शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय ५ वा संन्यासयोगः

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 5: Sannyasa Yoga:

Sartha Dnyaneshwari Adhyay 1 Arjunvishadyog
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
॥ अथ पञ्चमोऽध्यायः– अध्याय पाचवा ॥ संन्यासयोगः
॥ भगवद्गीता श्लोक :- 29 ॥ ॥ज्ञानेश्वरी ओव्या :-180 ॥

सूची :- शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी



अध्याय पाचवा
अर्जुन उवाचः
संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यत् श्रेयं एतयोरेके तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥5. 1॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुनः कर्माचे अनुष्ठान करावे असेंहि तूच सांगतोस. या दोन्हीपैकी (तुझ्या मताने) जे खरोखर श्रेयस्कर असेल ते एक मला निश्चित सांग.
1-5
मग पार्थु श्रीकृष्णाते म्हणे । हा हो हे कैसे तुमचे बोलणे । एक होय तरी अंतःकरणे । विचारू ये ॥1॥
मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, ” अहो ! हे असे कसे तुमचे बोलणे ? तुम्ही एकच मार्ग सांगाल, तर त्यासंबंधी मनाने काही विचार करता येईल.
2-5
मागा सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हीचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगी केवी अतिरसु । पोखीतसा पुढती ॥2॥
यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा, हे विविध प्रकारे सांगितले होते; परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देता ?
3-5
ऐसे द्व्यर्थ हे बोलता । आम्हा नेणतयांचिया चित्ता । आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे ॥3॥
हे श्रीअनंता ! आपले असे दोन्ही मार्गाचे बोलणे ऐकून आम्हा अज्ञानी लोंकांच्या मनाला काही उलगडा होत नाही.
4-5
एके एकसाराते बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हे आणिकी काय सांगिजे । तुम्हाप्रति ॥4॥
ऐका. एका (सारभूत) तत्वाचा बोध करायचा असेल, तर ते एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्याने दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय ?
5-5
तरी याचिलागी तुमते । म्या राऊळासी विनविले होते । जे हा परमार्थु ध्वनिते । न बोलावा ॥5॥
याकरताच आपल्यासारख्या श्रेष्ठयाना मी विनंती केली होती की, परमार्थ हा गूढ अर्थाने सांगू नका.
6-5
परी मागील असो देवा । आता प्रस्तुती उकलु देखावा । सांगे दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥6॥
पण देवा ! मागील गोष्ट राहू दे. आता प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी कोणता मार्ग चांगला आहे, हे स्पष्ट करून सांगावे.
7-5
जो परिणामीचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठिता प्रांजळा । सावियाचि ॥7॥
जो मार्ग परिणामी अमृतमधुर आहे, ज्याचे फळ अचूक प्राप्त होते आणि जो आचरण करण्यास सहजच सरळ आहे,
8-5
जैसे निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे । तैसे सोकासना सांगडे । सोहपे होय ॥8॥
निद्रेचे सुख मध्येच भंग न पावता रस्ता तर पार करता आला पाहिजे, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा असेल, तो मार्ग मला सांगावा.
9-5
येणे अर्जुनाचेनि बोले । देवो मनी रिझले । मग होईल ऐके म्हणितले । संतोषोनिया ॥9॥
असे अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाच्या मनात प्रसन्नता तरारली आणि परम संतोषाने ते अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल.
10-5
देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥10॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहा, ज्या दैववानाला (सुदैवाने ज्याला) कामधेनुसारखी आई लाभली आहे, त्याला आकाशातील चंद्रदेखील खेळायला मिळतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-5
पाहे पा शंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देईजेचिना ॥11॥
असे पाहा की, शंकरांनी प्रसन्न होऊन उपमन्यूला त्याच्या इच्छेप्रमाणे दूधभात खाण्यासाठी दुधाचा सागर दिला.
12-5
तैसा औदार्याचा कुरुठा । कृष्ण आपु जाहलिया सुभटा । का सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ॥12॥
त्याप्रमाणे औदार्याचे घर असणारा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन झाल्यावर अर्जुन सर्वसुखाचे वसतिस्थान का बरे होणार नाही ?
13-5
एथ चमत्कारु कायसा । गोसावी लक्ष्मीकांताऐसा । आता आपुलिया सवेसा । मागावा की ॥13॥
यामध्ये आश्चर्य ते काय आहे ? लक्ष्मीकांतसारखा मालक लाभल्यावर आता आपल्या इच्छेप्रमाणे मागितले पाहिजे.
14-5
म्हणोनि अर्जुने म्हणितले । ते हांसोनि येरे दिधले । तेचि सांगेन बोलिले । काय कृष्णे ॥14॥
म्हणून अर्जुनाने जे मागितले, ते श्रीकृष्णांनी त्याला प्रसन्न चित्ताने दिले. श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्रोतेहो, श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलले, तेच मी तुम्हाला आता सांगत आहे.
श्रीभगवानुवाचः
संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते ॥5. 2॥
भावार्थ :-
भगवान म्हणाले, कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याणकारी आहेत; परंतु त्या दोन्हीपैकी (कर्माचा त्याग व कर्माचे अनुष्ठान हे दोन्ही मोक्षाला कारणीभूत आहेत) कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा सर्वाना सुगम असल्याने श्रेष्ठ आहे.
15-5
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारिता । मोक्षकर तत्वता । दोनीहि होती ॥15॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तात्विक दृष्टीने विचार केला, तर कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहेत.
16-5
तरी जाणा नेणा सकळा । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रिया बाळा । तोयतरणी ॥16॥
ज्याप्रमाणे नाव पुरुषांप्रमाणेच, स्त्रियांना आणि बालकांनाही पाण्यातून तरुण जाण्यास सोपे साधन आहे, त्याप्रमाणे जाणत्यांना, नेणत्यांना (हा संसाररुपी) भवसागर तरुण जाण्यासाठी हा निष्काम कर्मयोग सुलभ आहे.
17-5
तैसे सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणे संन्यासफळ लाहिजे । अनायासे ॥17॥
सारासार विचार करून पहिले असता, निष्काम कर्मयोग फार सोपा आहे, त्याच्या आचरणाने कर्मसंन्यासाचे फळ अनायासे प्राप्त होते.
18-5
आता याचिलागी सांगेन । तुज संन्यासियाचे चिन्ह । मग सहजे हे अभिन्न । जाणसी तू ॥18॥
याकरिता तुला कर्मसंन्यासाचे लक्षण सांगतो, मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत, असे तू जाणशील.
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङक्षति ।
निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात् प्रमुच्यते ॥5. 3॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! जो मनुष्य कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणत्याही विषयाची इच्छा करत नाही, तो निष्काम कर्मयोगी सदा संन्यासीच समजणे योग्य आहे. कारण रागद्वेषादीपासून सुटलेला मनुष्य सुखपूर्वक संसारबंधनातून मुक्त होतो.
19-5
तरी गेलियाचि से न करी । न पवता चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरी । मेरु जैसा ॥19॥
जो होऊन गेलेल्या गोष्टीची आठवण काढत नाही, एखादी वस्तू प्राप्त झाली, तरी त्याचा आनंद मानत नाही, जो मेरुपर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो,
20-5
आणि मी माझे ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥20॥
आणि हे पार्था ! ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझे याचे स्मरणदेखील राहिलेले नसते, तो सदोदित संन्यासी आहे, असे जाणावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-5
जो मने ऐसा जाहला । संगी तोचि सांडिला । म्हणोनि सुखे सुख पावला । अखंडित ॥21॥
ज्याच्या मनाची अशी अवस्था झाली, त्याला विषयांची इच्छा सोडून जाते; म्हणून त्याला सहजसुखाने अखंड मोक्ष प्राप्त होतो.
22-5
आता गृहादिक आघवे । ते काही नलगे त्यजावे । जे घेते जाहले स्वभावे । निःसंगु म्हणऊनि ॥22॥
अशी स्थिती असलेल्या माणसाला घर, प्रपंच वगैरे काही त्यागावे लागत नाही; कारण मी पणाच्या अभिमानाने प्रपंचाचा स्वीकार करणारे त्याचे मन अंतः करणापासून स्वभावतःच निःसंग झालेले असते.
23-5
देखे अग्नि विझोनि जाये । मग जे रांखोंडी केवळु होये । तै ते कापुसे गिंवसू ये । जियापरी ॥23॥
प्रज्वलित अग्नी विजून गेला, की त्याची राखच शिल्लक राहते. ती राख कापसानेदेखील धरून ठेवता येते.
24-5
तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे जो कर्मबंधीं । जयाचीचे बुद्धी । संकल्पु नाही ॥24॥
त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प निर्माण होत नाही, तो प्रपंचाच्या उपाधित असूनसुद्धा कर्मबंधात सापडत नाही.
25-5
म्हणोनि कल्पना जै सांडे । तैचि गा संन्यासु घडे । या कारणे दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥25॥
ज्यावेळी मनातील कल्पनेचा त्याग होतो, त्यावेळी संन्यास घडतो आणि म्हणूनच कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलतः सारखेच आहेत.
सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥5. 4॥
भावार्थ :-
अज्ञानी लोक सांख्ययोग आणि कर्मयोग यांना वेगवेगळे फल देणारे म्हणतात. परंतु ज्ञानी लोक तसे म्हणत नाहीत; कारण या दोन्हीपैकी एका साधनेचे शास्त्रशुद्ध अनुष्ठान केले, तर दोन्हीचे फलरूप मोक्ष म्हणजे परमात्माप्राप्ती होते.
26-5
एऱ्हवी तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवी ॥26॥
एरव्ही तरी अर्जुना, जे विचाराने पूर्णपणे अज्ञानी आहेत, ते सांख्ययोग व कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणू शकतील ?
27-5
सहजे ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न । एऱ्हवी दीपाप्रती काई अनान । प्रकाशु आहाती ॥27॥
ते स्वभावतः मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय वेगवेगळा असतो काय. ?
28-5
पै सम्यक् एके अनुभवे । जिही देखिले तत्व आघवे । ते दोन्हीतेही ऐक्यभावे । मानिती गा ॥28॥
परंतु दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाच्या साधनेत ज्यांनी परब्रह्मचा अनुभव घेतला आहे, ते लोक फलाच्या दृष्टीने दोन्ही मार्गांना एकच मानतात.
यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥5. 5॥
भावार्थ :-
सांख्यमार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते, तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. सांख्ययोग आणि कर्मयोग हे एकच आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय.
29-5
आणि सांख्यी जे पाविजे । तेचि योगी गमिजे । म्हणोनि ऐक्यता दोहीते सहजे । इयापरी ॥29॥
सांख्ययोगापासून जे फल प्राप्त होते, तेच कर्मयोगापासून होते; म्हणून या दोघांची अशा प्रकारे सहजच एकरूपता आहे.
30-5
देखे आकाशा आणि अवकाशा । भेदु नाही जैसा । तैसे ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥30॥
असे पाहा की, आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही, तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांमध्ये भेद नाही, हे ज्याला पटलेले असते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-5
तयासीचि जगी पाहले । आपणपे तेणेचि देखिले । जया सांख्ययोग जाणवले । भेदेविण ॥31॥
ज्याने सांख्ययोग आणि कर्मयोग यामध्ये काही भिन्न भाव नाही, हे जाणले, त्याला ह्या जगतामध्ये ज्ञानसुर्याचा प्रकाश दिसतो आणि त्यालाच आत्मसाक्षात्कार होतो.
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिच्छति ॥5. 6॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! निष्काम कर्मयोगाखेरीज संन्यास घेणे म्हणजे मन, इंद्रिय व शरीर यांना होणाऱ्या सर्व कर्माच्या कर्तेपणाच्या त्याग करणे. हे कठीण आहे; परंतु ईश्वराच्या स्वरूपाचे सदैव मनन करणारा निष्काम कर्मयोगी परब्रम्हाला त्वरित प्राप्त करून घेतो.
32-5
जो युक्तिपंथे पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥32॥
जो निष्काम कर्म करण्याच्या युक्तीने मोक्षरूपी पर्वतावर चढतो, तो आनंदरूपी शिखर त्वरेने प्राप्त करून घेतो.
33-5
येरा योगस्थिति जया सांडे । तो वायाचि गा हव्यासी पडे । परि प्राप्ति कही न घडे । संन्यासाची ॥33॥
जो आपले अंतःकरण शुद्ध न करता कर्मयोगाचा त्याग करतो, तो व्यर्थच संन्यासी बनण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती कधी होत नाही.

