ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग ९, (३३ ते ३६)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! ऊर्मिला !!!

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -३३.

         संतापून मांडवीने विचारले,उर्मि, तू कैकयीमातेला क्षमा कशी करु शकतेस? तिच्याचमुळे तुला लक्ष्मणाचा विरह सहन करावा लागत आहे.हो!पण त्याचा तिला पुरेपुर दंड मिळाला आहे.प्रत्यक्ष स्वतः च्या पुत्राने नाकारणे,सर्वांचा तिरस्कार, स्वगृही बहिष्काराचं जीवन जगणे याहून मोठी शिक्षा कोणती असूं शकेल?

          मांडवी,तुला खरं सांगू का!इतकी संवेदनशील,राजकारणपटु,अतिशय हुशार,शस्रास्र निपून आणि विशेष म्हणजे भरतापेक्षाही रामावर अधिक प्रेम करणारी स्री अचानक अशी निर्दयी कशी होऊ शकते?मला यांत कांहीतरी गुढ वाटते.कसचं काय,ढोंग आहे सगळं मांडवी म्हणाली,तिने सर्वांना ज्याप्रकारे दुखवलं,तसचं तिला दुखवायचा मानस भरताचा होता,पण झाले उलटेच!शिक्षा मला भोगावी लागत आहे.कां अस?चुक तिने केली,निर्णय भरतांनी घेतला आणि शिक्षा मात्र मला भोगावी लागत आहे. वाऽऽ काय न्याय आहे…

          उर्मि,तुला राजस्नुषा म्हणून कौंटुबिक व सामाजिक बंधनात जखडून टाकले.स्वतःच्या मुक्ती आणि आनंदा पासून दूर केले गेल याची चीड नाही येत तुला?येते ना!पण मांडवी मी सर्व सहन करते याचा अर्थ मी निष्र्कीय आहे असं नाही.मला जे बोलायचे,करायचे ते मी करतेच.प्रत्येकाला त्यांच्या वागण्याची जाणीव करुन देते.मांडवी,अग आपण स्री आहोत,पत्नी आहोत,सुना आहोत, सामाजिक बंधने पाळावीच लागतात आणि मांडवी चवताळून उठली.तीच्या मनातील क्षोम बाहेर पडल्यावर ती जरा शांत झाली.उर्मि,तूं इथे माझ्यासोबत आहेस हे केवढे माझे भाग्य!तूं एक जोडणारा सांधा आहेस.नाते बांधून ठेवणारे चैतन्य आहेस.तूं नसतीस तर  माझे काय झाले असते?

           मांडवी उद्या रामांचा जन्मदिवस आहे.त्यासाठी तूं कांही सजावट करावी. अगऽ अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा असतो.दुसर्‍या दिवशी उत्सवाची तयारी करतांना उर्मिला थकून गेली आणि ह्रदयातील वेदना?अरण्यांत त्यांना आठवण तरी येईल कां?त्यांना जाऊन वर्ष लोटलं होत.त्यांच्यामागे तिला जायचे होते पण…ती थांबली प्रतिक्षेत… येईपर्यंत येण्याची वाट बघत…

           किती दिवसांनी राजप्रासादात आनंद दिसत होता.उर्मिलाचा उद्देश सफल झाला.रामाचा जन्मदिवस थाटा माटात संपन्न झाला.पण इतके सहजही झाले नाही.स्वतःच्या पुत्राच्या वाढदिवसा साठी कौसल्याला आधी तयार करावं लागलं.मग मात्र उत्साहाने भाग घेऊ लागली.पण कैकयीला पाहून मात्र थोडी असंतुष्ट झाली.तिचा अपमान होईलसे वागु लागली.कोणत्याही निमित्याने तिथून कैकयीला घेऊन जावं असही उर्मिलाला वाटले.त्याआधीच कौसल्या कडाडली,आज माझ्या पुत्राचा जन्मदिन आहे.ही कैकयी मला जवळपासही नको. खालच्या स्तरावर उतरणे शोभत नाही म्हणून,आजवर तिला सहन करत आले, तिच्या उपस्थितीत भोजनही घेतले, कारण माझ्यामुळे राजगृहाची शांती ढळू नये,परंतु आज तिचं अस्तित्व स्विकार ण्या इतका मोठेपणा नाही माझ्यात, उर्मिला!तुझी मुत्सद्देगिरी माझ्या लक्षात येत नाही असं वाटते कां तुला?

