आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

झाशीची राणी संपूर्ण भाग २, (६ ते १०)
आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! धगधगती शलाका, इतिहासातील एक पर्व ! स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा ! इंग्रजांचा तनखा खात, त्यांचे पाय चाटत, देशाची माती त्यांच्या स्वाधीन करुन ऐषारामात जगणार्या संस्थापिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तेजोमयी ज्योत म्हणजे झाशीची राणी !
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
झाशीची राणी
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – ६.
मिरवणुकीच्या प्रारंभी हाती उंच निशाण उभारुन पांच घोडेस्वार, नंतर वाजंत्री चौघडे, त्यामागे बॅंडपथक, नंतर घोडेपथक आणि आश्चर्यकारक स्रीयांचे २० घोड्यांचं घोडदळ, त्यामागे तुतार्या च्या निनादात सजलेल्या हत्तीवर चांदीच्या अंबारीत महाराज गंगाधरराव आणि महाराणी, त्यामागे मानर्यांचे दोन हत्ती, मागे नर्तकीचा ताफा ! झाशीच्या राज रस्त्यावरुन मिरवणुक जात होती. स्रीयां च्या घोडदळावर फुलें उधळली जात होती. राजा राणीच्या जयजयकाराने आकाश दुमदुमुन गेले. झाशीला एक समर्थ राणी मिळाली होती. जनता गवाक्ष सौधावरुन, वाटेच्या दुतर्फा फुले ऊधळत नमस्कार करीत होते.
गंगाधररावांचे मनूशी विवाह झाल्या वर त्यांनी आपल्या ३२ वर्षीय सासर्याचे मोरोपंताचे लग्न चिमाबाईसंगे लावुन दिले. ते दोघेही झाशीच्या महालातच राहत होते. तानुमावशी व मोरोपंत पत्नी चिमाबाईसह आपल्या कन्येचा सुख सोहळा तृप्त मनाने डोळ्यात साठवुन घेत होते. जयजयकार करीत होते. नाना साहेबांनी हत्तीवर घेतले नव्हते म्हणुन रुसलेली बालमनू त्यांना आठवत होती. मिरवणुक सीमाल्लोघंन करुन महालक्ष्मी चे दर्शन झाल्यावर किल्ल्यावर येताच राजाराणींनी तानुमावशी, मोरोपंत व चिमाबाईस आदरवंदना दिली आणि समारंभ संपला.
दसरा झाला. या प्रसंगाची चर्चा सर्वीकडे सुरु होती. राजांमधला आमुलाग्र बदल, बंद झालेल्या नाटकशाळा, सुरु केलेली शस्रागारे, तालिमखाने. . . आपला राजा समर्थ होतसे पाहुन रयत सुखावली त्याचबरोबर राजाराणी काशी यात्रेला जाणार म्हणुन आनंदीत झाले.
झाशीच्या राजप्रसादाचं काम संपत आलं. झाशीत अनेक कलाकार, चित्रकार, विणकर राजश्रयास आल्याने झाशी गजबजुन गेली. राजांनी राजकारणांत पुर्ण लक्ष घातल्याने लाखो रुपयांचं कर्ज फिटलं, केवळ ३६ हजाराचंच कर्ज बाकी होतं. तंटे मिटत होते. कोषागारात भर पडत होती. छोट्या मोठ्या माणसांपर्यत न्याय पोहचत होता. पत्रव्यवहार नियमित होत होता. गरीबाना, शेतकर्यांना जातीवंत खिल्लारे वाढण्यास, पाटांची डागडुज्जी, ऊत्तम बि-बियानांची लावणी, जागोजागी पाण्याचे नहर, या सर्वासाठी मदत मिळाल्याने झाशीचा उत्कर्ष होऊ लागला. राजास दुवा आणि महाराणीच्या कर्तुत्वाची व शुभ पायगुणांचे कौतुक होऊ लागले. महाराणी तानुमावशीला म्हणाल्या, विकृत व्यसनांचा म्हसारा, बंध तोडणे महाकठीण, पण स्वामींनी सहज शक्य करुन दाखवले.