योगयुक्तो विशुध्दात्मा विजितात्मा जितेद्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥5. 7॥
भावार्थ :-
जो निष्काम कर्मयोगी आहे, ज्याचे चित्त पवित्र आहे, ज्याने मन ताब्यात ठेवले आहे, ज्याने इंद्रिय जिंकली आहेत आणि भूतमात्रांचा ठिकाणी समानरूप असणाऱ्या आत्मतत्वाशी ज्याच्या आत्म्याचे ऐक्य झाले आहे, असा पुरुष कर्म करीत असूनही त्या कर्माने बध्द होत नाही.
34-5
जेणे भ्रांतीपासूनि हिरतले । गुरुवाक्ये मन धुतले । मग आत्मस्वरुपी घातले । हारौनिया ॥34॥
ज्याने सर्व प्रकारच्या भ्रमापासून हिरावून घेतलेले मन सद्गुरुंच्या उपदेशाने शुद्ध केले आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले,
35-5
जैसे समुद्री लवण न पडे । तव वेगळे अल्प आवडे । मग होय सिंधूचि एवढे । मिळे तेव्हा ॥35॥
जोपर्यंत समुद्रात मीठ पडले नाही, तोपर्यन्त समुद्रपेक्षा भिन्न व अल्प वाटत असते. एकदा का ते मीठ समुद्रात पडले, की ते समुद्राएवढे होते.
36-5
तैसे संकल्पोनि काढिले । जयाचे मनचि चैतन्य जाहले । तेणे एकदेशिये परि व्यापिले । लोकत्रय ॥36॥
त्याप्रमाणे ज्याने आपल्या मनातील सर्व प्रकारचे भ्रम काढले आहेत, ज्याचे मन चैतन्यस्वरूप झाले आहे, तो पुरुष देहाने परिच्छिन्न असला, तरी त्याने तिन्ही लोक व्यापलेले असतात.
37-5
आता कर्ता कर्म करावे । हे खुंटले तया स्वभावे । आणि करी जऱ्ही आघवे । तऱ्ही अकर्ता तो ॥37॥
मी कर्ता आहे, मी कर्म करतो, हा त्याचा स्वभाव नाहीसा झालेला असतो आणि त्याने सर्व कर्मे जरी केली, तरी तो अकर्ता असतो.

नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्वचित् ।
पश्चन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ॥5. 8॥
प्रलपन् विसृजन् गृण्हन्नुन्मिषन् निमिषन्नपि ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥5. 9॥
भावार्थ :-
पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळ्यांची उघडझाप करीत असता, विषयांची ठिकाणी इंद्रयांची प्रवृत्ती असते, असे लक्षात आणून खरे स्वरूप जाणणाऱ्या कर्मयोग्याने ” मी काही करीत नाही ” असे लक्षात ठेवावे. (असेच निःसंदेह मानत असतो). ॥8 ॥9॥
38-5
जे पार्था तया देही । मी ऐसा आठऊ नाही । तरी कर्तृत्व कैचे काई । उरे सांगे ॥38॥
त्या आत्मज्ञानी पुरुषाच्या मनात/देहात मी पणाची आठवण नसते, तर मग कर्तृत्वाचा अहंकार कसा राहील, हे तूच सांग.
मी म्हणजे देह अशी आठवनच नसते, तर मग कर्तेपणा कसा बरे राहील ?
39-5
ऐसे तनुत्यागेवीण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्ता ॥39॥
याप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाच्या ठिकाणी अमूर्त ब्रम्हाचे सर्व गुण दिसून /अनुभवास येतात.
40-5
एऱ्हवी आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषाही व्यापारी । वर्ततु दिसे ॥40॥
एरव्ही इतर सर्व सामान्य माणसाप्रमाणे तोही शरीरधारी दिसतो आणि सर्व व्यवहार करीत असलेला दिसतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-5
तोही नेत्री पाहे । श्रवणी ऐकतु आहे । परि तेथीचा सर्वथा नोहे । नवल देखे ॥41॥
इतर सर्व लोकांप्रमाणे तोही डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो; पण त्याकर्माचा मी कर्ता आहे, असे त्याला मुळीच वाटतं नाही, हे आश्चर्य आहे.
42-5
स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणे । अवसरोचित बोलणे । तयाहि आथी ॥42॥
त्याला स्पर्श कळत असतो, नाकाने तो गंधाचा अनुभव घेत असतो, तसेच प्रसंगप्रमाणे तो बोलतही असतो.
43-5
आहाराते स्वीकारी । त्यजावे ते परिहरि । निद्रेचिया अवसरी । निदिजे सुखे ॥43॥
तो आहाराचे सेवन करत असतो, जे त्यागावयाचे आहे ते तो त्यागतो, झोपेच्या वेळी सुखाने शांत झोप घेतो
44-5
आपुलेनि इच्छावशे । तोही गा चालतु दिसे । पै सकळ कर्म ऐसे । रहाटे कीर ॥44॥
तो आपल्या इच्छेप्रमाणे चालत असतो, अशा प्रकारे तो सर्व कर्मे करत असतो.
45-5
हे सांगो काई एकैक । देखे श्वासोच्छासादिक । आणि निमिषोन्निमिष । आदिकरुनि ॥45॥
हे एकेक काय सांगावे ? पाहा, श्वास घेणे व सोडणे आणि डोळ्यांची उघडझाप करणे वगैरे सर्व कर्मे करतो
46-5
पार्था तयाचे ठायी । हे आघवेचि आथि पाही । परि तो कर्ता नव्हे काही । प्रतीतिबळे ॥46॥
हे पार्था ! ही सर्वच कर्मे तो करत असतो; परंतु आत्मज्ञानमुळे या सर्व कर्माचा कर्ता मात्र तो होत नाही.
47-5
जै भ्रांती सेजे सुतला । तै स्वप्नसुखे भुतला । मग तो ज्ञानोदयी चेइला । म्हणोनिया ॥47॥
जेंव्हा तो भ्रमाचा शय्येवर (भ्रांतिरुपी अंथरून) झोपी गेलेला असतो, तेंव्हा स्वप्नांच्या सुखाने भुलला होता, परंतु आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो आपणास कर्माचा कर्ता मानत नाही.

ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भ्सा ॥5. 10॥
भावार्थ :-
जो ईश्वराच्या चरणी सर्व कर्मे अर्पण करून फळाची इच्छा न करता कर्म करीत राहतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो पापापासून अलिप्त असतो.
48-5
आता अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थी । वर्तत आहाती ॥48॥
अधिष्ठान म्हणजे देहाच्या संगतीने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात.
49-5
दीपाचेनि प्रकाशे । गृहीचे व्यापार जैसे । देही कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥49॥
दिव्याच्या प्रकाशाच्या आधारे, घरातील सर्व व्यवहार ज्याप्रमाणे होत असतात, त्याप्रमाणे ज्ञानप्रकाश पसरला, तरी योगयुक्ताची सर्व कर्मे देहात सुरु असतात.
50-5
तो कर्मे करी सकळे । परी कर्मबंधा नाकळे । जैसे न सिपे जळी जळे । पद्मपत्र ॥50॥
ज्याप्रमाणे कमळाचे पान सदैव पाण्यात असूनदेखील ते पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे सदैव करून देखील कर्मबंधाने बध्द होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्त्वात्मशुद्धये ॥5. 11॥
भावार्थ :-
निष्काम कर्मयोगी आसक्तीचा त्याग करून केवळ इंद्रिय, शरीर, मन, आणि बुद्धीने अंतः करणाच्या शुद्धीसाठी कर्म करीत असतात.
51-5
देखे बुध्दीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥
ज्याची बुद्धी हे चांगले, हे वाईट हि द्वैतभावना जाणत नाही, जेथे मनाला अंकुर उत्पन्न होत नाही, असे द्वैतभावणारहित व इच्छारहित कर्माला कायिक व्यवहार म्हणतात.
52-5
हेच मराठे परियेशी । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्मे करिती तैशी । केवळा तनू ॥52॥
हेच उदाहरण देऊन मराठी भाषेतून सांगत आहे. लहान बाळ हे ज्याप्रमाणे द्वैतभावणारहित व इच्छा रहित कर्म करते, त्याप्रमाणे योगी शरीराने कर्म करीत असतात.
53-5
मग पांचभौतिक संचले । जेव्हा शरीर असे निदेले । तेथ मनचि राहाटे एकले । स्वप्नी जेवी ॥53॥
पंच महाभूतांनी बनलेले हे शरीर ज्यावेळी झोपी गेलेले असते, त्या वेळी एकटे मनच स्वप्नात भटकत असते.
54-5
नवल ऐके धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊ नेदी उजगरा । परि सुखदुःखे भोगी ॥54॥
हे धनुर्धरा ! एक आश्चर्य पाहा. जागृत अवस्थेत या वासनेचा केवढा विस्तार आहे ! ही वासना देहाला जागे होऊ देत नाही; परंतु सुख दुःखाचा भोग भोगावयास लावते.
55-5
इंद्रियांचा गावी नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥55॥
इंद्रियांना ज्याची माहितीदेखील नसते, असे जे कर्म निर्माण होते, त्यास मानसिक कर्म म्हणतात.
56-5
योगिये तोही करिती । परि कर्मे तेणे न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अंहभावाची ॥56॥
अंतःकरणाने योगी असणारे मानस कर्म करतात; परंतु ते कर्मानी बध्द होत नाहीत. कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडून दिलेली असते.
57-5
आता जाहालिया भ्रमहत । जैसे पिशाचाचे चित्त । मग इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे ॥57॥
एखाद्या मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट झालेले असते किंवा पिशाच्याची बाधा झाल्यावर जसे चित्त असते, तसे त्याचे सर्व व्यवहार विसंगत दिसतात.
58-5
स्वरूप तरी देखे । आळविले आइके । शब्दु बोले मुखे । परि ज्ञान नाही ॥58॥
त्यास समोरचे रूप दिसत असते, कोणी हाक मारली तर ऐकूदेखील येते, तो स्वतः बोलतही असतो; परंतु या सर्व कर्माची त्याला जाणीव नसते.
59-5
हे असो काजेविण । जे जे काही कारण । ते केवळ कर्म जाण । इंद्रियांचे ॥59॥
असो, त्यातील सूत्र असे आहे की, प्रयोजनावाचून जे जे काही केवळ विषयांशी संयोग पावून कर्म घडते, ते केवळ इंद्रियांचे कर्म जाणावे. असे तू समज.
60-5
मग सर्वत्र जे जाणते । ते बुद्धीचे कर्म निरूते । वोळख अर्जुनाते । म्हणे हरि ॥60॥
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व विषयांचे जे ज्ञान होते, ते केवळ बुद्धीचे कर्म आहे, असे तू जाण.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-5
ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी । परि ते नैष्कम्यापासुनी । मुक्त दिसती ॥61॥
जे कर्मयोगी बुद्धीला पुढे करून चित्त देऊन कर्म करतात, नैष्कम्यर्य अवस्थेला गेलेल्या मुक्त पुरुषांपेक्षाही अधिक मुक्त दिसतात.
62-5
जे बुद्धीचिये ठावूनि देही । तया अंहकाराची सेचि नाही । म्हणोनि कर्म करिता पाही । चोखाळले ॥62॥
कारण त्यांच्यामध्ये बुद्धिपासून देहापर्यंत कोठेही मीपणाच्या अहंकाराचे स्मरण नसते. म्हणून कर्म करीत असताही ते शुद्ध असतात.
63-5
अगा करितेनवीण कर्म । तेचि ते नैष्कर्म्य । हे जाणती सुवर्म । गुरुगम्य जे ॥63॥
अर्जुना ! कर्तेपणाचा अभिमान त्यागून जे कर्म केले जाते, तेच खरे नैशकर्म्य होय. हे सतगुरुकडून कळणारे खरे वर्म हे ज्ञानी पुरुष जाणत असतात.
64-5
आता शांतरसाचे भरिते । सांडीत आहे पात्राते । जे बोलणे बोलापरौते । बोलवले ॥64॥
आता या शांतरसाचे बोलणे आपल्या पात्राची मर्यादा सोडून उचंबळून येत आहे; कारण शांत रसाने बोलण्याच्या पलीकडे असलेले विचार माझ्याकडून बोलले जात आहेत.
65-5
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथी लागु । परिसावया ॥65॥
ज्याचा इंद्रियासंबंधीचा पराधीनपणा उत्तमप्रकारे नाहीसा झाला आहे, त्यालाच हे अनुभवाचे विचार ऐकण्याचा अधिकार आहे.
66-5
हा असो अतिप्रसंगु । न संडी पा कथालागु । होईल श्लोकसंगति भंगु । म्हणोनिया ॥66॥
श्रोते म्हणाले, आता हे विषयातर पुरे करा. कथेचा मूळ संबध सोडू नका; कारण श्रोत्यांच्या संगतीचा भंग होऊन जाईल.
67-5
जे मना आकळिता कुवाडे । घाघुसिता बुद्धी नातुडे । ते दैवाचेनि सुरवाडे । सांगवले तुज ॥67॥
जे मनाला आकलन करण्यास अत्यन्त कठीण आहे, बुद्धीने कितीही विचार केला, तरी सापडत नाही, ते तुला भाग्याच्या अनुकूलतेमुळे सांगता आले.
68-5
जे शब्दातीत स्वभावे । ते बोलीचि जरी फावे । तरी आणिके काय करावे । सांगे कथा ॥68॥
जे स्वभावतःच शब्दांच्या पलीकडे आहे, ते शब्दामध्ये जर सापडले, तर इतर आणखीन काय पाहिजे ? या करिता तुम्ही प्रस्तुत कथा सांगावी.
69-5
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृतीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥69॥
ही श्रोत्यांची उत्कट अशी इच्छा जाणून निवृत्तींनाथांचे दास श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणाले, तुम्ही एवढा वेळ भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा सुखसंवाद ऐकलं आहे, पुढे तोच ऐका.
70-5
मग कृष्ण म्हणे पार्थाते । आता प्राप्ताचे चिन्ह पुरते । सांगेन तुज निरुते । चित्त देई ॥70॥
मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, कृतार्थ अवस्था प्राप्त झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो, तरी एकाग्र चित्ताने ऐकावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोप्ति नैष्ठीकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥5. 12॥
भावार्थ :-
निष्काम कर्मयोगी माणूस कर्मफल ईश्वराला अर्पण करून अखंड शांती अनुभवतो (प्राप्त करतो) आणि सकामी पुरुष मात्र फलाच्या ठिकाणी आसक्त होऊन वासनेने बांधला जातो.
71-5
तरी आत्मयोगे आथिला । जो कर्मफळाशी विटला । तो घर रिघोनि वरिला । शांति जगी ॥71॥
तरी या जगात जो आत्मज्ञानाने जो संपन्न झाला आहे, ज्याला कर्मफलाचा वीट आला आहे, त्याच्या घरात येऊन शांती त्याला वरते.
72-5
येरु कर्मबधे किरीटी । अभिलाषाचिया गाठी । कळासला खुंटी । फळभोगाचा ॥72॥
यापेक्षा दुसरा जो कर्मे करणारा आहे, तो इच्छेच्या दाव्याने फळाच्या खुंटयाला बांधला कर्मबंधाने बांधला जातो.

सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन् ॥5. 13॥
भावार्थ :-
ज्याची इंद्रिय आणि मन वश झालेली आहेत, असा देहधारी आत्मज्ञानी पुरुष नऊ दारे असलेल्या या शरीरात संपूर्ण कर्मचा विवेकी मनाने त्याग करून, निःसंदेह बनून, न करता किंवा करविता सत-चित्-आनंदरूप परमेश्वराशी एकरूप होऊन राहतो.
73-5
जैसा फळाचिया हावे । तैसे कर्म करि आघवे । मग न कीजेचि येणे भावे । उपेक्षी जो ॥73॥
फलाच्या इच्छेप्रमाणे कर्माचे आचरण करणाऱ्याप्रमाणे तोही सर्व कर्मे करतो; परंतु त्या कर्माचा मी कर्ता नाही, हे जाणून तो त्याकर्माची उपेक्षा करतो.
74-5
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टी होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥74॥
तो ज्या मार्गाकडे बघेल, तेथे सृष्टीतील सत्य-शिव-सुंदरतेचे त्याला दर्शन होऊ लागते. तो म्हणेल, तेथे ब्रम्हज्ञान प्रकट होत असते.
75-5
नवद्वारे देही । तो असतुचि परि नाही । करितुचि न करी काही । फलत्यागी ॥75॥
तो नवद्वारांच्या देहात राहूनदेखील त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो सर्व कर्मे करतो; परंतु त्याला फलाची इच्छा नसल्यामुळे तो काहीच करत नाही.

न कर्तृत्वत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥5. 14॥
भावार्थ :-
परमात्मा भूतमात्रांचे कर्तेपण निर्माण करत नाही, तो कर्मही उत्पन्न करत नाही व त्यांचा कर्मफलाशी संयोगही उत्पन्न करत नाही. तो स्वरूपतः काहीच करत नसला, तरी त्याचा स्वभाव म्हणजे उपाधीभूत असलेली प्रकृतीच सर्व कार्य करत असते.
76-5
जैसा का सर्वेश्वरु । पाहिजे तव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥76॥
सूक्ष्म विचार केला, तर तो सर्वेश्वर वस्तुतः काहीच न करणारा आहे, परंतु मायेच्या उपधींचा आरोप त्यावर केला म्हणजे संपूर्ण त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो, असे दिसून येते.
77-5
आणि कर्ता ऐसे म्हणिपे । तरी कवणे कर्मी न शिंपे । जे हातोपावो न लिंपे । उदासवृतीचा ॥77॥
सर्वेश्वरास त्रिभुवनाचा कर्ता म्हणावे, तर कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही; कारण तो उदासीन असल्यामुळे त्याच्या हाता- पायास कशाचेही संसर्ग होत नाही.
78-5
योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परि महाभूतांचे दळवाडे । उभारी भले ॥78॥
त्याची स्वरूप स्थिती कधीच मोडत नाही, त्याच्या अकर्तेपणालाही कधीही विरोध निर्माण होत नाही, तरीपण तो पंचमहाभूतांचे समुदाय उत्तम प्रकारे निर्माण करतो.
79-5
जगाचा जीवी आहे । परि कवणाचा कही नोहे । जगचि हे होय जाये । तो शुद्धीहि नेणे ॥79॥
तो परमात्मा विश्वातील सर्व प्राणीमात्रांना व्यापून असतो; परंतु कधीही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे विश्व उत्पन्न होते आणि नाहीसे होते, याची त्याला वार्ताही नसते.

नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥5. 15॥
भावार्थ :-
परमात्मा कोणाचेही पाप अथवा पुण्यही घेत नाही. परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेलेले असते; त्यामुळे अज्ञानी जीव मोहित होत असतात.
80-5
पापपुण्ये अशेषे । पासीचि असतु न देखे । आणि साक्षीही होऊ न ठके । येरी गोठी कायसी ॥80॥
प्राणिमात्राकडून होणारी सर्व पाप – पुण्य ही सर्व त्याच्या जवळ असूनदेखील तो त्यांना जाणत नाही. ऐवढेच काय, तो त्यांच्या साक्षीदेखील होऊन राहत नाही, मग इतर गोष्टीबद्दल काय बोलावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-5
पै मूर्तीचेनि मेळे । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचे ॥81॥
तो परमात्मा देहाच्या संगतीने साकार होतो आणि अनेक प्रकारचा लिलाविलास करतो (सगुण स्वरूपाच्या संगतीने तो (देह धारण करून) सगुण होऊन क्रीडा करतो); परंतु त्या ईश्वराचा निराकारपणा थोडाही मलिन होत नाही.
82-5
तो सृजी पाळी संहारी । ऐसे बोलती जे चराचरी । ते अज्ञान गा अवधारी । पंडुकुमरा ॥82॥
हे अर्जुना ! तो परमात्मा जगाला उत्पन्न करतो आणि जगाचा नाश करतो. त्याच्या कर्तृत्वाविषयी जे बोलले जाते, ते केवळ अज्ञान होय, हे तू लक्षात ठेव.

ज्ञानेन न तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥5. 16॥
भावार्थ :-
ज्याचे ते अज्ञान परम्यात्म्याच्या (आत्मज्ञानाने) ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्याचे ते ज्ञान त्या स्वतः सिद्ध सत्-चित्-आनंदघन परमात्म्याचा अनुभव घेऊ लागते.
83-5
ते अज्ञान जै समूळ तुटे । तै भ्रांतीचे मसैरे फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्वराचे ॥83॥
जेंव्हा ते अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते, तेंव्हा विषभ्रमाची काजळी दूर होते. असे झाले, म्हणजे परमेश्वराचे अकर्तेपन स्पष्टपणे समजू लागते.
84-5
एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसे मानले जरी चित्ता । तरी तोचि मी हे स्वभावता । आदीचि आहे ॥84॥
आता ईश्वर अकर्ता आहे, हे जर चित्ताला पटले, तर पूर्वीपासून स्वभावतः तो ईश्वर मीच आहे, असा अभेदाचा अनुभव येतो.
85-5
ऐसेनि विवेके उदो चित्ती । तयासी भेदु कैचा त्रिजगती । देखे आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥85॥
अशा विवेकाचा उदय ज्याच्या चित्तात होतो, त्याला त्रैलोक्यात भेद कसा बरे दिसू शकेल ? तो आपल्या अनुभवाने संपूर्ण जगच मुक्त आहे, असे पाहतो.
86-5
जैशी पूर्वदिशेच्या राउळी । उदयाचि सूर्ये दिवाळी । की येरीही दिशा तियेचि काळी । काळिमा नाही ॥86॥
ज्याप्रमाणे पूर्वदिशेच्या राऊळी सूर्य उदय पावताच प्रकाशाची दिवाळी सुरु होते आणि इतर दिशांतील अंधकारही नाहीसा होतो,

तद् बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥5. 17॥
भावार्थ :-
ज्याची बुद्धी परम्यातम्याशी ताद्रुप झाली आहे, मन तदाकार झाले आहे, त्या सत्-चित्-आनंदस्वरूप परम्यातम्याशी जे सदैव ऐक्यभावाने स्थित आहेत; आणि ज्ञानाने ज्याचे सर्व प्रकारचे दोष नाहीसे झाले आहेत, असे जे तत्परायन, त्यांना पुनः जन्म मरण प्राप्त होत नाही. ते मोक्षाला प्राप्त होतात.
87-5
बुद्धिनिश्चये आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशी ॥87॥
ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानासंबधी आहे आणि जे आपणास ब्रम्हरूप मानू लागतो, तसेच रात्रंदिवस ब्रम्हपरायन होऊन आपली ब्रम्हस्थिती पूर्णपणे राखतो,
88-5
ऐसे व्यापक ज्ञान भले । जयांचिया हृदयाते गिंवसित आले । तयांची समता दृष्टि बोले । विशेषू काई ॥88॥
असे सर्व व्यापक श्रेष्ठ ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध करीत आले आहे, त्याची सर्व विश्वासम्बधी समतादृष्टी शब्दाने विशेष काय वर्णन करावी ?
89-5
एक पापियाचा आपणपेचि पा जैसे । ते देखती विश्व तैसे । हे बोलणे कायसे । नवलु एथ ॥89॥
ते जसे आपणास ब्रम्हरूप मानतात, त्याचप्रमाणे विश्वदेखील ब्रम्हरूप आहे, असे जाणतात, हे येथे सांगण्यात मोठे नवल ते काय ?
90-5
परी दैव जैसे कवतिके । कहीचि दैन्य न देखे । का विवेकु हा नोळखे । भ्रांतीते जेवी ॥90॥
परंतु भाग्य जसे कौतुकानेदेखील दारिद्राकडे पाहत नाही, किंवा विवेक हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-5
नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नी । अमृत नायके कानी । मृत्युकथा ॥91॥
किंवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकारचे स्वरूप पाहत नाही अथवा अमृताच्या कानावर कधी मृत्यूची वार्ताही येत नाही,
(अगदी तसेच ज्ञानी पुरुष त्रैलोक्यात कसलाही भेद जाणत नाही)
92-5
हे असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूती भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥92॥
हे राहू दे; उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद पाहत नाही.