          शांतपणे उर्मिला म्हणाली, आज तुमच्या पुत्राचा जन्मदिन आहे,निदान आजतरी तुम्ही सर्वांना क्षमा करायला हवी,रामाचे आवडते पदार्थ करण्यात माता कैकयी गेले तीन दिवस पाकगृहात राबत आहे.कांही नाही सारा दांभिकपणा

आणि इतक्या दिवसांची मनांत साठलेली मळमळ कौसल्याने बाहेर काढलीच. माझा पुत्र १४ वर्षांनी माझ्याजवळ येईल, त्याचं माझेवर प्रेम आहे,पण हिचा पुत्र मात्र कधीच येणार नाही.तिरस्कार करतो हिचा.हाच माझा सूड,हीच शिक्षा आणि हाच न्याय!

           माते याची पाळेमुळे खूप खोल वर रुजलेली आहेत.तुम्हा दोघींच्या एकमेकींच्या असूयेपोटी घडलय!तुम्हाला जशी राणी,राजपत्नी,राजमाता या पदां ना धक्का पोहचण्याची भीती वाटत होती तशीच कैकयीमातेलाही वाटत होती. आज पुत्राचा जन्मदिन असून तुम्ही आनंदी नाही कारण,कैकयीमातेबद्दल कडवट विचारांचे विष तुमच्या मनात साचलेलं आहे.कौसल्या क्रोधाने काळी निळी झाली.नजरेत संताप मावत नव्हता माझा एवढा अनादर करण्याचे धाडस झालच कस?आतां तूं सौमित्रिची पत्नी, या राजघराण्याची सून आहेस मिथिलाची राजकन्या नाहीस.अत्यंत सौम्यपणे उर्मिला म्हणाली,मी देखील सोसते आहेच ना? मी स्वतःसाठी कांही मागत नाही किंवा कांही करतही नाही.या प्रासादात परत शांती यावी,यासाठीच एवढा खटाटोप करते.जाणारे तर गेले, मात्र तुम्हा दोघीतलं वैमनस्य अजूनही तसच आहे.तुमच्या या असूया आणि सत्ता संघर्षाच्या खेळात बळी मात्र तुमचे पुत्र व त्यांच्याबरोबर आम्ही सुना पडलो. तुमच्या मुढ कृत्याचं मुल्य ते चुकवित आहेत.माते,राम जेव्हा परत येतील,हे चारही बंधू एकत्रीत येईल त्यावेळी त्यांच्या नव्या सुखात हे विष कालवाल कां?आणि उर्मिला निघून गेली.कौसल्या आपल्या सद् सद् विवेक बुध्दीला टोचणी देणार्‍या आठवणी घेऊन एकटीच निश्चल उभी राहिली…

                    क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                दि. २१-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -३४.

        उदासवाणे वातावरण संपूर्ण नष्ट झाले नसले तरी,रामजन्मोत्सवमुळे वातावरण थोडं हलकफुलकं झालं. अशातच केकय नगरीहून प्रदीर्घ आजारा नंतर अश्वपतींचं निधन झाल्याची दुःखद  वार्ता घेऊन दूत आला.कैकयी मांडवीसह केकयनगरीकडे रवाना झाली.भरताकडे नंदीग्रामकडे दूत पाठवला. शत्रृघ्ननने सोबत यायची तयारी दाखवली,पण निर्धाराने नकार दिला,इथे जास्त गरज आहे म्हणाली.कौसल्या तिच्याशी अतिशय मार्दवाने वागली.तिच्या प्रवासा ची पूर्ण तयारी करुन दिली.