देवी अहिल्याबाईंनी खंडेराव व मालेरावांना व्यसनांच्या विळख्यातुन बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्यांचे सारे प्रयत्न विफल झाले, पण तुम्ही मात्र असामान्य काम करुन दाखवले. तेवढ्यात राजे येत असल्याची वर्दी आली. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व मानकरी, मदतनीस व जवळचे सर्व दिवानखाण्यात जमा झाले. सर्व येऊन बसल्यावर थोड्याच वेळात लव्याजम्या सह महाराज प्रवेशुन सुशोभीत आसना वर स्थानापन्न झाले. त्यांच्या शेजारी महारीणीही बसल्या. आजच्या सोहळ्या च्या प्रयोजनार्थ प्रधानमंत्रीनी निवेदनास सुरुवात केली. झाशी व भोवतालचा परीसर सोनारपेठ, विणकरांचे माग, रेशीम व्यापार व अन्य उद्योगधंदे सुरु झाल्या मुळे गजबजुन गेला. देवमूर्तीचे मुकुट, किरीट, कुंडले, अनेक मंदिरांचे जिर्नोध्दार, समृध्द ग्रंथसंपदा वृध्दींगत झाले हे सारे महाराणींच्या प्रेरणेने ! विद्वानांना राजाश्रय, कारागीर, विणकर, कोष्टी, मजुर यांच्यासाठी सरकारी घरकुले नवीन दोन पाठशाला, वैद्य संशोधन कार्य महाराणींच्या अथक प्रयत्नाने व दूरंदेशीने होत आहे. त्याप्रित्यर्थ गौरव म्हणुन त्यांच्या सन्मानार्थ खास चांदीची लाल मखमली महीरपी, मोत्यांची माळा, मखमली गादी लोडांनी सजलेली पालखी प्रेमादराने महाराज भेट करीत आहेत. त्यांना पालखीपेक्षा अबलख घोडा जास्त आवडला असतां. तरीसुध्दा या अनमोल भेटीचा स्विकार करुन, महालक्ष्मी दर्शना ला या पालखीतुन जाऊन महाराजांची इच्छा त्यांनी पुर्ण करावी.
टाळ्यांच्या कडकडाटात भरुन आलेल्या मनाने महाराणी उठुन म्हणाल्या, आम्ही तर केवळ भिक्षुकाची कन्या ! स्वामींनी आम्हास इथपर्यत आणल. तानुमावशीने माणुस म्हणुन घडवलं. स्वामींची इच्छा आम्ही जरुर पुरी करु ! पण, आज फिरंगा चारही बाजुने या भूभागाचे लचके तोडत आहे, कुटील कारस्थान, लाचलुचपत देऊन माणसं फितवत असुन आंतपर्यंत शिरकाव करीत आहे. त्याच्या पारिपात्यास्तव घरांघरांतीन सैनिक निर्मिण व्हावा. प्रत्येकाची पंचेंद्रिय सावध असावे, आपल्या झाशीचा किल्ला अभेद राहावा ही आपणांसर्वांकडुन अपेक्षा करुन महाराजांच्या या अद्वितिय भेट(पालखी) चा स्विकार करते.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – ७.