(येथे माऊली ने आपल्या सर्वाना समजावे म्हणून अजून एक दृष्टांत दिला आहे)
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥5. 18॥
भावार्थ :-
आत्मज्ञानी पंडित विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राम्हण, गाय, हत्ती, आणि चांडाल या सर्वाच्या ठिकाणी त्याची दृष्टी सारखीच असते
93-5
मग हा मशकु हा गजु । की हा श्वपचु हा द्विपु । पैल इतरु हा आत्मजु । हे उरेल के ॥93॥
मग त्याच्या ठिकाणी हे चिलट आहे आणि हा हत्ती, हा चांडाल आणि हा ब्राम्हण आहे, अथवा हा आपला मुलगा आणि हा परका, असा भेद त्यांच्या अंगी कसा बरे राहील. ? (अर्थात राहणार नाही)
94-5
ना तरी हे धेनु हे श्वान । एक गुरु एक हीन । हे असो कैचे स्वप्न । जागतया ॥94॥
किंवा ही गाय, हा कुत्रा अथवा हा एक थोर आणि हा नीच आहे, हे सगळे राहू दे. जागा असलेल्या माणसास स्वप्न कसे बरे पडणार.
(झोपेतून जागे झाल्यावर, अज्ञान / अहंकार दूर झाल्यावर)
95-5
एथ भेदु तरी की देखा । जरि अंहभावा उरला होआवा । तो आधीचि नाही आघवा । आता विषमु काई ॥95॥
आणि अंतः करणात अहंकार असेल, तर विश्वात अनेक प्रकारचे भेद दिसतात; परंतु तो अहंकारच नाहीसा झाला, तर भेदभाव कुठला. (कोणत्याच प्रकारचे भेद दिसणार नाही)

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥5. 19॥
भावार्थ :-
अशा सम दृष्टीमध्ये ज्याचे मन स्थिर झाले आहे, त्यांनी या लोकीच (इहलोकीच, वर्तमान अवस्थेत जीवनमुक्त झाले आहेत) संसाराला जिंकेले आहे. कारण सत्-चित्- आनंदस्वरूप परमात्मा निर्दोष व सम आहे; म्हणून ते परमात्म्यातच स्थित आहेत.
96-5
म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म । हे संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचे ॥96॥
म्हणून सर्व ठिकाणी, सर्वकाळ सम असणारे ते अद्वय ब्रम्ह आपणच आहोत, हे समदृष्टीचे तत्व, ते तो सम्पूर्ण जाणतो.
97-5
जिही विषयसंगु न सांडिता । इंद्रियाते न दंडिता । परि भोगिली निसंगता । कामेविण ॥97॥
ज्यांनी विषयांचा समंध न सोडता, इंद्रियांचे दमन न करता, निरिच्छ असल्यामुळे अलिप्तता भोगली;
98-5
जिही लोकांचेनि आधारे । लौकिकेची व्यापारे । परि सांडिले निदसुरे । लौकिकु हे ॥98॥
जे लोकांना अनुसरून, लोक जे करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात; (उदरनिर्वाहासाठी लौकिक व्यवहार करतात)
परंतु सामान्य लोकांच्या मनात ब्राम्हविषयक जे अज्ञान असेल, त्याचा त्यांनी त्याग केलेला असतो.
99-5
जैसा जनामाजी खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु । तैसा शरीरी परि संसारु । नोळखे तयाते ॥99॥
ज्याप्रमाणे पिशाच्य जगात वावरत असून जगाला दिसत नाहीत, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. (समदृष्टी असलेला आत्मज्ञानी व्यक्तीला)
100-5
हे असो पवनाचेनि मेळे । जैसे जळीचि जळ लोळे । ते आणिके म्हणती वेगळे । कल्लोळ हे ॥100॥
हे असू दे, वास्तविक पाहता वाऱ्यामुळे पाण्यावरच पाणी लाटरूपाने खेळत असते. परंतु सामान्य लोक या लाटा पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत, असे म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-5
तैसे नाम रुप तयाचे । एऱ्हवी ब्रह्मचि तो साचे । मन साम्या आले जयाचे । सर्वत्र गा ॥101॥
त्याप्रमाणे त्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असले, तरीदेखील साक्षात ब्रम्हरूप आहेत, आणि त्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याप्रत झालेले असते.
102-5
ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे । अच्युत म्हणे ॥102॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! अशी ज्यांची विश्वात्मक समदृष्टी झालेली असते, त्या पुरुषाचे लक्षण तुला संक्षेपाने सांगतो, तरी तू एक.
(म्हणजेच त्या पुरुषला ओळखण्याचे लक्षण थोडक्यात सांगतो. त्याचा तू विचार कर

न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य् चाप्रियम् ।
स्थिरबुध्दिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥5. 20॥
भावार्थ :-
जो प्रिय वस्तू प्राप्त झाली असता आनंद हर्ष पावत नाही अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्वेग / दुःख मानत नाही, असा स्थिर बुद्धी ज्याची आहे तोच स्थिरबुद्धी, मोहराहित, ब्रह्मज्ञ व परमेश्वराच्या / ब्रह्मच्या ठिकाणी सदैव स्थित असतो.
103-5
तरी मृगजळाचेनि पूरे । जैसे न लोटिजे का गिरिवरे । तैसा शुभाशुभी न विकरे । पातला जो ॥103॥
ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराणे डोंगर वाहून जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही,
104-5
तोचि तो निरुता । समदृष्टी तत्वता । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥104॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय आणि तोच ब्रम्हाशी एकरूप झालेला होय. (तोच खरा समदृष्टीचा होय असे तू जाण)

ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥5. 21॥
भावार्थ :-
बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झाले नाही त्याला आत्म्याच्या (स्वतःच्या अंतःकरणात आनंदाची प्राप्ती करून घेतो) ठिकाणी जे सुख आहे ते मिळते, तो ब्रम्हाशी समरस झालेला योगी अक्षयसुखाच्या अनुभव घेतो.
(परब्राम्हशी एकरूप होऊन अखंड आनंदाचा अनुभव घेतो)
105-5
जो आपणपे सांडुनि कही । इंद्रियग्रामावरी येणेचि नाही । तो विषय न सेवी हे काई । विचित्र येथ ॥105॥
जो आत्मस्वरूपाला सोडून केंव्हाही इंद्रियरूपी गावात / इंद्रियांच्या आधीन येत / होत नाही (म्हणजे इंद्रयांशी तादात्म्य करीत नाही), त्याने विषयांचे सेवन केले नाही, यात आश्चर्य ते काय आहे.
106-5
सहजे स्वसुखाचेनि अपारे । सुरवाडे अंतरे । रचिला म्हणऊनि बाहिरे । पाउल न घली ॥106॥
अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतः करणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही.
(बाहेर म्हणजे इतर विषय सुखाकडे वळत नाही कारण त्याचे अंतःकरणं स्वाभिकच संतुष्ट असते)
107-5
सांगे कुमुददळाचेनि ताटे । जो जेविला चंद्रकिरणे चोखटे । तो चकोरु काई वाळुवंटे । चुंबितु आहे ॥107॥
सांग बरे, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध शीतल चंद्रकिरणाचे सेवन / भोजन करतो, तो वाळवंटातील वाळूचे खडे चाटीत बसेल काय ?
108-5
तैसे आत्मसुख उपाइले । जयासि आपणपेचि फावले । तया विषयो सहजे सांडवले । म्हणो क ई ॥108॥
त्याप्रमाणे ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी आत्मानंद / उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाला, त्याच्याकडून विषयांचा त्याग सहजच घडतो, हे काय सांगावयास पाहिजे काय ?
109-5
एऱ्हवी तरी कौतुके । विचारुनि पाहे पा निके । या विषयांचेनि सुखे । झकविती कवण ॥109॥
एरवी सहज कौतुकाने थोडा विचार करून पाहा की, या विषयाच्या सुखाने कोण बरे फसतात. ?