           कैकयी जाऊन जेमतेम एक दिवस लोटला नाही तोच केकयनगरीहून दूत लखोटा घेऊन आला.हा साधा निरोप नव्हता तर,मृत्युपूर्व कैकयीला पाठवलेला राजमुद्रांकित निरोप आहे.काय करावे उर्मिलाला सुचेना!तिची द्विधावस्था बघून कीर्ती म्हणाली,कांही तरी महत्वाच असेल.कैकयी माता निदान एक मास तरी परतणार नाही.कांही फार महत्वाचा निरोप असेल तर?उर्मिलाने शासंक मनाने लखोटा उघडला.त्यावरुन नजर फिरवताच उर्मिलाच्या चेहर्‍याचा रंग उडाला.उर्मि,काय झाल?असं काय आहे पत्रात?उर्मिलाने पत्र कीर्तीच्या हाती दिलंं अरेऽ देवाऽ असं कसं होऊ शकते?माता कैकयीने आपणा सर्वापासून जे लपवून

 ठेवले ते या पत्रामुळे समजूं शकले. वाचलेल्या मजकुरावर उर्मिलाचा अजून ही विश्वास बसत नव्हता.कीर्ती म्हणाली, कुटुंबातील सर्व सदस्यांना लगेच सांगाय ला हवं.हे सत्य लपवू नये.पत्र पुन्हा उर्मिलाने शांतपणे अक्षर न् अक्षर वाचलं. कपाळावर आठ्या पडल्या.स्वःशीच म्हणाली,अशक्य!माझ्यामते हे पत्र प्रत्येकाला,विशेषतः भरताला,त्याही आधी शत्रृघ्नला दाखवू!इतर मातांना देखील,पण माता कैकयी आल्यावर!हे पत्र उघडण्याचा मी अपराध केला,त्या मुळे मलाच पुढाकार घेऊन बोलायला हवय!

           एक मासानंतर माता कैकयी परतली.तीच्याशी संवाद कसा सुरु करावा या उहापोहात उर्मिला होती. कैकयी अतिशय अपवादात्मक स्री असल्याचे उर्मिलाच्या लक्षात आले.सात भावांच्या पाठीवर झालेली कैकयी अश्वपतींची अतिशय लाडकी होती.तीचे विशेष संंगोपन केल होतं.ती पंडिता होती संगीत आणि इतर कलांमधे तिला विशेष गती होती.युध्दशास्रात निपून होती. अयोध्या नरेशांनी तिचा हात मागीतला व ती ही प्रेमात पडली म्हणून नाइलाजाने वयस्कर राजाशी तिचा विवाह करुन द्यावा लागला,पण तिच्या प्रथम पुत्राला अयोध्येचं राज्य देण्याच्या  अटीवर!पुढे चार पुत्रांच्या जन्मानंतर सारच बदललं. ज्या रामावर कैकयीने भरतापेक्षाही जास्त माया केली,त्याच रामाविरुध्द ती अचानक कां गेली याचे उत्तर या एका पत्राने मिळाले.आणि उर्मिलेला वाटत असलेली शंका खरी झाली.

