वा ज्ञानी असो. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही निःश्चिंत झालो आहे. या विठ्ठलरूपी शाश्वत भांडवलाखेरीज आमच्या चित्तात दुसरा विषय नाही.
अभंग क्र. 525
पदोपदी दिले अंग । जाले सांग कारण ॥१॥
रुंधवूनि ठेलो ठाव । जागा वाव सकळ ॥धृपद॥
पुढती चाली मनालाहो । वाढे देही संतोष ॥२॥
तुका म्हणे क्षरभागी । जालो जगी व्यापक ॥३॥
अर्थ
माझे जीवन हरीला पदोपदी दिल्यामुळे माझे सर्व कार्य आता पूर्ण झाले आहे. जेवढी म्हणून रिकामी जागा होती, म्हणजे पृथ्वी, आकाश, पाताळ ती सर्व व्यापून मी राहिलो आहे. मनाचे सर्व व्यवहार आनंदाने होत आहेत. संतोषामुळे, देह पुष्ट बनत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या क्षर व अक्षर याउपाणी पैकी मी क्षर रुप जगाच्या आत, बाहेर मी सर्वत्र व्यापून राहिलो आहे.
अभंग क्र. 526
निवडुनि दिले नवनीत । संचित ते भोगीते ॥१॥
आता पुढे भाव सार । जीवना थोर पाहावया ॥धृपद॥
पारखियाचे पडिले हाती । चाचपती आंधळी ॥२॥
तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥३॥
अर्थ
आता आम्ही हरीच्या नामाचे नवनीत सर्वाना निवडून दिले आहे. ज्याचा त्यांनी आपल्या संचीताप्रमाने समाधानाने लाभ घ्यावा. आता या पुढे जीवनाला काही भक्कम आधर शोधायचा असेल, तर हरीनामावर विश्वास ठेवणे, हाच ऐक मार्ग आहे. जे कोणी पारीख करणारे डोळस लोक असतील, त्यांच्या हाती हरिनामाचे नवनीत पडेल आणि जे देहाला सर्वस्व मानणारे आंधळे लोक असतील, ते उगाच चाचपडत राहतील. तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी त्याचे अंतःकरण पूर्वक सेवन करील, त्यांना हा लाभ निश्चिंत होईल.
अभंग क्र. 527
उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखे बडबडी शिकले ते ॥१॥
आपण जाऊन न्यावे नरकास । बळे बेताळीस कुळे जग ॥धृपद॥
अबोलणे बोले डोळे झाकुनिया । बडबडी वाया दंभासाठी ॥२॥
तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखी जाणो खरे ॥३॥
अर्थ
जे इंद्रियाच्या ओढीमुळे त्याच्या पूर्ण पणे आहारी गेलेले असतात, त्यांना योग्य काय व अयोग्य काय, हे कळत नाही. आपल्या गुरूजवळ जे शिकलेले असतात, त्याची ते व्यर्थ बडबड करत असतात. तो स्वतःतर नरकाला जातोच, पण त्याच्या बरोबर पूर्वजांची बेचाळीस कुळे नरकात नेतो. ते डोळे झाकून बसतात, पण त्यात दांभिकपणा त्यांच्या अंगी भरलेला असतो. ब्रम्ह कळले असा आव आणून विषया विषयी ते शाब्दिक बडबड करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याची उत्तम तऱ्हेने पारख करतो. जो दुसर्याचे पाहू ढोंगाने नाचतो, त्याचे खरे स्वरूप काय आहे, हे आम्हास चांगलेच समजते.
अभंग क्र. 528
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वाटिता ते तुला येईल कैसे ॥१॥
म्हणउनि दृढ धरी पांडुरंग । देहा लावी संग प्रारब्धाचा ॥धृपद॥
आणिका संकल्पा नको गोऊ मन । तरीच कारण साध्य होय ॥२॥
तुका म्हणे ऐसे जाणावे उचित । तरी सहज स्थित येईल कळो ॥३॥
अर्थ
तुझे मन विविध व्यवहाराकडे कसे बरे वाटून घेता येईल ? तू आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन कर. तू आपल्या मनात पाडूरंगाचे दृढ चिंतन कर. याशिवाय इतर कोणत्याही संकल्पामध्ये तू आपल्या मनाला गुंतवून ठेऊ नकोस. असे केलेस तर जीवनाचे ध्येय जे परमार्थ, ते तुला साध्य होईल. तुकाराम महाराज म्हणतात असे उचित जे आहे, ते तू जाणावे. त्यामुळे आत्मस्थिती कशी असते, हे आपोआप समजून येते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