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥5. 22॥
भावार्थ :-
हे कुंतीनंदना ! विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग हे दुःखाला कारण होतात. ते भोग निर्माण होतात आणि नाहीसे होतात. म्हणून ज्ञानी पुरुष त्या भोगांमध्ये रममाण होत नाहीत.
110-5
जिही आपणपे नाही देखिले । तेचि इही इंद्रियार्थी रंजले । जैसे रंकु का आळुकैले । तुषाते सेवी ॥110॥
ज्यांनी आपल्या आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ते इंद्रियाकडून प्राप्त होणाऱ्या विषयात रंगून जातात. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य कोंडा देखील खातो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-5
नातरी मृगे तृषापीडिते । संभ्रमे विसरोनि जळांते । मग तोयबुद्धी बरडीते । ठाकूनि येती ॥111॥
किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमामुळे खऱ्या पाण्याला विसरून जातात आणि मृगजळाला पाणी समजून माळरानावर धावत येऊन पोहचतात.
112-5
तैसे आपणपे नाही दिठे । जयाते स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥112॥
त्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूप पाहण्याची दृष्टी नसते आणि ज्याला स्वरूप- आनंदाची सदैव कमतरता असते, त्यांना हे विषय सुखरूप वाटतात.
(ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, किंवा परमआनंदचा नेहमी पूर्ण अभाव असतो)
113-5
एऱ्हवी विषयी काइ सुख आहे । हे बोलणेचि सारिखे नोहे । तरी विद्युत्स्फुरणे का न पाहे । जगामाजी ॥113॥
एरव्ही विषयांमध्ये सुख आहे, हे म्हणणे बोलण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही. नाहीतरी विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजडत नाही.
(माऊली काय सांगतात. विजेचे चमकने हे क्षणिक आहे, त्याप्रमाने काही वेळा विषय आनंद देतात पण ते आनंद क्षणिक / विनाशी आहे. हे आपण जाणावे)
114-5
सांगे वातवर्षआतपु धरे । ऐसे अभ्रछायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिके धवळारे । करावी का ॥114॥
सांग बरे, वारा, पाऊस, ऊन, यांच्यापासून रक्षण करण्याचे काम जर ढगांच्या सावलीने होत असेल, तर मजबूत / तीन माजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप का करावा ? ?
115-5
म्हणोनि विषयसुख जे बोलिजे । ते नेणता गा वाया जल्पिजे । जैसे महूर का म्हणिजे । विषकंदाते ॥115॥
विषयांचे स्वरूप न कळल्यामुळे विषयात सुख आहे, असे व्यर्थ बोलले जाते; म्हणून का विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे ?
116-5
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीते म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥116॥
भूमिपुत्र (मंगळ) हा सर्व ग्रहात पीडाकारक दिसून येतो, तरीपण त्याला मंगळ असे म्हणतात; किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयापासून मिळणाऱ्या अनुभवाला सुख असे म्हणणे व्यर्थ आहे.
117-5
हे असो आघवी बोली । सांग पा सर्पफणीची साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ॥117॥
हे सर्व बोलणे राहुं दे. असे सांग की, नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत शीतल होऊ शकेल ?
118-5
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणे ॥118॥
जोपर्यंत गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्यास मासा तोंड लावीत नाही, तोपर्यन्त तो ठीक असतो. त्याप्रमाणे सर्व विषयांची आपला संबंध येत नाही, तोपर्यंतच बरे, हे, पांडवा, तू निःसंशय समजून घे.
119-5
हे विरक्ताचिये दिठी । जै न्याहाळिजे किरीटी । तै पांडुरोगाचिये पुष्टि- । सारिखे दिसे ॥119॥
वीरक्त पुरुषाच्या दृष्टीने हे विषयसुख जेंव्हा पहिले जाते, तेंव्हा पंडुरोगात येणाऱ्या लठ्ठपणासारखे वरून चांगले, पण आतून घातक दिसू लागते.
120-5
म्हणोनि विषयभोगी जे सुख । ते साद्यंतचि जाण दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेविता न सरे ॥120॥
म्हणून विषयभोगात जे सुख मानले जाते, ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखदायक आहे. परंतु अज्ञानी लोक काय करणार ? सवयीमुळे त्यांना विषयसेवन केल्याशिवाय चालत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-5
ते अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणे घडे । सांगे पूयपंकीचे किडे । काय चिळसी घेती ॥121॥
ते बिचारी अज्ञानी, विषयांच्या आतले दुःख स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्या कडून विषयसेवन घडत असते. पुवाच्या चिखलातील किड्याना पुवाची कधी किळस येते काय ?
122-5
तया दुःखिया दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमीचे दर्दुर । ते भोगजळीचे जलचर । सांडिती केवी ॥122॥
त्या दुःखी लोकांचे दुःख हेच जीवन बनलेले असते. कारण, ते विषयरुपी चिखलात राहणारे बेडूक असतात, भोगरूपी पाण्यातील जलचर असतात, तर मग ते विषयांचे सेवन कसे बरे सोडतील. ?
123-5
आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥123॥
जर विषयांच्या ठिकाणी जीवमात्र हे विरक्ती धारण करतील, तर मग जेवढ्या म्हणून दुःख दायक योनी आहेत, तेवढ्या व्यर्थ होणार नाहीत का ?
124-5
नातरी गर्भवासादि संकट । का जन्ममरणीचे कष्ट । हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणे ॥124॥
अथवा गर्भवासात होणारी दुःख, जन्म मरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी बरे चालवा ?
125-5
जरी विषयी विषयो सांडिजेल । तरी महादोषी के वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगी ॥125॥
जर विषयासक्त लोकांनी विषय सोडून दिले, तर मग महापातकांनी कोठे बरे राहावे ? आणि मग संसार हा शब्द खोटा ठरणार नाही का ?
126-5
म्हणोनि अविद्याजात नाथिले । ते तिहीचि साच दाविले । जिही सुखबुद्धी घेतले । विषयदुःख ॥126॥
म्हणून ज्यांनी, विषयापासून होणारे दुःखच सुख मानले / स्वीकारले. त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अज्ञान, ते खरे आहे, असे दाखविले.
127-5
या कारणे गा सुभटा । हा विचारिता विषय वोखटा । तू झणे कही या वाटा । विसरोनि जाशी ॥127॥
अर्जुना, यामुळेच विचार करून पहिले, तर ते विषय वाईट आहेत. तू कधी चुकून त्यामार्गाला जाशील तर जाऊ नकोस.
128-5
पै याते विरक्त पुरुष । त्यजिती का जैसे विष । निराशा तया दुःख । दाविले नावडे ॥128॥
जे विरक्त पुरुष आहेत, ते या विषयांस, जसे काही विषच आहे, असे समजून त्याचा त्याग करतात.
कारण ते निरिच्छ असल्यामुळे विषयांनी दाखविलेले दुःखरुपी सुख त्यास आवडत नाही.

शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः ॥5. 23॥
भावार्थ :-
इहलोकी, मरणाच्या आगोदर काम व क्रोध यांच्या वेगाला सहन / जिंकतो करू शकतो, तो पुरुष योगी व तोच सुखी आहे.
129-5
ज्ञानियांच्या हन ठायी । याची मातुही कीर नाही । देही देहभावो जिही । स्ववश केले ॥129॥
आत्मज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणात, दुःखरूप विषयांची गोष्टसुद्धा नसते; कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती स्वाधीन केलेल्या असतात.
130-5
जयाते बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरी सुख । एक आथी ॥130॥
जे बाह्य विषयांच्या उपभोगाची भाषा मुळीच जाणत नाहीत, त्यांच्या हृदयात ब्रम्हसुखच नांदत असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-5
परि ते वेगळेपणे भोगिजे । जैसे पक्षिये फळ चुंबिजे । तैसे नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥131॥
ब्रम्हसुखाचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. पक्षी ज्याप्रमाणे फळाला झोंबतो, तेंव्हा भोक्ता, भोग्य आणि भोग त्रिपुटी असते; पण तशी त्रिपुटी ब्रम्हानंदात नाही. कारण त्या अवस्थेमध्ये भोकतेपणही विसरावा लागतो.
132-5
भोगी अवस्था एक उठी । ते अंहकाराचा अचळु लोटी । मग सुखेसि आंठी । गाढेपणे ॥132॥
त्या भोगांमध्ये वृत्तीची एक अशी अवस्था निर्माण होते की, ती अहंकाराचे वस्त्र दूर सारते आणि मग तो जीव ब्रम्हसुखाचा दृढ आलिंगन देतो.
133-5
तिये आलिंगनमेळी । होय आपेआप कवळी । तेथ जळ जैसे जळी । वेगळे न दिसे ॥133॥
जसे पाण्यात पाणी टाकले असता ते वेगळे दिसत नाही, तसे त्या अलिंगणात, मिळणात आपलीच आपल्या स्वरूपाशी मिठी पडलेली असते.
134-5
का आकाशी वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैसे सुखचि उरे स्वरुपे । सुरती तिये ॥134॥
अथवा आकाशात वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हे दोन आहेत, ही भेदाची भाषा संपून जाते, त्याप्रमाणे ऐक्य अवस्था आणि ब्रम्हसुख ही भेदाची भाषा संपून फक्त आनंदच स्वरूपाने शिल्लक राहतो.
135-5
ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणो जरी एकचि होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जे ॥135॥
अशी द्वैताची गोष्टच गेली, म्हणजे ऐक्य होते. असे जर म्हणावे, तर तसे ऐक्य जाणून, ” ऐक्य आहे ” असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण आहे ?
(म्हणजे एकत्वाला जाणणारा दुसरा साक्षी तरी कोण आहे ? दोन गोष्टी एकच झाल्यावर कोण उरणार ? )

योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥5. 24॥
भावार्थ :-
जो पुरुष निश्चयाने अंतरात्म्यातच सुखी आहे, जो आत्म्याचे ठिकाणीच रममाण झालेला आहे, तसेच ज्याला आत्म्यातच ज्ञान प्रकाश लाभला आहे, तो सच्चीदानंदस्वरूप परब्राम्हशी ऐक्य पावलेला योगी मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो.