        मनांत धाकधूक बाळगून,पण निश्चयाने उर्मिलाने राणी कैकयीच्या कक्षा त प्रवेश केला.तिला आलेले बघून आश्चर्याने तिचे हसत स्वागत केले.उर्मिला ने ते पत्र देताच तीव्रपणे कठोर स्वरात कैकयी म्हणाली,पत्र उघडण्याचे धाडस  कोणी केले?मीच केले.म्हणूनच ते पत्र योग्य ठीकाणी द्यायला आले.मी ते पत्र वाचलं,तसेच शत्रृघ्न व कीर्तीनेही!आणि कौसल्या,सुर्मित्रा..नाही अजून.पण एक दिवस त्यांनाही समजेलच!त्यानंतर भरत राम,लक्ष्मण,सीतेलाही!हे ऐकताच राणी गुडघ्यात डोकं खुपसून ढसाढसा रडू लागली.ते पराजयाचे आणि विषन्नतेचे अश्रू होते.माते एवढं कटुसत्य सर्वांपासून कां दडवलस?उर्मिलाने मार्दवाने विचारले रामाला वनवासात धाडण्यासाठी नाटक रचलं होतं हे कां नाही कोणालाच सांगीत ले?राणीचा हुंदक्याशिवाय दुसरा आवाज नव्हता तिथे.उर्मिला म्हणाली,रामाचा वनवास विधिलिखित आहे हे माहित असून,स्वपुत्राच्या प्रेमाचं भरतं आल्याचं नाटक,कुटुंबियांचा रोष,पुत्रप्रेमाला पारख्या होऊन कां त्यांचा तिरस्कार ओढवून घेतला?कां असं केल?तुम्ही आणि तुमच्या पित्यांनी कां मौन धारण केल?उर्मिला ते तसच होणार होत.ती एक प्रदीर्घ कहाणी आहे.उसासा सोडत राणी बोलूं लागली…ज्यादिवशी राजाशी विवाह झाला,त्याच्या दुसर्‍याच दिवशी माझं भविष्य मला कळले होते.केकय राजगुरु ऋषी रत्नांनी सांगीतले,पुत्रविरहा ने माझ्या पतीचे प्राण जातील.त्यांच्या मृत्युनंतर सिंहासन रिक्त रहायला हवय, अन्यथा त्यावर जो कोणी बसेल त्याचा मृत्यु होईल.त्यांच्या भविष्यावर माझा तेवढा विश्वास बसला नव्हता.पण एके दिवशी राजाने त्यांना मिळालेल्या शापा बद्दल उल्लेख केला त्याच क्षणी मी सावध झाले.कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी होती. म्हणूनच या कालावधीत राजसिंहासना वर कोणी बसणार नाही ही दक्षता घेऊन हे सारं घडवून आणले.राजगुरु वसिष्ठ हे सारं जाणत होते.रामाच्या पादूका सिंहास नावर ठेवण्याची कल्पना त्यांनीच सुचवली होती.

                   क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. २१-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -३५.

          हे सर्व ऐकून उर्मिला आवाक् होत म्हणाली,वसिष्ठगुरुंनी आम्हा सर्वांना अंधारात ठेवले?तुम्ही हे सर्व जाणत असून उघड्या डोळ्यांनी पतीचा मृत्यु पाहत राहिल्या?होय!ज्याचेवर निरतिशय प्रेम केलं,त्यांचा संथ,व्याकुळ अवस्थेत कणाकणाने होत असलेला मृत्यु बघावा लागला.कारण त्यांना तसा शापच होता.

          हादरुन उर्मिला म्हणाली,त्यांना शेवटच्याक्षणी  तरी सांगीतले असते तर, त्यांचा मृत्यु सुखकर झाला असता ना? त्यांनी माझेवर त्यावेळी विश्वास तरी ठेवला असतां का?मला मिळालेले दोन वर त्यांच्या गळी उतरवतांना मला फार कष्ट पडले.इतकी निष्ठूर मी होऊ शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अपशब्द बोलून त्यांचा समज दृढ करण्या साठी मला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.आमच्या प्रेमाचाच नाही तर त्यांचा व आमच्या भविष्याचा त्याग करावा लागला.रामाचा जीव वाचवणे महत्वाचे होते.मती कुंठीत झालेल्या उर्मिलाने विचारले,भरताला युवराज अभिषेकाची मागणी करुन त्यांचा जीव धोक्यात नव्हता कां?

           नाही! मला पूर्ण खात्री होती, भरत कधीच राजसिंहासनावर बसणार नाही.उर्मिलाच्या मनात राणीबद्दल पराकोटीचा आदर निर्माण झाला.कुटुंबा च्या रक्षणार्थ तिने स्वतःवर तिरस्कार, कलंक ओढवून घेतला.उर्मिलाने विचारले समजा असं घडल नसतं तर?नाही, माझ्या पित्याची मागणीच तशी होती. त्यांना पक्षी,प्राणी,किटकांची भाषा समजण्याची शक्ती होती.ही गोष्ट कुणाला  सांगीतली तर त्यांचा मृत्यु अटळ होता. माझ्या मातेला त्याचमुळे राजप्रासादातून नगरातून बहिष्कृत करावे लागले होते. माझे तात बराचसा काळ अरण्यात घालवित असत.तिथल्या पक्षांच्या संभाष नावरुन कळवे की,यज्ञकर्म करणार्‍या ऋषींच्या यज्ञात रावण विध्वंश आणून त्यांना ठार करतो,या रावणाला फक्त राम च मृत्यु देऊ शकतो हे त्यांना समजले होते.म्हणजे वनवासाच्या काळात रामा कडून रावणाचा मृत्यु होईल?