झाशीचे राज्य गंगाधर महाराजांना कसे प्राप्त झाले याची थोडक्यात माहिती देणे क्रमप्राप्त आहे. तानुमावशींना सारा इतिहास माहित असल्याने त्या लक्ष्मीबाईं ना कथन करुं लागल्या. . . . १५ वर्षापुर्वी याच किल्ल्यावर घडलेलं सखुबाईचं बंड, लक्ष्मीबाईच्या मोठ्या जाऊबाई ! तुझे सासरे शिवरामभाऊंना तीन मुलें. . . मोठा कृष्णराव, त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान रघुनाथराव आणि त्यांच्यापेक्षा तब्बल २५ वर्षांनी लहान तुझे पती गंगाधरराव ! गंगाधरराजेंचे जेष्ठ सावत्र बंधु कृष्णरावां ची पत्नी सखुबाई ! सखुबाई अत्यंत महत्वाकांक्षी, अधर्मी. . गंगाधरराजेंचे आजोबा रघुनाथ हरि फार प्रबुध्द शासक होते. तोफांची घडण, अनुसंधान शाळा, समृध्द ग्रंथालय वगैरेचा विकास त्यांनीच केला. त्यांच्या मृत्युनंतर तुझे सासरे शिवरामभाऊ झाशीचे सुभेदार झाले. झाशीभोवती परकोट त्यांनीच बांधला, पण दूरंदेशी, दूरदृष्टी कमी पडली. स्वतःच ब्रिटीश अधिनता स्विकारली. अस्तिनेत साप पाळला. मनुबाई ! अधिनता स्विकारण्याचे बक्षीस म्हणुन शिवरामां च्या वंशाला झाशीचं सिंहासन कायमचं मिळालं. आणि याच राज्यप्राप्तीसाठी त्यांच्या जेष्ठ पुत्रवधु सखुबाईने कुटील कारस्थानं, चिथावणी, पैशांनी फितुरी विकत घेणे अशा कारवाया सुरु केल्यात. घरच्यांच्याच जीवावर उठणार्या घरभेदी स्रीचे कांही चालु न देतां, शिवरामभाऊंनी कृष्णरावांना सुभेदार केले, पण त्यांचा अवघ्या २५ व्या वर्षी मृत्यु झाला. जाणत्या व्यक्तीला सुभेदारी न देता, सखुबाई-कृष्णरावांचा मुलगा रामचंद्रास दिली. तुझे दीर रघुनाथराव व पती गंगाधर रावांना १२ हजाराचा तनखा देऊन गप्प बसविले. आणि एवढे कट कारस्थान करुनही सखुबाईंना कांहीच अधिकार न मिळाल्यामुळे तीचा संताप अनावर झाला. स्वतःचाच मुलगा रामचंद्र तीला शत्रुसमान वाटु लागला. अहिल्याबाईंच्या पोटी कुपुत जन्मुन सुध्दा त्यांनी सांभाळ केला. अश्या सखुईंनी सेवकांना चिथवलं, अशांती, अराजकता माजवली. या सार्याचा ताण सहन न होऊन शिवराम भाऊंनी दोन वर्षातच डोळे मिटले. १८१७ ला दुसर्या बाजीरावांनी तहसंधी करुन, इस्ट इंडिया कंपनीला बुंदेल खंडाचे सर्वाधिकार दिले. कंपनीने अकरा वर्षाच्या रामचंद्रांच्या अधिकारास मान्यता दिली. त्यांच्या वतीने आम्बेदारकर कामकाज पाहु लागले. पुढे दहा वर्षे सखुबाईच्या मनात जाळ उठत राहिला.
राजे रामचंद्र व ब्रिटिशांचे संबंध चांगले होते. कर्नल श् लीमनची अन् त्यांची मैत्री, राजेंचा कर्तबगारपणा, राज्यात नांदत असलेली सुख, शांती, आनंद सखुबाईला बघवत नव्हते. प्रत्यक्ष पुत्रावरच जळत होती. ९ डिसेंबर १८३२ ला स्वतः विल्यम बेंटिंग झाशीस येऊन चौरंगी दरबार भरवला. वाजंत्री तुतार्या च्या गजरात रामचंद्र राजांना “महाराजाधिराज फिदुई बादशाही जानुजा इंग्लिस्तान महाराज रामचंद्र बहादूर” हा किताब प्रदान केला आणि दरबारात लावायला ब्रिटिश झेंडाही. . . किताब सोहळा जलाली नजरेने सखुबाई बघत होत्या. राजांना इच्छेविरुध्द कांही गोष्टी कराव्या लागत होत्या. नंतर भरभराट होऊन खजिना भरु लागला. झाशीत लक्ष्मीची पाऊले उमटु लागली. पण ओरछा, दतियाच्या डोळ्यात हा उत्कर्ष खुपु लागला. त्यांनी रामचंद्रांची तक्रार बेंटीग पर्यत नेली, पण त्याने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यामुळे घुमसान लढाई केली. दुही सांधावी, समेट व्हावा म्हणुन झाशीच्या सुभेदाराचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. प्रजा स्वैरभैर होऊन वाटा फुटतील तिकडे पळु लागले. अन्नान दशा झाली. हाती फक्त झाशी व मऊरानी पुर राहिले. रामचंद्रांचे सारे प्रयत्न वाया जाऊन पराभूत झाले. अराजकता माजली. युध्दात तिजोरी रिक्त झाल्याने इंग्रजांचे ऋण काढावे लागले. या सर्वांचा सहाजिकच त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. मृत्युशयैवर असलेल्या पुत्राचे डोके मांडीवर घ्यायचे सोडुन, सखुबाई सागरला जाऊन मुलीला व तिचा पुत्र कृष्णरावाला घेऊन आली, आणि राजा रामचंद्रांनी भाच्याला दत्तक घेतल्याची आवई उठवली. त्याच वेळी कर्नल (Shliman) श् लीमन झाशीस आले. झाशीच्या सुभेदारीवर चार जणं हक्क सांगणारे ! तुझ्या सासर्याची काकु, रघुनाथरावांची यवनकांचनीचा पुत्र अलिबहादुर, सखुबाईचा नातू कृष्णराव आणि तुझे स्वामी गंगगाधरराव ! गंगाधरां ना हक्क मान्य झाला आणि सखुबाईने थयथयाट मांडला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – ८.
सखुबाईने किल्लेदारास भरपुर लाच देऊन किल्ला ताब्यात घेतला. माणसं विकत घेतली. त्यांनी रोजमुर्याचे भरपुर पैसे मागावे म्हणुन चिथावणी दिली. नंग्या तलवारी घेऊन माणसं किल्ल्यात फिरुं लागली. राजे गंगाधररावा च्या सुरक्षिततेची काळजी उत्पन्न झाली. ही उलट्या काळजाची बाई कांहीही करुं शकणारी, वारंवार इच्छाभंग झालेली नागीन चवताळुन उठली. अखेर गंगाधरां नी सायमन फ्रेजला अवघी वार्ता कळवली. फ्रेजने किल्ल्याभोवती वेढा घालुन ४८ तासाच्या आंत शरण न आल्यास कैद करण्याचा इशारा दिल्यावर बंडखोर, मळइखोर बाई शरण आली. अश्या धोकादायक स्रीला तिथे ठेवणे शक्य नसल्याने दातिया राज्याच्या मदोरा किल्ल्यात ठेवले. आणि झाशी राज्य निर्वेध झाले. तानुमावशी बोलायची थांबल्यावर मनूला त्या दुर्देवी दिवसाची आठवण झाली. स्वामींना स्रीवेशात बघीतल्यावर ब्रम्हांड आठवले होते. हातात तलवार घेऊन वार्याच्या वेगाने अबलख घोडा पळवणारा, इंग्रजांशी दोन हात करणार्या स्वाभिमानी पुरुषाची प्रतिमा मनांत कोरली होती. मावशी ! मला शारिरीक सुखाची अभिलाषा कधीच नव्हती ग ! पण. . . . आतां सुधारलेत ना राजे?
नाही मावशी ! आपल्याच पतीवर नजरबाज नेमावे लागावे यापरते दूर्देव कोणते असेल?सुंदरच्या पतीला शपथ देऊन त्यांच्या सर्व हालचालींचा वृत्तांत तो रोज देतो. आज स्वामींनी भेट दिलेल्या पालखीतुन व राजे घोड्यावरुन महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याचा बेत होता, पण बेत रद्द झाल्याची वर्दी आली. चौकशीअंती कळले की, महाराज अस्पर्श बसल्याचा आज तिसरा दिवस आहे ! इतकी मर्दानगी, दिलेरी पण सारे व्यर्थ. . .
उद्या महास्नानाची तयारी सुरु आहे. छीः ! हे असले विभित्स ! मावशीने पोकळ सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. . . सुंदर च्या नर्याने महास्नानाच्या तयारीचे समग्र वर्णन केल्यावर जायला सांगीतले. संतापा ने खदखदत सोहळा सुरु झाल्यावर राणी साहेब तिथे पोहचल्या. त्या आलेल्या पाहुन महाराजांसह सारे स्तब्ध घाबरत उभे राहिले. महारांजे वस्र लाल झालेले पाहुन राणीसाहेब दिःगमुढ झाल्या. महाराजांना खरच तसं काही. . . . कलशात काय आहे असं जरबेने विचारल्यावर सेवक थरथरत कसंबसं उत्तरला. . . कुंकुम जल ! क्षणांत त्यांना सारा उलगडा झाला. पवित्र कुंकु या अपवित्र कामासाठी?कुंकुम जलाने स्नान? असले नाटक?सेवकांच्या समोर बोलताही येत नव्हते. त्या महाराजांच्या समीप जाऊन अगदी हलक्या आवाजात म्हणाल्या, हे सर्व पाहुन आमच्या अंगी ज्वर भरलाय ! धन्य झालो आम्ही. . . . दिलेल्या शपथा, शब्द, तो करारीपणा, वचक कुठे गेले? आम्हाला सर्वांसमोर अपमानित करुन जाऊ नका. आमचा न्हाहण्याचा सोहळा पुर्ण करण्या ची आज्ञा द्या. संताप आवरत सेवकांना आज्ञा देऊन खदखदत त्या तडक महाली परतल्या. समोर मावशी दिसल्याबरोबर त्यांचा बांध सुटुन त्याना मिठी घालत मटकन् खालीच बसल्या.