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥5. 25॥
भावार्थ :-
ज्याची सर्व पापे नाहीशी झाली आहेत, ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत, सर्व भूतमात्र्यांचे कल्याण करण्यात जे रत झाले आहेत आणि भगवंताच्या ध्यानात ज्याचे चित्त एकाग्र झाले आहे, असे ब्रम्हवत्ते पुरुष ब्रम्हस्वरूप शांतीला प्राप्त होतात.
136-5
म्हणोनि असो हे आघवे । एथ न बोलणे काय बोलावे । ते खुणाचि पावेल स्वभावे । आत्माराम ॥136॥
म्हणून हे सर्व बोलणे असू द्या. जो प्रत्येक्ष अनुभवाचा विषय आहे, त्याबद्दल शब्दांनी काय बरे बोलावे ? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे ऐक्य पावलेले ब्राम्हनिष्ठ पुरुष आहेत, ते या सूक्ष्म विचारतील खरे वर्म सहज जणतील.
137-5
जे ऐसेनि सुखे मातले । आपणपाचि आपण गुंतले । ते मी जाणे निखळ वोतले । साम्यरसाचे ॥137॥
जे अशा सुखाने परिपूर्ण संपन्न झाले आहेत, जे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झाले आहेत, ते पूर्णपणे साम्यरसाचे ओतलेले पुतळे आहेत, असे मी समजतो.
138-5
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । की महाबोधे विहार । केले जैसे ॥138॥
ते ब्राम्हनिष्ठ पुरुष आनंदाचे प्रतिबिंब आहेत, सुखाचे अंकुर आहेत किंवा त्यांच्या रूपाने महाबोधाने जणू क्रीडा केलेली आहे.
139-5
ते विवेकाचे गाव । की परब्रह्मीचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥139॥
ते विवेकाचे संपूर्ण गाव आहे, आणि प्ररब्रह्मच्या ठिकाणचे स्वभाव अथवा ब्रम्हविद्येचे सुशोभित केलेले अवयव आहेत.
140-5
ते सत्त्वाचे सात्त्विक । की चैतन्याचे आंगिक । हे बहु असो एकैक । वानिसी काई ॥140॥
ते शुद्धत्वाचे (सत्वगुणातला मूर्तिमंत सात्विक पणा आहेत. ते चैत्यन्याच्या शरीराची बांधेसुद ठेवणं आहेत. यावर सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणाले, हे बोलण्याचा विस्तार असू दे. ब्राम्हनिष्ठ पुरुषांची एक – एक लक्षणे किती म्हणून वर्णन करणार आहेस ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-5
तू संतस्तवनी रतसी । तरी कथेची से न करिसी । की निराळी बोल देखसी । सनागर ॥141॥
पाहा निवृत्तीनाथ पुढे काय म्हणत आहेत.
ज्ञानदेवा तू जेंव्हा संतांची स्तुती करण्यामध्ये रंगून जातोस, त्यावेळी तुला मूळ कथेची आठवण राहत नाही; कारण तू निराकार स्वरूपासंबधी प्रेमळ आणि रसाळ भाषा बोलत राहतोस. (आणि तेही चांगले बोल तू बोलतोस)
142-5
परि तो रसातिशयो मुकुळी । मग ग्रंथार्थदीपु उजळी । करी साधुहृदयराउळी । मंगळ उखा ॥142॥
परंतु आता हा रसाचा विस्तार आवरता घे; आणि ग्रँथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलीत कर व सज्जनांच्या अंतःकरणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर.
143-5
ऐसा श्रीगुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेचि आइका ॥143॥
हे सद्गुरू निवृत्तींनाथांचे विचार ज्ञानेश्वरांनी मानले. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ते भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले, ते आता ऐका.
144-5
अर्जुना अंनत सुखाच्या डोही । एकसरा तळुचि घेतला जिही । मग स्थिराऊनी तेही । तेचि जाहले ॥144॥
अर्जुना ! अनंत सुखाच्या डोहात उडी मारून एकदम तळ गाठला, ते तेथेच स्थिर होऊन आत्मस्वरूप बनले.
145-5
अथवा आत्मप्रकाशे चोखे । जो पापियाचा आपणपेचि विश्व देखे । तो देहेचि परब्रह्म सुखे । मानू येईल ॥145॥
हृदयामध्ये शुद्ध आत्मप्रकाश पसरला, की संपूर्ण विश्व आपलेच स्वरूप आहे, असे जो पाहत असतो, तो मनुष्य देहासह परब्रम्ह झाला, असे सहज मानता येईल.
146-5
जे साचोकारे परम । ना ते अक्षर निःसीम । जिये गावीचे निष्काम । अधिकारिये ॥146॥
जे खरोखरच परममश्रेष्ठ अथवा अविनाशी व अमर्याद असे ब्रम्हसुख, त्याचे अधिकार निरिच्छ होतात,
147-5
जे महर्षी वाढले । विरक्ता भागा फिटले । जे निःसंशया पिकले । निरंतर ॥147॥
जे थोर ऋषिकरिता काढून ठेवले आहे किंवा विरक्तांच्या वाट्याला आले व सदैव संशयरहित पुरुषास सर्व काळ टिकले आहे.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥5. 26॥
भावार्थ :-
जे काम- क्रोधानी रहित आहेत, ज्यांनी चित् स्वाधीन केले आहे, ज्यांनी परमात्म्याला जाणले आहे, असे योगी पुरुष देह असतानाही जीवमुक्त असतात आणि देह ठेवल्यानंतरही परब्राम्हशी एकरूप असतात.
148-5
जिही विषयांपासोनि हिरतले । चित्त आपुले आपण जिंतिले । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥148॥
ज्याने आपले चित्त विषयापासून हिराहून घेतले आहे आणि आपल्या स्वाधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने त्या स्वरूपात लीन झाले असता पुनः पूर्ववृत्तीवर येत नाहीत.
149-5
ते परब्रह्म निर्वाण । जे आत्मविदांचे कारण । तेचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥149॥
हे पांडुकुमरा ! आत्मज्ञानाचे फल असे ते मोक्षरूप परब्रम्ह आहे. आत्मज्ञानी पुरुष ते परब्रम्हच होतात, असे तू जाण.
150-5
ते ऐसे कैसेनि जाहले । जे देहीचि ब्रह्मत्वा आले । हे ही पुससी तरी भले । संक्षेपे सांगो ॥150॥
हे पुरुष देह असताना ब्रहत्वास कशाने पावेल, हे जर विचारत असशील, तर उत्तमच आहे. तुला ती साधने संक्षेपाने सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥5. 27॥
यतेद्नियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥5. 28॥
भावार्थ :-
बाह्य शब्दादी विषयांना दूर करून व नेत्रांची दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण व अपान वायुना सम करून ज्याने इंद्रिये, मन यांना जिंकले आहे व ज्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नष्ट झालेले आहेत, तो मोक्षपरायन मुनी सदा मुक्तच आहे. 27 ॥28॥
151-5
तरी वैराग्यचेनि आधारे । जिही विषय दवडुनि बाहिरे । शरीरी एकंदरे । केले मन ॥151॥
ज्यांनी वैराग्याच्या आधाराने सर्व विषयांना मनातून बाहेर घालविले आहे व मन अंतर्मुख केले,
152-5
सहजे तिही संधी भेटी । जेथ भ्रुपल्लवा पडे गाठी । तेथ पाठमोरी दिठी । पारुखोनिया ॥152॥
त्यांचा प्राण इडा-पिंगळा सोडून सुषुम्नामध्ये नेला जातो आणि स्वरूपामध्ये आणि स्वरूपामध्ये दृष्टी मागे वळवून स्थिर केली जाते.
153-5
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेसी व्योम- । गामिये करिती ॥153॥
उजव्या म्हणजे पिंगळा व डाव्या म्हणजे इडा नाकपुडीतून वाहत असलेल्या वायूची गती म्हणजे रेचक-पूरक बंद करून, कुंभक करून प्राण व अपान यांची सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करून चित्तास ते व्यमोगामी म्हणजे मुर्धन्योकाशकडे जाणारे करतात.
154-5
तेथ जैसी रथ्योदके सकळे । घेऊनि गंगा समुद्री मिळे । मग एकैक वेगळे । निवडु नये ॥154॥
जशी गंगानदी ही रस्त्यातून वाहणारे सर्व पाणी आपल्यामध्ये सामावून घेऊन सागरात मिळते, तेंव्हा त्या सागरामध्ये हे रस्त्यावरचे अशुद्ध पाणी आणि गंगेचे शुद्ध पाणी असा भेद करता येत नाही.
155-5
तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळी गगनी लयो मना । पवने कीजे ॥155॥
त्याप्रमाणे हे अर्जुना ! ज्यावेळी मनाचा प्राण – अपणाच्या निरोधाने
मुध्र्नी-आकाशात लय केला जातो, त्यावेळी वैषयीक वासनांचा विचारचक्रे आपोआप बंद पडतात.
156-5
जेथ हे संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फाटे । जैसे सरोवर आटे । मग प्रतिमा नाही ॥156॥
ज्या मनोरुप पटावरती संसाररूपी अनेक प्रकारची चित्रे उमटत असतात, तो पटच फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही,
157-5
तैसे मन येथ मुद्दल जाय । मग अंहभावादिक के आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥157॥
त्याप्रमाणे मनाचा मनपणाच नाहीसा झाला, तर कोणत्याही प्रकारचे अहंभाव, भ्रम वगैरे कसे शिल्लक राहतील ? म्हणून तो अनुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रम्हरूप होतो.
भोक्तारं यज्ञतपसा सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥5. 29॥
भावार्थ :-
यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर तसेच सर्वभूत प्राण्यांचा मित्र, अशा मला जाणून तो मुनी मोक्षरूप अखंड शांतीला प्राप्त होतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥5॥
158-5
आम्ही मागा हन सांगितले । जे देहीचि ब्रह्मत्व पावले । ते येणे मार्गे आले । म्हणऊनिया ॥158॥
जे पुरुष देहधारी असतानाच ब्रम्हस्वरूपाला प्राप्त झाले, ते ह्या योगमार्गाने आले, म्हणून आम्ही याआधी मार्गविषयक निरूपण केले आहे.
159-5
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे पार । पातले ते ॥159॥
ते पुरुष यम, नियम यांचे पर्वत ओलांडून, आणि योग- अभ्यासाचा सागर ओलांडून मोक्षाला प्राप्त झालेले असतात.
160-5
तिही आपणपे करुनि निर्लेप । प्रंपचाचे घेतले माप । मग साचाचेचि रुप । होऊनि ठेले ॥160॥
त्यांनी आपले अंतःकरण पूर्ण शुद्ध करून प्रपंचाला जाणून घेतलेले असते; आणि विश्वाचे सत्य अधिष्ठान जे परब्रम्ह, याच्याशी ते एकरूप होऊन राहिलेले असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-5
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणोनि चमत्कारला ॥161॥
जेंव्हा भगवान श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला. तेंव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला.
162-5
ते देखिलिया कृष्णे जाणितले । मग हांसोनि पार्थाते म्हणितले । ते काई पा चित्त उवाइले । इये बोली तुझे ॥162॥
श्रीकृष्णानी अर्जुनाच्या मनाची ही अवस्था जाणली व मग हसून अर्जुनाला म्हणाले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का ?
163-5
तव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥163॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, ” हे देवा ! दुसऱ्याच्या मनातील भावभावना जाणणारे तुम्ही राजे आहात; त्यामुळे तुम्ही माझ्या मनातील भाव उत्तम प्रकारे जाणल
164-5
म्या जे काही विवरुनि पुसावे । ते आधीचि कळले देवे । तरी बोलिले तेचि सांगावे । विवळ करुनि ॥164॥
हे देवा ! मी काही चिंतन करून तुम्हाला विचारावे, ते तुम्ही आधीच जाणलेले आहे. तरी आता आपण मागे जे योगासंबंधी सांगितले, तेच आता अधिक स्पष्ट करून सांगावे.
165-5
एऱ्हवी तरी अवधारा । जो दाविला तुम्ही अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ॥165॥
एरवीसुद्धा असा विचार करा की, तुम्ही जो योगशास्त्राचा मार्ग सांगितला, तो पोहून जाण्यापेक्षा पायउताराने जाणे जसे सोपे असते,
166-5
तैसा सांख्याहूनि प्रांजळा । तरी आम्हासारिखिया अभोळा । एथ आहाति काही परि काळा । तो साहो ये वर ॥166॥
तसा हा अष्टांगयोग सांख्ययोगा पेक्षा सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बलांना तो राजयोग समजण्यास काही काळ विलंब लागेल; पण तो विलंब सहन करता येईल.
167-5
म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥167॥
म्हणून हे देवा ! एक वेळ त्या अष्टांगयोगाचा अनुवाद करावा. जरी त्याचा विस्तार झाला,तरी चालेल; परंतु तो योगमार्ग आरंभापासून शेवटपर्यंत सांगावा.
168-5
तव कृष्ण म्हणती हो का । तुज हा मार्ग गमला निका । तरी काय जाहले ऐकिजो का । सुखे बोलो ॥168॥
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, असे का !! तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे ? ऐक, आम्ही तो तो आनंदाने सांगतो.
169-5
अर्जुना तु परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हासीचि वानी कायसी । सांगावयाची ॥169॥
हे अर्जुना ! तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस करतोस, असे असताना आम्ही तुला सांगण्याची कमतरता का बरे करावी ?
170-5
आधीच चित्त मायेचे । वरी मिष जाहले पढियंताचे । आता ते अद्भुतपण स्नेहाचे । कवण जाणे ॥170॥
(ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ) आगोदरच आईचे अंतःकरणं,त्यात आवडत्या लेकाराचे आवडतेपणाचे निमित्त झाले; मग त्या ममतेच्या अद्भूततेची कल्पना कोणाला येईल ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-5
ते म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । की नवया स्नेहाची सृष्टि । हे असे नेणिजे दृष्टी । हरीची वानू ॥171॥
त्या अद्भुत प्रेमाला करुण्यरूपी जलाचा वर्षाव म्हणता येईल अथवा नूतन प्रेमाची सृष्टी म्हणता येईल. परंतु हे असो, श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे, हे कळत नाही.
172-5
जे अमृताची वोतली । की प्रेमचि पिऊन मातली । म्हणोनि अर्जुनमोहे गुंतली । निघो नेणे ॥172॥
ही कृपादृष्टी अमृताच्या मुशीत ओतली अथवा प्रेम पिऊन मस्त झाली होती, म्हणून अर्जुनाविषयीच्या मोहमध्ये गुंतली असून तिला बाहेर येता येईना.
173-5
हे बहु जे जे जल्पिजेल । तेथे कथेसि फाकु होईल । परि स्नेह रुपा नयेल । बोलवरी ॥173॥
या कृपादृष्टीसंबंधी जास्त बोलावे, तर कथेचे विषयातर होईल. श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अलौकिक प्रेमाचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही.
174-5
म्हणोनि विसुरा काय येणे । तो ईश्वरु आकळावा कवणे । जो आपुले मान नेणे । आपणचि ॥174॥
म्हणून हा विचार का बरे करावा ? जो ईश्वर आपल्या अनंत स्वरूपाचे मोजमाप आपणच करू शकत नाही, तो ईश्वर कोणी बरे आकलन करावा. ?
175-5
तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारे असे म्हणतु । परिस बापा ॥175॥
तरी मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून असे वाटते की, श्रीकृष्ण सहज मोहित बलात्काराने अर्जुनास असे म्हणेल की, ” अरे बाबा ! मी सांगतो, ते ऐक. “
176-5
अर्जुना जेणे भेदे । तुझे का चित्त बोधे । तैसे तैसे विनोदे । निरुपिजेल ॥176॥
हे अर्जुना ! ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल, त्या त्या प्रकाराने तुला कौतुकाने सोप्या मनोरंजक भाषेत सांगेन.
177-5
तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥177॥
तो योग कशाला म्हणतात ? त्या योगाचा उपयोग काय ? आणि त्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो ?
178-5
ऐसे जे जे काही । उक्त असे इये ठाई । ते आघवेचि पाही । सांगेन आता ॥178॥
याप्रमाणे जे जे काही या बाबतीत (शास्त्रात) सांगितले असेल, ते सर्वच मी तुला आता सांगेन, पाहा.
179-5
तू चित्त देऊनि अवधारी । ऐसे म्हणोनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥179॥
तू मन लावून ऐक. असे म्हणून भगवान श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल.
180-5
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करु प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥180॥
अर्जुनाशी असलेल्या द्वैत न मोडता श्रीकृष्णाने अर्जुनाला जो राजयोग सांगितला, तो प्रसंग आम्ही स्पष्ट करून सांगतो, असे निवृत्तींनाथांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणाले.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया – कर्मसंन्यासयोगोनाम्
पञ्चमोऽध्यायः ॥5॥
॥ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु॥
॥ भगवद्गीता श्लोक :- 29 ॥ ॥ज्ञानेश्वरी ओव्या :-180 ॥



-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम

सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय

वारकरी ग्रंथ सूची

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading