आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

झाशीची राणी संपूर्ण भाग ५, (२१ ते २५)
आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! धगधगती शलाका, इतिहासातील एक पर्व ! स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा ! इंग्रजांचा तनखा खात, त्यांचे पाय चाटत, देशाची माती त्यांच्या स्वाधीन करुन ऐषारामात जगणार्या संस्थापिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तेजोमयी ज्योत म्हणजे झाशीची राणी !
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
झाशीची राणी
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – २१.
एवढी भीषण युध्द स्थिती सुरु असतांना सुध्दा लक्ष्मीबाईंना आजच जुन्या गोष्टी कां आठवताहेत? मावशी ! स्वामी विकलावस्थेत शय्येवर आणि दत्तकाची तयारी सुरु असतांना नागपुर हुन बातमी आली की, तिथल्या राजाचा दत्तकाधिकार नाकारुन संस्थान खालसा करण्यांत आले, खजिन्यांवर इंग्रजांची मोहोर. . . . . ७० वर्षाच्या बंकाबाईवर हा प्रसंग ! त्यांच पिढ्यानंपिढ्याचं जवाहिर, मौल्यवान वस्तुचा या क्रुर व दुष्ट साहेबांने लिलाव केला, त्यावेळी बंकाबाईस राज वाड्यास आग लावावीसी वाटली तर काय चुकले? स्वामी आधीच दुःखाने खचलेले, त्यात या नागपुर वार्तेने भर पडुन सरपटुन ते गेले. तानुमावशी, माणसं बांडात सामानसुमान ठेवत आहे तोच किल्ल्यावरुन किंकाळी ऐकु आल्याने राणीसाहेब विचारांतुन भानावर येऊन चमकुन पाहिले तर, भोपटकर एका माणसाला चाबकाने फोडत घेऊन येत होते. तो नाबाबअलीने पाठवलेला हेर होता. प्रकरण निर्गत होऊन त्याला कैदेत डांबण्यांत आले.
मावशी ! एकदा किल्ल्यावरच्या मंदिरांत जातांना, आम्ही महाराजांना विचारले होते, इथे मंदिराच्या वाटेवर फाशीगेट? महाराज फाशी देणं बंद करा ना. . . त्यावर महाराज म्हणाले होते. . . राणीसाहेब किती विचित्र मागणी?जर शिक्षा बंद केल्या तर धाकच उरणार नाही माणसं बेलगाम होतील. तरीही तुमच्या सन्मानार्थ फाशीची शिक्षा रद्द करु. तेव्हा पासुन फाशीची शिक्षा तर रद्द झाली पण माझ्या दैवातल्या. . . . .
मनुबाई ! आजच या सार्या गतस्मृती का?ही उदासी?ही दिलकचराई? हे रोते पण? आपण तर मर्दमाकुल. . . स्रीच्या कच्चेपणावर मात करणार्या. . . मावशी ! तरी स्रीत्वाचे बंधन झुगारु शकतो कां? दरमहा तीन दिवस आम्हास अस्पर्श ठेवताच ना?अस्पर्श. . . निष्कीयता, त्यातुन करुं शकतां आमची मुक्तता?त्यावेळी घोडसवारी, तलवारबाजी किती कठीण होऊन बसते?मनुबाई ! हा तर निसर्ग. . . त्यास आम्ही कसा अटकाव करणार?
ह्युरोजने किल्ल्याला वेढा घातला. त्या दुर्बिनीतुन बघत असतां कांही इंग्रज स्वार किल्ल्याच्या पश्चिमेस आल्याचे दिसतांच, राणीसाहेब कडाडल्या, लगाव बत्ती. . काडमिनी चालवा. इंग्रजस्वार धारातिर्थी पडले. दुसर्या दिवशी भीषण युध्दाला तोंड लागले. दोन्हीकडुन तोफ गोळ्यांतील छर्रे घरांवर, माणसांवर पडत होते. रयत घाबरुन गेली. किल्ला तोडण्या साठी इंग्रजांनी तोफांचा भयंकर मारा चालु केला. तरीही त्यांचे दोन तोफची मारण्यांत राणींना यश आले. त्या स्वतः तोफेस बत्ती देत होत्या. किल्ल्याला खिंडार पडले की, खालपासुन मनुष्याची माळ वरपर्यंत, गवंडी सामान घेत, घोंगडी पांघरुण खिंडार बुजवत व पुन्हा बुरुजा वर चढुन मोर्चे बांधत अन् मोर्चावरची तोफ धडधडु लागे आणि इंग्रजांच्या तोफा बंद पडत. मग इंग्रजांनी कावा केला पाण्याच्या हौदावर गोळे फेकल्याने, पाण्याचा साठा संपुष्टात आल्यावर जिवा वर उदार होऊन माणसं कावडीने पाणी पुरवु लागली. राणीसाहेब सगळीकडे स्वतः जातीने फिरुन मोर्चे, तोफा, तोफची, सैनिक यांना धीर व सुचना देत होत्या. गेल्या पांच रात्रींपासुन त्यांना क्षणभरही विश्रांती नव्हती की, झोप नव्हती.
याच धामधुमीत तोफेच्या गोळा बनविणार्या कारखान्यावर इंग्रजाकडचा एक गोळा येऊन पडल्याने कारखान्या तील गोळाबारुदने पेट घेतला. धूमधडाम, कडाकड आवाज होत धूरांचे लोटचे लोट पसरले. माणसाला माणुस दिसेनासा झाला. थोड्यावेळाने धूर कमी झाल्यावर समोरचे दृष्य अतिशय भयानक होते. कारखान्यातील ३०-४० माणसांचे भाजलेल्या वांग्यासारखे मांस लोंबत होते भाजण्याची आग, हात पाय तुटल्याच्या वेदना, किंकाळ्या, रडणे यांनी किल्ला हवालदिल झाला. पाण्याचा तुटवडा, आरोळ्यांनी माणसं थरारत होती. त्वरेने जखमींची शुश्रूषा, उपचार सुरु झाली. राणीसाहेब चारी दिशा धावत होत्या. दिसत होती फक्त प्रेते जळलेली, जखमी, हातपाय तुटलेली, कांही आसन्नमरण, कांही मेलेले, प्रयत्नांची शर्थ चालु होती. किल्ल्यावरुन पेटलेलं शहरं दिसत होते. घरं जळत होती. दोन्हीकडुन तोफांची मारामारी, खणाखणी सुरु होती. इंग्रजां कडे नवी ताजी कुमक येत होती. राणी साहेब तात्या टोपेची आतुरतेने आससुन वाट बघत होत्या. किल्ल्यावरची परिस्थीती तुटायला आली. पाण्याचा वणवा ! प्रेतांची दुर्गंधी, दारुधुरांचा वास. . . कधी येणार मदत?कधी माझं सैन्य सुखरुप होईल?कधी त्यांना पोटभर अन्न व घोटभर पाणी देऊ?कधी. . कधी. . कधी
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – २२.
अशाच बिकट स्थितीत आणखी ३-४ दिवस गेले. रणशिंगे, कर्णे, बिगुल वाजत होते. सुसाट वेगाने लाल लाल अग्निगोल शहरांवर पडत होते. सैरावैरा धावत माणसं आश्रय शोधीत होती, तोच तात्या टोपे ससैन्य झाशीच्या आग्नेय बाजुकडे पोहोचल्याचे राणींना कळल्या वर त्यांना जरा धीर आला. पण किल्ल्या तील वाड्यावर धडाधड गोळे पडुन अनेक छिद्रे पडली. गणेश मंदिरातील हुंड्या, झुंबरे, लखनौहुन आणलेली कांचे ची झाडे फुटल्याने काचांचा फक्त ढिगारा उरला. वाड्यात दासी, मुले, बायका आश्रयाला आलीत. तात्या १५, ००० सैन्याविरुध्द लढाईची पराकाष्ठा करीत होते. इंंग्रजांना वरचेवर नवी कुमक व दारु गोळा घेऊन कॅप्टन आला. धूमसान लढाई जुंपली. तात्या टोपे आंत येण्यास धडपडत होते, प्रयतानची पराकाष्ठा करीत होते. अनेक तोफा धडाडत होत्या. इंग्रजांनी तात्यांचे सैन्य जर्जर केले. रणां गण पेटल्रा सारखे दिसत होते. तात्यांच्या तोफा सज्ज असुनही धुरामुळे बत्ती लागेना. इंग्रज भिडला. तात्याचे सैन्य पराभूत झाले. तोफा आणि जड सामान रणांगणांत टाकुन सैन्य माघारी गेले. राणी साहेबांची आशा मावळली.
इंग्रजांना आणखी तोफांची प्राप्ती झाली. तात्यांचे प्रयत्न व धाडस नैसर्गिक आपत्तीने व्यर्थ गेले. त्या स्वतः तोफेजवळ जाऊन उभ्या राहिल्याने तोफच्यांना स्फुरण चढुन त्यांनी तोफांचा महावर्षाव केल्याने इंग्रज जाया झाले. थोडेसे हायसे वाटत नाही तोच पलिखान्यातल्या हत्तींवर तोफगोळे येऊन पडले. घोड्यां च्या पागा जळल्या. जिथे देशविदेशीचे सुंदर सुंदर पक्षी होते तिथेही गोळा पडल्याने पक्षीही तडफडुन मेले,
राणीसाहेब गेले अकरा दिवस किल्ला लढवित होत्या. तात्या टोपेंची मदत मिळुं शकली नाही, इतर कुठुनही आशा नव्हती. त्या जखमी वाघीणी सारख्या किल्ल्यावर फिरत होत्या. ३-३ पोत्याची खिचडी शिजणारी भांडी रिकामी पडली. माणसं कावडीने पाणी आणुन आणुन रक्त ओकु लागली. तेला, पाण्याच्या कढया, तेलाचे डबे रिकामे झाले होते. सरपण संपले. एवढ्यात वार्ता आली की, मुख्य तोपची दुलाजीसिंगने फितुरी करुन तोफगोळ्या ऐवजी बाजरी च्या थैल्या उडवत होता. नुसतेच खोटे आवाज ! वातावरण चिघळलं. . भिजवलेले गवताचे भारे पायर्यासारखे एकावर एक रचुन गोरे सैनिक तटावर चढुन वर येत होते. ते पाहुन देशी सैनिक भिऊन गांवात शिरले. तटावर पहारा किंवा कुणी राहिले नाही. खिन्नपणे नजरबाजांनी ही वार्ता सांगताच त्या धावतच किल्ल्यावरआल्या
जेवढे होते तेवढे सैनिक गोळा करुन राणीसाहेब म्हणाल्या, जे घडलं ते आपल्या नजरेसमोर आहे. आपली धुणी पाणी, अन्नदाणा सरला तरी, माझ्या शरीरा त रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढेन. १५०० अफगाणी सैनिक सोबत घेऊन, घोड्यावर स्वार होऊन त्या सुसाट वेगाने निघाल्या. राणीसाहेब आपल्या धारदार तलवारीनीशी गोर्यांवर तुटुन पडल्या. किंकाळ्या फोडत गोरे कोसळत होते. त्यांचा आवेश, हिंमत, मर्दानगी, शौर्य, चापल्य बघुन क्षणभर ह्युरोज चकित झाला. या आघाताने गोरे सैनिक घाबरुन आडोसा शोधुन लपुन गोळ्या चालवु लागले. दोन गोळ्या तर अगदी राणींच्या बाजुने आल्या. तेवढ्यात भोपटकर जवळ येऊन म्हणाले, राणीसाहेब ! गोर्यां जवळ कडामिनी आहेत. गोळ्या कशाही कुठुनही येऊ शकतात. आपण सुरक्षित राहणं महत्वाचं ! किल्ल्यात चलावं, आतां साहसाची नाही तर पध्दतशीर योजनेची गरज आहे.
राणीसाहेब वळल्या तोच ह्युरोज चा उधळलेला घोडा राणींकडे येत असलेला पाहुन सुंदर आणि मोतीबाई त्याला थोपवत असतानाच गोळ्या लागुन त्यांच्या प्रिय सख्या कोसळल्याचे कळल्यावर त्यांना अश्रु आवरणे कठीण झाले. भोपटकर ! त्या दोघींचे अंत्य संस्कार कलेवर आणुन किल्ल्यात करा. नाहीतर मुक श्रध्दांजली. . . माझे एकएक जिवलग मृत्युच्या कराल जबड्यात. . मी. . मी. . मी तरी कशाला जगु?राणीसाहेब ! आतां दिलकचाईची भाषा नको. आपण तर हिंमतीचे महामेरु. . . अजुन तर खुप मोठी लढाई पुढे आहे. किल्ल्यात चलावे.