दोन प्रहरांनी तजेलदार मर्दानी वेशातील राजेसाहेब त्यांच्यासमोर आल्याबरोबर त्या थक्कच झाल्या. हे मर्दानी रुप खरे की ते रुप? स्वामी आम्ही खचुन गेलो, पार कोसळुन पडलोय ! महाराज ! आपण दिलेला शब्द, शपथ मोडली. नियतशाबुती, शपथ, वचने जर पाळल्या गेल्या नाही तर, नात्याचे फक्त कलेवर उरतात. राणीसाहेब ! आपण आमचा आब राखला, अब्रु जपली, आम्ही आभारी आहोत याचा आम्ही नक्की सन्मान करु.
आपला मनातील खदखदणारा संताप मनातच गिळुन अत्यंत संयमाने त्या म्हणाल्या, महाराज ! जसा स्रीवेश वर्ज्य केला तसाच हाही प्रकार. . . जन माणसांत चर्चा, हसु, बदनक्षा होतो. अशा गोष्टी कर्नोपकर्णी होतात. महाराज ! सामान्यांनी कोणत्याही केलेल्या चुका क्षम्य असतात, पण राजकर्त्यानेच असं विकृत. . . महाराज ! आमचा रोष न धरावा आपल्या अश्या विकृत वागण्याने वचक, दरारा, मर्दानगी कलंकित होते. पुनरावृत्ती होऊ नये ही काळजी घेणे आमचा पतिव्रताधर्म ! उतरल्या चेहर्याने महाराज निघुन गेले.
दुसर्या दिवशी अपराधी भावाने महाराजांनी राणीकक्षेत प्रवेश करुन म्हणाले, आम्हाला कळतय की, हे योग्य नाही, पण अस्पर्श बसण्याची उर्मीच येते. वैद्यकीय इलाज झाले. वैद्य म्हणतात ही व्यसनविकृती. . . . मनाला आम्ही खुप आवरायचा प्रयत्न करतो पण मनाविरुध्द मन हे विकृती घडवुन आणतय ! खुप प्रयत्न चालु आहे पण यश येत नाही, आम्हीही शर्मिंदा आहोत, आम्हालाही अपार कष्ट, शीण येतो. राणीसाहेब ! आपण थोर मनाच्या, प्रगल्भ बुध्दीच्या, दूरंदेशी, न्यायदृष्टी आहात. पंडीत जसा बालकाहस्ते अक्षरे गिरवुन घेतात तैसी दृष्टी आम्हावर ठेवा, मदत करा. लक्ष्मीबाई चे मन सहानुभुतीने भरुन आले. महाराज व्यसनरुग्न आहेत तर?वैद्याच्या सहाय्याने यातुन मार्ग काढण्याचे त्यांनी मनोमन ठरवले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. २०-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – ९.
महाराजांना त्यांच्या विकृतव्यसना पासुन मुक्त करण्याचे आश्वासन दिल्या वर दुसर्या दिवशी त्यांनी भेट दिलेल्या पालखीतुन महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याचे निश्चित करुन महाराज निघुन गेलेत. दुसर्या दिवशी महाराणी पालखी तुन व महाराज त्यांच्या लाडक्या सिध्दबक्ष हत्ती ठुमकत पुढे चालला होता यथासांग पुजा झाली. बरेच दिवसांनी राणींचे मन प्रथमच सहानुभुतीने भरुन गेले. पती दर्शनाने त्या मुग्ध झाल्या. पुजे च्या वेळी काशीयात्रेचा संकल्प सोडला.
दुसर्या दिवशी पासुन काशीयात्रे ची तयारी सुरु झाली. ही सारी पाहुन गांगरुन गेलेल्या मनुला मावशी म्हणाल्या देशाटन म्हणजे महापर्वणी, अनेक प्रजाजन भेटतात, त्यांची दुःख, वेदना जाणुन त्या निवारण्याचा प्रयत्न करावा लागतो, त्यांच्याशी बोलावं, मिसळाव लागते. त्यांची मनं सांभाळावी लागतात. मनू तुच या दौलतीस वाढवा घालुन प्रजेस सांभाळशील. एक दिवस हिच झाशी तुझ्या जयजयकाराने दिपुन जाईल. मावशीच्या अंतरंगात चित्र साकारुं लागले. . . . धावत्या अबलख घोड्यावर स्वार झालेली झाशीची राणी, शुभ्रवेश, गळ्यात मौक्तीक माला, अंगी चिलखत, हातात ढाल तलवार असलेला उगवलेला उंच दिमाखदार हात, तेजस्वी डोळे, स्वाभिमानी चेहरा. . .
माघ महिन्यांत यात्रेकरुंचा थोरला कबिलाचे प्रस्थान झाले. सुवासिनींनी राजाराणीस ओवाळले, पुष्पवर्षाव झाला नी राजाराणीचे दोन सुंदर अलंकृत अश्व वेशीबाहेर पडले. आपली राणी पालखीत न बसतां घोड्यावर बसते याचाच सर्वांच्या चेहर्यावर अभिमान होता. एकच भाव होता, झाशी चा वारस राणीचे उदरी यावा. . . .
यात्रेचा काफीला ठीकठीकाणी मुक्काम करुन तिथल्या प्रजाजनांच्या समस्या, व्यथा त्यांची राणी समजुन घेते, सामान्य मानसागत् त्यांच्यात मिसळते हे पाहुन प्रजाजन स्तंभीत झाली. कुठे नाच गाणे, कुठे नाटके, कुठे कथा, कुठे पोवाडे, गीत करत मजेत काफीला पुढे जात होता. चित्रकुट मुक्कामावर तर तानु मावशीने रामाच्या कथा रंगुन सांगीतल्या. अवघं वातावरणच जणुं राममय झालंय ! हसत खेळत यात्रा प्रयाग कडे निघाली. पुर्वजांची श्राध्दे होत होती. पुर्वीचा इतिहास, पुर्वजांच्या कथा ज्या तानुमावशीच्या मुखोद्गत होत्या. सखुबाई चे बंड, तीने पोटच्याच मुलाला मारण्या साठी कसे कारस्थान रचले होते, स्वतःचा मुलगा रामचंद्राचा मृत्यु व्हावा म्हणुन तलावात फाळ वर करुन भाले रोवुन कसे ठेवले होते, पण रामचंद्रांनी कंपनी सरकारला कालपी क्षेत्राचा बंडावा मोडण्यासाठी सत्तर हजार, चारशे घोडे स्वार, दोन तोफा, हजारो पैदल सैनिक देऊन मदत केली होती ती जाण ठेवुन कंपनीसरकारच्या वफादारांना सखुबाई च्या कटाचा सुगावा लागल्याने त्यांनी वेळीच कळवल्यामुळे त्यावेळी रामचंद्र वाचले, पण अचानक २८ वर्षांच्या रामचंद्राचा मृत्यु झाला. रघुनाथराव, शिवरामभाऊ वगैर्यांच्या आठवणी सांगत यात्रा प्रयागला पोहचली.