          त्याआधी तुमच्या पिताश्रींनी तुम्हा ला कांहीच सांगीतले नव्हते कां? नाही..

कारण ज्याक्षणी त्यांनी मला हे सांगीतले असते त्याचक्षणी त्यांचा मृत्यु घडला असतां,मला फक्त एवढचं सांगीतल की, कांहीतरी योजना करुन रामाला राज प्रासाद व नगरातून बहिष्कृत करावं. पित्याच्या आज्ञेचं मी पालन केलं.मला वाटले भरताच्या प्रेमापोटी,त्याला राज्य मिळावं म्हणून हे करवत असतील,मी अशी शंका व्यक्त केल्यावर,त्यांनी ठाम पणे नकार देऊन मला हे कृत्य करायला भाग पाडले.स्वमृत्युच्या भयामुळे ते सांगू शकत नव्हते.पण त्यांच्या सांगण्यानुसार ही योजना पार पडल्यावर,कुटुंब,प्रजा, विशेष म्हणजे भरताच्या रोषाला बळी पडलेली बघून स्वतःच्या मृत्युची पर्वा न करतां मोठ्या धैर्यान या पत्रात लिहून कळविलं आणि मृत्यु कवटाळला.

              कैकयी अचानकच वयस्कर दिसूं लागली.उर्मिलेने गलबलून विचारले, माते!तुम्ही पती,पिता गमावून पुत्राच्याही मनातून उतरलात,त्यापेक्षा राजाना सांगीतले असते तर?राजाने कधीच मान्य केले नसते.दंडकारण्यातील असुर,दैत्यां चा नाश करण्यास रामाला कधीच पाठवलं नसतं.मागेच ताटकावधाच्या वेळी विश्वामित्रांसोबत पाठवायची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती.ऋषीच्या कोपाची भीती व वसिष्ठांनी समजवल्यावर पाठवले होते.ऋषी रत्न व पित्याचे भाकीत मिळती जुळती आहेत हे लक्षात आल्यावर रामाचा वनवास अटळ आहे मी फक्त माध्यम होते इतकेच!

        हे दुर्देवी खापर तुमच्यावर फोडले जात असल्यावर कुटुंबाल कां सत्य सांगत नाही? कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.तूं चुकुन पत्र वाचले म्हणून तूं विश्वास ठेवलास.मी कोणाकोणाची माझ्या सद्हेतूबद्दल समजूत घालणार?मी निमित्य ठरावी अशीच नियती होती. आतां फक्त एकच करायचय,हे रहस्य कुणालाही कळणार नाही याची काटेकोर पणे दक्षता घ्यायचीय!मंथराला हे सारं माहित होत? छे! ती त्या दोन वरांची आठवण देऊन भावनेचं भांडवल करुं लागली व मी ही प्रतिसाद दिला.त्यामुळे तिने स्वतःबद्दल गोड गैरसमज करुन घेतला.ते कांहीही असलं तरी,मी तिच्या दुधावर पोसल्या गेले,माझे तिने व्यवस्थि त संगोपन केले,माझं सदैव हितच पाहिलं,ती माझ्या मातेच्या जागी होती हे मी अमान्य करणार नाही.माझ्या पित्याने तिला केवळ माझी पाठराखण म्हणून पाठवली नसावी,तर माझ्यात असलेल्या उणीवांची त्यांना जाण असल्यामुळे योग्य वेळी रामाला राज्यातून बहिष्कृत करायला तिची मदत व्हावी या हेतूने पाठवले असावे हे आज वाटते.