पांच पन्नास शिपाई मारत, रक्ताच्या चिरकांड्यांनी रंगलेली ती रणयोगिनी किल्ल्यात आली. छोटी आई, तानुमावशी स बोलावुन मोरोपंतांना म्हणाल्या, पिताश्री ! यांना घेऊन आपण निघुन जा. . मोरोपंत ताडकण म्हणाले, मनूबाई ! तुम्हाला क्षणभरही सोडणार नाही. मग पत्नी चिमाबाईकडे वळत म्हणाले, संपला आपला ऋणानुबंध ! माझा कुळपुत्र, कुल वैभवाला मोठा करा. मनूबाईची किर्ती असामान्य. . . यावच्चंद्रदिवाकरौ तळपत राहील. त्यातच आपण दोघे विरघळुन जाऊ. . जा. . जा. . . आतां. . तानुमावशीसह जा. . जपा. . .
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – २३.
तानुमावशी व छोट्या आईच्या पायावर राणीसाहेबांनी माथा टेकुन जड, भरल्या अंतःकरणाने निरोप दिला. झाशी च्या रस्त्यारस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते. आगीचे लोळ येत होते, घराघरांतुन सैनिक लुटमार करीत होते. लक्ष्मीबाईचे मन वेदनेने ठणकत होते. जिवलगांचा वियोग असह्य होता. दुःखाने ह्रदय फाटायची वेळ आली होती. हलवाईपुर्या पासुन शहराला आग लागली होती. वाटे वाटेत प्रेतांचे खच, उपाशी जनावरे तडफडत होती. कुत्री प्रेते फाडत भेसूर रडत होती. शहरांत तर बालकापासुन म्हातार्यापर्यंतची माणसं मारल्या जात होती. इंग्रजांपुढे साष्टांग दंडवत घालुन जीवदान मागीतल्यावर रयतेच्या विनंती नुसार बागेत बंद करुन त्यांचेवर पहारे बसविले. अनेक स्रीयांनी आडात जीव दिले. हे सर्व पाहुन व्यथीत स्वरांत. . . .
राणीसाहेब म्हणाल्या, किल्ल्या तील दारुगोळा पेटवुन इथेच मरुन जावे. .
मोरोपंत म्हणाले, हे काय बोलणे?असं लाचार मरण्यापेक्षा. . . व्हा घोडीवर स्वार. . किल्ल्याचा जड अंतःकरणाने निरोप घेत मोरोपंत, काशी, मुंदर दामोदरला संगे घेऊन राणीसाहेब, नानासाहेब, तात्या टोपे सोबत इंग्रजांशी लढण्यासाठी, किल्ल्या तील लग्न झाल्यापासुनच्या अनंत आठवणींचे गाठोडे घेऊन कालपीकडे निघाल्या. किल्ल्यात असलेल्या दोन राज बंद्यांपैकी, सदाशिवरावांना सोडुन दिले, पण मलहारीचे अनंत अपराध असल्या मुळे त्याला गोळ्या घातल्या.