गंगेवरील घाट, स्थाने, देवदर्शन, त्रिवेणी संगमात वेणीदान, घाटावर अनेकांकडुन होणारे पितृतर्पण ! मोरोपंतां नी सुध्दा राणीसाहेबांच्या आईचे तर्पण केल्याचे पाहुन त्या गलबलुन गेल्या. त्या नंतर यात्रा काशीकडे निघाली. काशीच्या कमिशनरांना कळविल्यामुळे राजांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. ब्रिटिश सेना वेशीपाशी राजांना सामोरी आली. राजाराणीचा जयजयकार होत त्यांना सभास्थानी आणण्यांत आले. सर्वांनी उभे राहुन अभिवादन केले. पण एक व्यक्ती बेदारकपणे बसलेला पाहुन राजांनी त्याला बखोटीस धरुन उभे केल्यावर तो चिडुन म्हणाला, आम्ही काशीचे धनिक सावकार अन् आमचा एवढा अपमान?आम्ही कंपनी सरकारचे नोकर. . एखाद्या मांडलिक राजासाठी. . . फार बोललात ! हा सन्मान व्यक्तीचा नसतो तर राज्याच्या मातीचा, देशप्रितीचा असतो. त्याने माफी मागीतल्यावर दिलज माई होऊन प्रकरण मिटले. राणीसाहेबांना बरे वाटले. राजांच्या देवदर्शनाची सर्व व्यवस्था चोख ठेवल्या गेली. अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेली ब्रम्हपुरी पाहुन राणीसाहेब थक्क झाल्या. सर्व यात्रीक घाटावर मनसोक्त फिरत होते. गंगेतुन वाहणारी घाण बघुन राणीसाहेबां ना भडभडुन उलटी झाली. प्रकृती एकदम बिघडली. तानुमावशीला आलेली वेगळी शंका, वैद्याच्या नाडीपरीक्षणाने खरी ठरली. झाशीचा वारस येण्याची आनंद वार्ता राजांना कळल्यावर ते आनदाने भारवुन गेले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – १०.
राणीसाहेब गर्भवती असल्याच्या आनंदवार्तेने सर्वजन, विशेषतः राजेंना अतिशय आनंद झाला. खरं म्हणजे जगनन्नाथपुरीला जायचे होते पण. . . . या पुढची यात्रा पालखीतुन झाला. काशीला पोहोचल्यावर चैत्रगौरीचा समारंभ थाटात पार पडला. या समारंभातच ही आनंद वार्ता सर्वांना सांगण्यात आली. डोहाळे फार कडक, पहिले चार महिने फारच जड गेले तरी त्या अधुनमधुन राजांना कान पिचक्या देतच असे. राजे त्यांची सर्वतो परी काळजी घेत होते. राणीसाहेब ! ईश्वर आपले मनोरथ पुर्ण करतील. आतां ४-५ महिने सर्व विचार, कामे बाजुला सारुन फक्त येणार्या बाळावर लक्ष केंद्रीत करा.
मार्गशीर्ष एकादशीला राणी लक्ष्मी बाईंनी पुत्ररत्नास, झाशीच्या भावी राजास जन्म दिला. राजेंच्या आनंदाला तर पारावारच उरला नाही. बारशाचा मोठा थाट, घरोघरी गुढ्या तोरणे, सडा, रांगोळ्या, हत्तीवरुन पेढ्यांच्या थाळ्या, सुवासिंनींच्या ओट्या भरणे, भजन किर्तन, कलावंतीणींचे नृत्य आनंदाला सगळीकडे ऊत आला.
आणि या आनंदावर विरजण पडले. २-२॥ वर्षाच्या दामोदरास ताप येऊ लागला. राणीच्या डोळ्यांना धारा. . . सर्व इलाज, उपचार, देवधर्म अनुष्ठाने वाया गेले. मायबापाच्या मांडीवर चिमण्या दामोदरने प्राण सोडले.
राजे गंगाधरराव मोडुन पडले. म्हणाले तानुबाई ! पहिला पुत्र व पत्नी रमाबाई दोघेही देवाघरी गेल्यावर जीवन रिक्त वाटत होते पण लक्ष्मीबाईच्या आगमनाने मन टवटवीत, प्रफुल्लीत झाले होते. त्यांना पुत्र झाल्याने आम्हाला स्वर्गीय आनंद झाला होता. पण दैवाला आमचे सुख पहावले नाही. आमच्यातील सहनशक्ती संपली. नाही सहन होत म्हणुन हमसु हमसु रडु लागले. आणि राणीसाहेब? त्यांचा विलाप तर बघवत नव्हता. पण पुढचं सारं करणं भाग होतं. राजे लडखडतव उठले अन् भोवळ येऊन धाडकण पडले. शुध्द हरपली. . राणी साहेबांचा हंबरडा सर्वांचीच ह्रदये चिरीत गेली.