‌       आज कैकयीचा जीवनपट उर्मिला समोर उघड झाला होता.प्रेमात पडलेली सुंदरी,उत्साही मोहक नववधू,असुरक्षित भयभीत पत्नी,महत्वाकांक्षी आणि सामर्थ्यशाली राणी,न्याय्य आणि प्रेमळ माता,अवहेलना झेलणारी धैर्यवान, निःस्वार्थी स्रीचे अनंत उपकार या कुटुंबा वर आहेत.त्यातून

कधीच ऋणमुक्त होता येणार नाही.

              क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                दि. २१-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -३६.

        उर्मिला,तूं समोर दिसली की,मला फार अपराध्यासारखे वाटते.तुझा आनंद तारुण्य सारं हिरावून घेतलं.शक्य असेल तर माफ कर!माते,क्षमा तर मी मागायला हवी,मी अनादराने बोलले,प्रसंगी संभावना केली..म्हणूनच कोणाला कांही न समजलेलं बरे!मला या तिरस्कारा सोबत जगुं दे.लहानपणी दुर्वास ऋषीच्या तोंडाला काजळी फासली होती,तेव्हा त्यांनी संतप्त होऊन शाप दिला होता, जगात माझं तोंड काळ होईल.ती शाप वाणी आतां कैक वर्षांनी खरी ठरली. उर्मिला,हेच माझे प्राक्तन,दैव्य आहे.माते, यावर कांही पर्याय नाही कां?उर्मिला मी ही तुझ्यासारखीच मुक्त व निर्भिड होते. नियतीवर,ऋषी रत्नावर,माझ्या पित्यावर विश्वास नव्हता.शापाच्या सतत दडपणांत जगणार्‍या दशरथ राजांची हेटाळणी करीत होते,पण तो शाप,भाकित सारं खरं ठरलं.जे घडायच ते घडतच!असे म्हणून हातातील पत्राला दिव्याची ज्योत दाखवली.पत्राने लगेच पेट घेतला.राख तिच्या पायाशी विखुरली,अगदी तिच्या आयुष्यासारखी….

          लक्ष्मणाच्या आठवणीत उर्मिलाचे दहा वर्षे सरली.आज ती २७ वर्षाची झाली.ते परतायला अजून चार वर्षाचा कालावधी उरला होता.त्यावेळी ते ३७ वर्षाचे असणार होते.कोवळ्या युवतीचे रुपांतर प्रगल्भ तरुणीत झाले.पण विवाह होऊन या कुटुंबात आली तेव्हाच तिचे स्रीमधे परिवर्तन झाले होते.गेल्या दहा वर्षातील प्रदीर्घ आठवणीत मग्न असतानांच,खाली बागेत शांताचे मूल खेळतांना बघून,विचार आला,आज आपल्याला मुलबाळ असतं तर,आपला वेळ त्याच्यासोबत खेळण्यात गेला असतां,त्याचवेळी तिला बहिणींची आठवण झाली.प्रत्येकीच्या पतीने संन्यस्त जीवन स्विकारल्यामुळे,प्रणय त्यांचेपासून दूर होता.दुःख,वेदना न मानतां,रामाप्रमाणे ब्रम्हचर्य पालन करुन सर्वजण नैतिक शुध्दता आणि कणखरते ने वागत होते.पण मांडवीचे विचार वेगळे होते.तिला वाटत होते,या कुटुंबरुपी कारा गृहात बंदिस्त आहो.

         त्यामानाने कीर्ती मात्र समाधानी होती.शत्रृघ्नच्या सहवासात आणि तिच्या विनोदी स्वभावाने दोघेहि आनंदात राहत होते.चौघींचाही विवाह एकाच दिवशी झाला,पण जीवनाचा स्विकार करण्याची पध्दत प्रत्येकीची वेगळी होती.मांडवी कडवट,कीर्ती ज्ञानी आणि स्वतः एखाद्या उत्पेरकासारखी!घटना घडत होत्या.काळ पुढे धावत होता.कैकयीचे खरं स्वरुप उर्मिलाने कुटुंबासमोर उघड केल्यामुळे तिन्ही राण्या गुणागोविंदाने,मनात द्वेष, आकस,तिरस्कार न ठेवता वागत होत्या. संपूर्ण दशक अश्याच पध्दतीने सरळ होते.