झाशीचे वैरी असलेले ओरच्छा व दतियांनी दुपारीच इंग्रजांना मदत करीत असल्याचे व राणींना जिवंत पकड ण्याचे मनसुबे रचले जात असल्याची बातमी आली. नोकरचाकर दासदासिंना गुप्त भूयारीमार्गे व कांहीजणं राणींबरोबर भांडोरी फाटकाकडुन कालपीला जाण्याचे ठरले. जवाहरच्या तुकडीबरोबर ४ एप्रील, चंद्रोदय उशीरा असल्यामुळे रात्रीच्या अंधारांत पुरुषवेश, अंगात चिलखत, पाठीशी दामोदरला घट्ट बांधुन, आपल्या लाडक्या सारंगी घोडीवर बसुन गुलाम मोहम्मद, मुंदर, काशी, रघुनाथसिंह, यांच्या अधिपत्याखालील ४०० अफगाणी सैनिकांसह इंग्रजांच्या डोळ्यांत धूळ झोकुन लक्ष्मीबाई सूसाट वेगाने भांडेर दरवाज्यातुन बाहेर पडल्या. तटबंदीजवळ तेहरीच्या फौजेने अडवतां च ही तेहरीचीच फौज. . . ह्युरोजच्या तळा कडे निघाली अशी लोणकढी थाप मारुन ही शूर, निर्भय महाराणी कालपीकडे निघाली. राणींच्या सैनिकांनी इंग्रजांचे अनेक सैनिक घायाळ करुन त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. राणी पळुन गेल्याची वार्ता ऐकुन ह्युरोज थक्क झाला. इतका कडेकोट बंदोबस्त, चौकी, कडेपहारे, अगनित फौजा असतांना राणी निसटलीच कशी? कोणालाच कसं कळलं नाही?आकाशातुन उडुन गेली की, भूयारातुन?घोडा मिळाला कैसा?ही स्वार झाली तरी कशी व केव्हा?पण त्याला काय माहित की, त्याच्या सैन्यात असलेल्या देशी सैन्याचे मन व हात त्यांच्या लाडक्या राणींसाठीच आहेत. ह्युरोज संतापाने पेटुन उठला. बेभान झाला. राणीच्या पाठलागावर फौज रवाना केली. भांडेरचे फाटक बंद केले. तोवर राणीने बौकरला जखमीअवस्थेत झाशीकडे पिटाळुन स्वतः कालपीस पोहचल्या. नानासाहेब, रावसाहेब, तात्या साहेब व तात्या टोपे या चार शूर लढवय्यांनी पुन्हा मोर्चे बांधले.
नजरबाज जीव धोक्यात घालुन क्षणाक्षणाच्या वार्ता पुरवित होते. राणीं च्या मदतीला कुणी जाऊं नये म्हणुन कालपीकडे जाणारे रस्ते सील केले. बेटवा नदी ओलांडतां येऊ नये म्हणुन तिथेही कडक बंदोबस्त ठेवला. ह्युरोज पोटदुखीने हैराण होता तरी, दिल्ली, बिठूर कानपुर, लखनौला इंग्रजांना मिळालेला विजय पाहुन २५ एप्रिलला ह्युरोजने कालपीकडे कुच केले. पांच मैल लांबीची फौज, तोफखाना, घोडदळ, उंटदळ, साठ हजार सैनिकांचे पायदळ, अन्नधान्याच्या हजारो बैलगाड्या, ओझे लादलेले बैल, उन्हाळा असल्यामुळे पाण्याचा साठा, एखाद्या मोठ्या अजगरी प्रवाहासारखी फौज राणीला पकडायला येत आहे. पुढे नजरबाज तात्यांना म्हणाला, दोन वाईट बातम्या राणीसाहेबांना कळु नका देऊ.
राणीसाहेबांची पाठराखण करणारे मोरोपंत आणि बक्षीची वाट चुकल्याने अंधारात नेमके वैरी असलेल्या दतिया च्या हद्दीत. . . . पळुन जावे तर मांडीवर जखम. . . तिथल्याच एकाकडे आश्रय घेतल्याचे दतियाच्या दिवाणाला कळताच दोघांना कैद करुन त्यांच्याजवळचे सर्व लुटुन हॅमिल्टन साहेबांच्या स्वाधीन केले. दोघांवर देशद्रोहाचा खटला भरुन, न्यायाचं नुसतंं नाटक करुन या दोघां निष्ठावानांना झोकत बागेत फासावर लटकवले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – २४.
दुसरी बातमी. . झाशीत हाःहाकार माजला आहे. पहिल्या ३-४ दिवसांत बेमुर्वत कत्तली करुन प्रजाजनांची शिरे झाडाझाडांवर लटकवलीत. रस्त्यावर जनावरे, मुले, माणसांच्या प्रेतांचा नुसता खच. . . बायकांनी विहिरीत उड्या घेतल्या. किल्ला, राजवाडा लुटण्यांत आला. सरदार, कारभारी, व्यापारी यांच्याकडील सोने चांदी, हिरेमाणके गोर्या सैनिकांनी लुटुन नेले, एवढेच नव्हे तर भांडी, रहाटाचे दोर, जुने कपडे सुध्दा. . . असा महाप्रलय झाशीत झाला आहे.
तेवढ्यात पुरुषी वेश, केसांचा घट्ट बुचडा, कमरेला जांबिया, तलवार, खोचण्यासाठी पट्टा, अंगावर उततरीय, एखादी रणयोगिनी साक्षात अवतरावी तशा राणीसाहेब येऊन बसल्या. मनांतील खदखद शब्दात ओतीत म्हणाल्या, नाना साहेब ! सैन्यात नुसती अंदाधुंदी, बेशीस्त, सगळे व्यसनाधीन, आम्ही आल्यापासुन शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. तात्यांच्या दारुण पराभवाने आमचे सारे मनसुबे धडाधड कोसळले. नानासाहेब ! आपल्या पुर्वजांनी ही रत्नजडीत तलवार आम्हाला दिली होती. तीचा योग्य सन्मान आजपर्यंत केला, पण आतां आपले सहाय्य नसल्याने परत घ्या ही तलवार. . .
मनुबाई ! आपला संताप आम्ही समजु शकतो. आपण आतां सारी सुत्रे हाती घेऊन सेनापती व्हा. तात्याही आपल्या सल्ल्यानुसार वागेल. सध्या ते स्वराज्यासाठी प्राण टाकत घोड्यावरुन चारी दिशा फिरताहेत. मागचं सारं विसरुन पुरातन गौरवाची ही तलवार पुनश्च हाती घ्या. आपण सारे एकमुठीने प्रतिकार करु. . . .
राणीसाहेबांनी सारी सूत्रे हाती घेऊन सर्व सैनिकांना शिस्तीत बांधुन “लाल तुकडी” या नांवाने एकत्रीत केले. दरम्यान तात्या टोपेने ग्वाल्हेरचे कांही सैनिक कालपीत आणुन प्रमुख केंद्र उभारले. १०, ००० पौंड बारुद, तोफांचे गोळे, बंदुका, ४, ००० तंबु, तोफा ओतायचे चार कारखाने, तोफांचे गाडे यांनी कालपी गजबजुन गेले.
कोटा आणि बुंदेलखंडी सैनिक झाशीवर पुन्हा आक्रमण करेल या भितीने ह्युरोज कालपीला येण्यासाठी पूॅंछला येऊन थांबला. मेजर गाॅल व राबर्टरला आधीच कालपीकडे रवाना केले होते. लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे सैनिकांसह कौंच गावी पोहोचले. राणीने कौंच नगरीच्या चारही बाजुने खोदलेल्या खंदकात सैन्य दबा धरुन बसवले. नगेपुरा उमरी, चमेडच्या बाजुने ह्युरोज सैन्यासह आला असतां, खंदकात दडलेल्या सैन्य बाहेर येऊन इंग्रजांवर तोफांचा वर्षाव करुं लागले, पण गोरे सैन्य अतिशय शिस्तबध्द, त्यांनी भारतीय सेनेभोवती कडे केले. राणींचे ५०० बलुची व गुलमोहम्मंदचे १००० हजार पैदल सैन्याची व ब्रिगेडियर स्टुअर्सच्या सैन्यात लढाई जुंपली. युध्दाच्या या ऐन धुमचक्री त तात्या टोपे युध्दभूमी सोडुन चरखारी गावाकडे गेल्याचे कळताच राणीला अतिशय संताप आला. पण त्यांना कुणी तरी सांगीतले की, तात्या ग्वाल्हेरीस सैन्य आणण्यास गेले. पण असं अचानक? रणक्षेत्र सोडुन? नानासाहेब पेशव्यांचं सैन्य सैरावैरा पळू लागले. ह्युरोजने कौंच किल्ला हस्तगत केला
राणी सपासप तलवार चालवीत लढत होत्या. तात्या इतके बेजबाबदारपणे कसे वागु शकतात याची चीड आली. सैन्यात पळापळ माजली. राणींचे शौर्य व्यर्थ जात होते. ब्रिटिशांकडे अधिकाधिक कुमक येत होती. त्याचं सैन्य पेशव्यांच्या सैन्याला रेटत रेटत कालपीकडे सरकत होते. गुलाम मोहम्मंद, रघुनाथसिंग यांच्या मदतीने सैन्य संगठीत करुन कालपीकडे परतण्याचा निर्णय राणीने घेतला. उन्हाने सैनिक हैराण, त्यांना लू लागुन मुर्च्छा येऊन घोड्यावरुन कोसळत होती. तहाने ने हैराण, गोर्यांची संख्या अत्याधिक, ह्या सर्व परिस्थितीमुळे अखेर राणींना माघार घ्यावी लागली. तात्या टोपेंच्या बद्दल मनांत नुसतां आगडोंब उठला होता.
कालपीत पोहचल्याबरोबर राणीं नी बैठक बोलावली. मुंदर, काशी धावत येऊन त्यांच्या जखमा धुवुन औषधोपचार केले. दामोदरला छातीशी कवटाळले. तोच मुंदरने सांगीतले, आपली दोन रत्ने गळली गंगा ह्युरोजशी लढतांना आणि झलकारी? आपल्याला कालपीकडे जायला वेळ मिळावा या हेतूने इंग्रज सैन्यांना चकवण्यासाठी गोर्यांच्या तळा समोर जाऊन उभी राहिली. ह्युरोजसमोर नेल्यावर तिच्या वेशाला तोही फसला. पण तेजस्वी, तडफदार विद्युल्लता राणी अशी समोर येईल हे त्याला न पटल्याने फितूर दुलाजीस बोलावुन ओळखायला सांगीतल्यावर, ही तर कोष्ट्याची झलकारी ती पचकण दुलाजीच्या तोंडावर थूंकली. तिला कैद करण्यांत आले, तोपर्यत बराच वेळ गेल्याने आपण बरीच मजल मारली होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – २५.
नानासाहेब, रावसाहेब, सेनापती, सेनानायक, गणनायक सर्व येऊन बसल्यावर राणीसाहेब संतापाने गरजल्या. . . आम्ही जीवाची बाजी लावुन लढत असतांना तात्या टोपे गारपिटीची, मोक्याची जागा सोडुन जाऊच कसे शकतात?सेनाधिकार्याच्या अशा वागण्याने फौजेने हैबत खाल्ली. आम्ही एकट्या हा डोलारा कसा सावरणार?
मनुबाई ! बांद्यांचे नबाब अलिबहादूर व्हिटलाॅक कडुन पराजित झाल्याचे दुःख तर आहेच, तरी पण २, ००० ची फौज घेऊन आपल्या मदतीला येत आहे. तात्या पण ग्वाल्हेरहुन मदत मिळवतो आहे. लढाईच्या ह्या धुमश्चक्रीतच्या यज्ञात सगळेच आपापल्या परीने धृत टाकत आहे.
नानासाहेब ! शिस्त नसेल तर, यज्ञवेदीतील धृत व्यर्थ जाईल. युध्दे बुध्दी चातुर्यावर चालते. झाशीला तात्यांचा उपराळा मिळतां तर, झांशी हातुन गेली नसती. किल्ला सोडावा लागला नसतां. जाऊं देत जे झालं ते परत येणार नाही पण यापुढे संयोजन, नियोजन व शिस्त या त्रिसुत्री कारवाईने आपल्याला जिंकायचय्. तीन महिण्यापुर्वी यात्रेसाठी द्रव्य मागायला आलेला ब्राम्हण इंग्रजांचा हेर होता. त्याने द्रव्याच्या बदल्यात किल्ल्याचा सागर दरवाजा उघडुन दिला होता. दुलाजीने तोफेत दारुऐवजी वाळु बाजरीची पोती घातली होती. फितूरी पासुन सावध राहुन देशप्रेमाचे अंगार फुलवुन स्वराज्यासाठी प्राणार्पन करणारी, जीवावर उदार होणारी माणसं निर्माण करावी लागेल. कामकाज संपवुन
त्या देवघरांत येऊन देवाला प्रार्थना करीत म्हणाल्या, हे इश्वरा ! हा देश, ही माती, ही प्रजा यांच्या रक्षणार्थ शक्ती दे. . शक्ती दे. .
बांद्यांचे नबाब आणि राणीसाहेब सैन्य बांधणीच्या कामी लागले. कालपी च्या तिन्ही बाजुस तोफांचे मोर्चे लावले. सैनिक प्रशिक्षित केल्या जात होते. नाना साहेब फौजेत फिरुन त्यांना चेतना, उत्साह देत होते, राणीसाहेब चहुबाजुने धावत होत्या. दक्षिणेकडे बांद्यांचा नबाब, अयोध्या व सहेलखंडचे सैनिक शहर आणि किल्ल्याच्या रक्षणार्थ पश्चिमेला बाणापुरचा राजा आणि राणी आपल्या लाल तुकडीसह उत्तरेकडे, राव साहेबांच्या अधिपत्याखाली ग्वाल्हेर कंटिजेंटची सेना ठेवली.
कडक उन्हाळा असल्याने ४-५ वेळा मुर्च्छित पडत सेना पुन्हा पुन्हा आजारी पडत. विहिरी आटलेल्या, हत्ती, उंट, घोडे यांना पाणी मिळणे कठीण ! कडक उन्हाने सैनिक शक्तीहीन, कुठुनही सहयोग मिळत नव्हता. इतक्या संकटाशी सामना करत ह्युरोज कालपीकडे सरकत होता. स्टुअर्स ची वाट बघत असतांनाच अवकाळी पाऊस आल्याने त्यांचे तंबु, युध्दसामुग्री, गोळाबारुद भिजुन चिंब, गावकरी टपाल मारत असल्यामुळे कुणाची वार्ता कुणाला मिळेनाशी झाली. अशातच युध्दा ला तोंड लागले.
बाजीराब मस्तानीचा पुत्र समशेर बहादुरचा वंशज, बांद्याचे नबाब यांनी मातीची शपथ घेऊन युध्दात उडी घेतली. राणींनी पध्दतशीर सैन्यबांधणी केली. दोन्हीकडच्या सैन्यात धुमश्चक्री मातली. हरहर महादेवाच्या गर्जना आकाशास भिडल्या. इंग्रज सैन्य क्षणभर युध्द थांबवुन त्या रणयोगिणीचे दर्शन घेत होते तिच्यापुढे नतमस्तक होत होते. राणीला घेरा घालण्याच्या प्रयत्नात स्टुअर्सचा घोडा कोसळला.
अनेकांना कापत कापत राणी सौदामिनीसारखी तळपत होती. याचवेळी ह्युरोजचे सैन्य येऊन पोहचले. ७०० ऊंटाचं पथक रणांगणांत धुमाकुळ घालुं लागले. क्षणांत युध्दाचं स्वरुप पालटले. ह्युरोजने येऊन सैन्याची दाणादाण केली दहा तोफा आणि हत्तीदल घेऊन आनंदा ने जल्लोष करीत, गेले चार महिने चाललेल्या संग्रामात ब्रिटिशांनी कालपी ही गिळुन ससैन्य जालौनेच्या वाटेने परत निघाला.
कालपी हातची गेल्याने व वेळेवर नानासाहेबांची मदत न मिळाल्याने क्षोम ग्रस्त राणीसाहेब ओरडुन नानासाहेबांना बरचसं बोलल्यावर, मनुबाई खामोशss फार बोललात, आम्हीही लढाईत गुंतलो होतोच, आराम नव्हतो करत. आम्ही निघालो होतो. . . केव्हा?आम्ही रणांगणा वर कोसळल्यावर?हा दुर्लोकिक कसा सहन करावा?पत्नीधर्म, कन्याधर्म, मातृ धर्म, पुत्रधर्म यांची तिलांजली दिली या मातीसाठी. . . आज भगिनीधर्मासही कलंक लागला. . . . आपल्यात एकवाक्यता नाही. आतां एकट्याच आम्ही गोपाळपुर कडे निघालो. एकटीच लढु किंवा मरु. . आम्हीही येतो तुमच्या सवे. . राणींसह नानासाहेब, रावसाहेब, अलिबहादूर गोपाळपुरकडे निघाले. कालपीच्या किल्ल्यावर चढलेला युनियन जॅक पाहुन त्यांचे ह्रदय कापीत गेले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.