गेल्या ६-७ महिन्यापासुन किल्ल्यात नुसती स्मशानशांतता होती. राजे अगदी कोलमडुन गेले. मनाच्या विषन्नतेने कंबर दुखी, पाठदुखी आटोक्यात येत नव्हती. त्यात त्यांच्या मोठ्या बंधुंनी ठेवलेल्या कंचनीचा पुत्र, म्हणजे पुतण्या अलिबहादुर कपटकारस्थाने करुन छळत होता. त्यामुळे त्याचे महाल जप्त केले. शांती हरवुन बसलेल्या राजेंना राणी साहेब हरप्रकारे समजावत पण, संताप, चीड, राग, आततायी वर्तन. . . यामुळे अलिकडे दोघांतील संवाद भांडणाणेच संपत असत. राजे कांहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. प्रकृती खालावतच होती.
अशातच घोडे विकणारा सौदागार घोडे घेऊन आला. राणीसाहेब अश्वपरीक्षे साठी येताच सौदागाराने कुर्निसात करुन दोन घोडे समोर केले. राणींनी दोन घोडे मंडलाकार फिरवुन आणले व तिसर्या घोड्यावर रपेट करुन आल्यावर आसनस्थ झाल्या. सौदागारा ! घोडा कुशीत दुखावला आहे ही गोष्ट निदान आमच्याकडे येतांना तरी लपवायला नको होती. हे घोडे आम्ही व्यापारउद्दीम किंवा गाडीला जुंपण्यासाठी नव्हते घेत तर आम्हाला पाठीवर घेऊन जाण्यासाठी हवे त एवढंही भान असु नये?राणींनी केलेली अचुक, अप्रतिम अश्वपरीक्षा पाहुन प्रथम तो आवाक झाला, पण त्याच्याकडुन झालेली चुक लक्षात येताच तो पायी कोसळुन, क्षमा मागुन परत असं घडणार नाही हे कबुल केले. त्याकाळी अश्वपरीक्षेत तीनच लोक तज्ञ होते. नाना साहेब, शिदे व स्वतः मनुबाई.
अश्व विकत घेतल्याचे कळताच, राजेसाहेब चिडुन म्हणाले, हवेत कशाला घोडे?कुठला युवराज बसणार?आमची मनःस्थिती काय अन् करतां काय?महाराज ! पुत्रवियोग आम्हालाही झालाय, पण राज्य चालवणार्यांनी रडत बसुन चलायचे नाही. चालवा राज्य. . . चालवा. . .
वादावादी झाली की, त्या तानु मावशी जवळ येऊन मन मोकळं करत. मग त्या लक्ष्मीबाईची समजुत घालत. मनूताई शांत व्हा. महालक्ष्मीला शरण जा. तीच तारणहारी आहे. अहिल्यादेवींचा आदर्श समोर ठेवा. त्यांच्या समोर किती प्रकारची संकटे, घरांतील, राजकारणातील समाजकारणातील, धार्मिक, आर्थिक, पण सार्यांशी समर्थपणे झुंज देत शर्थीने, पुरुषार्थाने सामना केलाच ना?मावशी ! त्यांच्याइतके धैर्य आमच्याकडे कुठे? विदिर्ण झालेले महाराज बघवत नाही. एखादा बालक दत्तक घ्यावा का?एक दिवस ज्वरक्लांत महाराजा जवळ बसल्या असतांना दत्तकाचा विषय काढीत म्हणाल्या, आपले मुळ पुरुष रघुनाथ रावांच्या धाकटे पुत्र खंडेरावांचा पुत्र आनंदा बद्दल. . . राणीसाहेब उत्तम विचार. . . . झाशीच्या वारसाच्या चिंतेने ह्रदय भुंग्याप्रमाणे पोखरत आहे. ब्रिटिशांचा अमलफैल जोरात. . . . तलवारी गंजुन गेल्यात. दिल्लीचा राजा वृध्द ! ग्वाल्हेरचा राजा अज्ञान, हैदर तर इंग्रजभक्त. . . . वारस नसला तर झाशी ताब्यात घ्यायला आयतेच निमित्य इंग्रजांना मिळेल. त्या दत्तकाच्या तजविजीस लागल्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-२-२०२१.