        “ब्रम्हयज्ञ” या गौरवशाली तत्वज्ञान विषयक परिषदेसाठी जनक राजाचे निमंंत्रण आले.ही सभा दरवर्षीच भरत असे.पण या वर्षी उर्मिलाला पुत्री या नात्याने न बोलावतां “पंडिता” म्हणून विशेष पाचारण केले होते.तिला आश्चर्य वाटले.गेली कित्येक वर्ष ती वसिष्ठ व राजसभेतील वामदेव,मार्कंडेय आणि कात्यायनांकडे अध्ययन करीत होती. सुरुवातीची शिष्या झालेल्या उर्मिलाने विदुषिपर्यंतचा पल्ला गाठला होता.हा प्रवास करतांना धर्म आणि तत्वज्ञान या विषयांवर ज्ञानी मुनींबरोबर चर्चा करीत असे.त्या महत्वाच्या परिषदेला शिरध्वज जनकांनी तिला निमंत्रीत केले होते. या परिषदेला साध्वी गार्गी आणि विवादस्पद गुरु जबालीही उपस्थित राहणार असल्या मुळे चर्चेला रंग चढणार होता.

         कीर्तीला सांगीतल्यावर,ती म्हणाली,आमच्या तिघींपेक्षा तूं नेहमीच दुर्लक्षित राहिलीस.सीता जेष्ठ गुणी,दत्तक म्हणून,तर आम्ही दोघी माताविहिन म्हणून मातापित्यांनी आमच्यावर जरा जास्तच माया केली.पण तरीही तूं कधीच आमचा हेवा केला नाही.असूया,आकस, राग या भावनांना जवळ फिरकुही दिले नाही.तुझी प्रगल्भता आणि मनाची व्यापकता यातच सारं समावलं आहे. तुझी क्षमता ओळखून वेड्यासारखं प्रेम करणारी एकच व्यक्ती आहे..लक्ष्मण!

         आतांपर्यतच्या परिसभेपेक्षा या वर्षीच्या परिसभेचा उर्मिलाला नवा अर्थ कळला.देशभरांतील अनेक ऋषी,विद्वान बुध्दीवंत उपस्थित होते.विविध विषयांवर चर्चा,वादविवाद,खल अशा अनेक माध्यमातून ज्ञानाची विसृत देवाण घेवाण होत होती.सत्याचा वेध,मानवी मनाचा थांग गाठण्याचा आणि ज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न होत होता आणि या सर्वा ला उर्मिलाचा सहभाग होता.

         त्यादिवशी परिषदेत उर्मिला पंडिता म्हणून,तत्वज्ञ गुरु गार्गी,ऋषी अष्टवक्र आणि अयोध्येतून आलेले गुरु वसिष्ठ,गुरु मार्कंडेय,आणि याश्रवल्क्यां सोबत उर्मिला बसली होती.याज्ञवल्क्यां नी त्यांच्या प्रत्यक्ष गुरुंनाच आव्हान केल्यामुळे,उर्मिलाच्या मनातील खोटा अभिमान,शुल्लक भावना गळून पडल्या ने तिला शांत वाटू लागले.ती उर्मिला होती.उत्कट स्री एवढाच अर्थ तिच्या नावाला नव्हता तर,बौध्दीक,अध्यात्मिक प्रगतीत तिचं मन,बुध्दी एकवटली होती. कन्या,पत्नी आणि सुनेच्या मर्यादेत राहत स्वतःचे व्यक्तीमत्व खुलवले होते.अशा प्रसंगी लक्ष्मणाची उणीव तिला प्रकर्षाने जाणवली.त्यांनी तिचं कौतुक केलं असतं आणि तिनं मिळवलेलं यश अभिमानाने मिरवलं असत.

           क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                दि. २१-१-२०२२.

ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading