“1 सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ५ September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ५ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९६५ ते २९७६ चे पारायण आपण करणार आहोत.
५ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ४७६ ते ५००,
476-15
तया एका नाम क्षरु । येराते म्हणती अक्षरु । इही दोहीचि परी संसारु । कोंदला असे ॥476॥
त्यातील पहिल्याचे नांव क्षर; व दुसऱ्याचे नांव अक्षर. या दोघांनीच हे संसारनगर व्यापून टाकले आहे. 76
477-15
आता क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु । हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचू गा ॥477॥
आता ह्यातील क्षर कोणता व अक्षराचे लक्षण काय, ही सर्व तुला विशद करून सांगतो. 77
478-15
तरी महदहंकारा- । लागुनिया धनुर्धरा । तृणांतीचा पांगोरा- । वरी पै गा ॥478
तरी, अर्जुना महत्तत्त्व व अहंकारापासून गवताच्या काडीपर्यंत. 78
479-15
॥ जे काही साने थोर । चालते अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मनबुद्धीसि जे ॥479॥
जे काही लहान थोर, स्थावर जंगम, किंवा मन व बुद्धि यांचा विषय होऊ शकणारे 79
480-15
जेतुले पांचभौतिक घडते । जे नामरूपा सांपडते । गुणत्रयाच्या पडते । कामठा जे ॥480॥
जे पंचमहाभूताचे कार्य आहे; नामरूपात सांपडले, व तीन गुणांच्या कक्षेत येते. 480
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-15
भूताकृतीचे नाणे । घडत भांगारे जेणे । काळासि जू खेळणे । जिही कवडा ॥481॥
ज्या पंचमहाभूतरूप सुवर्णाने अनंत आकृतीचे प्राणीरूप नाणे पाडले गेले आहे, व ज्या आकाररूप कवड्यांनी काळाचा जुगार नित्य चालू आहे. 81
482-15
जाणणेचि विपरीते । जे जे काही जाणिजेते । जे प्रतिक्षणी निमते । होऊनिया ॥482॥
जे जे काही विपरीत ज्ञानाचा विषय असते, व प्रतिक्षणी उपन्न होऊन नाश पावते. 82
483-15
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचे आंग । हे असो बहु जग । जया नाम ॥483॥
अरे, भ्रांतिरूप काष्ठांनी बनविलेला सृष्टीचा सांगाडा, हे असो; थोडक्यात म्हणजे जे जग या नांवाने प्रसिद्ध आहे. 83
484-15
पै अष्टधा भिन्न ऐसे । जे दाविले प्रकृतिमिसे । जे क्षेत्रद्वारा छत्तिसे । भागी केले ॥484॥
जे सातव्या अध्यायात अष्टधा प्रकृतिरूपाने वर्णिले आहे व ज्यांचे तेराव्यात छत्तीस प्रकारांनी क्षेत्राच्या रूपाने वर्णन आहे. 84
485-15
हे मागील सांगो किती । अगा आताचि जे प्रस्तुती । वृक्षाकार रूपाकृती । निरूपिले ॥485॥
हे मागील वर्णन कशाला ? आतांच ह्याच अध्यायात वृक्षाच्या रूपाने तुला जे वर्णन करून सांगितलें; 85
486-15
ते आघवेचि साकारे । कल्पुनी आपणपया पुरे । जाले असे तदनुसारे । चैतन्यचि ॥486॥
त्या सर्व साकारवस्तु ह्या आपल्या वास्तव्याच्या जागा आहेत असे कल्पून. त्या त्या आकाराने हे चैतन्यच नटले आहे. 86
487-15
जैसा कुहा आपणचि बिंबे । सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे । मग क्षोभला समारंभे । घाली तेथ ॥487॥
ज्याप्रमाणे सिंह विहिरीत आपलेच प्रतिबिंब पाहून, त्यायोगे दुसऱ्या सिंहाच्या शंकेने क्रुद्ध होतो व त्या भरांत आत उडी घेतो. 87
488-15
का सलिली असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसे । अद्वैत होऊनि तैसे । द्वैत घेपे ॥488॥
(आकाश सर्वव्यापक असल्यामुळे त्याच्या प्रतिबिंबाला वावच नाही तरीही ) जल ह्या उपाधीने युक्त असलेल्या आकाशात पुन्हा आकाशाचेच प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे अद्वैत आमचैतन्य हे कधींही द्वैत होणे शक्य नसून उपाधियोगे द्वैत बनल्यासारखे दिसते, 88
489-15
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरी । आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ ॥489॥
अर्जुना, याप्रमाणे, साकार नगराची कल्पना करून आत्मा तेथे स्वस्वरूपविस्मृतीची निद्रा घेतो. 89
490-15
पै स्वप्नी सेजार देखिजे । मग पहुडणे जैसे तेथ कीजे । तैसे पुरी शयन देखिजे । आत्मयासी ॥490॥
स्वतः अंथरुणावर असतांनाच स्वप्नात पुन्हा जसे अंथरूण तयार करून त्यावर झोप घ्यावी, त्याप्रमाणे, सर्वगत आत्मा अज्ञानउपाधीने पुन्हा शरीररूप नगर उत्पन्न करून तेथे झोप घेतो. 490
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
491-15
पाठी तिये निद्रेचेनि भरे । मी सुखी दुःखी म्हणत घोरे । अहंममतेचेनि थोरे । वोसणाये सादे ॥491॥
मग त्या निद्रेच्या भरात मी सुखी, मी दुःखी असे म्हणत घोरत पडतो व त्याच घोरांत मी आणि माझे असे मोठघाने बरळत असतो 91
492-15
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझे हे ना ॥492॥
हा पहा, माझा पिता, ही आई हा पहा मी गोरा आहे, काळा आहे, अव्यंग आहे, आणि हा मुलगा, ही स्त्री, हे द्रव्य, ही माझीच नव्हत का ? 92
493-15
ऐसिया वेघोनि स्वप्ना । धावत भवस्वर्गाचिया राना । तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥493॥
अशा स्वप्नावर आरूढ होऊन स्वर्गसंसारादि अरण्यात धावा ठोकणारे जे चैतन्य त्याला, अर्जुना, क्षर पुरुष म्हणतात. 93
494-15
आता ऐक क्षेत्रज्ञु येणे । नामे जयाते बोलणे । जग जीवु का म्हणे । जिये दशेते ॥494॥
त्याचा स्पष्ट अर्थ अस की, मागे जो क्षेत्रज्ञ म्हणून सांगितला किंवा येथे जगात ज्याला जीव असे म्हणतात. 94
495-15
जो आपुलेनि विसरे । सर्व भूतत्वे अनुकरे । तो आत्मा बोलिजे क्षरे । पुरुष नामे ॥495॥
जो स्वस्वरूप विस्मृतीने सर्व भूतांसारखा होतो (म्हणजे ज्या ज्या उपाधीशी तादात्म्य पावेल ती मीच आहे असे म्हणतो) त्या जीवाम्याला क्षरपुरुष असे म्हणतात. 95
496-15
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता । वरी देहपुरी निदैजता । पुरुषनामे ॥496॥
त्याच्या “ पुरुषतेची” उपपत्ति दोन तऱ्हेने लागते वस्तुस्थितीने तो परिपूर्ण आहे म्हणून तो ” पुरुष ” आहेच; किंवा देहपुरीमध्ये शयन करणारा अशा अर्थानेही त्याला “ पुरुषता ” आहे 96
497-15
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला । जे उपाधीचि आतला । म्हणौनिया ॥497॥
पण, असा हा “ पुरुष ” उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे त्याजवर क्षरपणाच नसता आळ आला. 97
498-15
जैसी खळाळीचिया उदका- । सरसी आंदोळे चंद्रिका । तैसा विकारा औपाधिका । ऐसाचि गमे ॥498॥
खळाळीच्या पाण्याच्या हालचालीने जसा आतील चंद्रही हलत आहे असे दिसते, (वस्तुतः ते हलणे फक्त जलाचे आहे) त्याप्रमाणे, उपाधींच्या विकारांमुळे हाही विकारी आहे असे वाटते. 98
499-15
का खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तै सरिसीच भ्रंशे । तैसा उपाधिनाशी न दिसे । उपाधिकु ॥499॥
ते खळाळीचे पाणी आटले की त्यातील प्रतिबिंबही त्याच क्षणी नाश पावते, त्याप्रमाणे उपाधीच्या नाशाने औपाधिक (उपाधि युक्त) क्षरचैतन्यही प्रतीतीला येत नाही. 95
500-15
ऐसे उपाधीचेनि पाडे । क्षणिकत्व याते जोडे । तेणे खोंकरपणे घडे । क्षर हे नाम ॥500॥
ह्याप्रमाणे, उपाधीच्या योगाने चैतन्याला क्षणिकत्व येऊन त्यालाच न्यूनतादर्शक क्षर असे नांव प्राप्त झाले; 500
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २४८ वा. ५, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९६५ ते २९७६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २९६५
जळो ते जाणीव जळो ते शाहाणीव । राहो माझा भाव विठ्ठलपायी ॥१॥
जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायी ॥धृपद॥
जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचे ॥२॥
जळो हे शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठी ॥३॥
तुका म्हणे येथे अवघेचि होय । धरी मना सोय विठोबाची ॥४॥
अर्थ
शाब्दिक ज्ञानाला व शहाणपणाला आग लागो व माझा खरा भक्तीभाव विठ्ठलाच्या पायीच राहो. आचार आणि विचाराला आग लागो आणि माझे मन विठ्ठलाच्या पायी स्थिर राहो. लोक लौकिक दंभ व मान यांना आग लागो व माझ्या मनाला विठ्ठलाचेच ध्यान लागो. हे शरीर व शरीरासंबंधी जे कोणी असतील त्या सर्वाना आग लागो आणि माझ्या कंठामध्ये एक परमानंदच राहो. तुकाराम महाराज म्हणतात, “हे मना असे केल्यानेच सर्व काही साध्य होणार आहे त्यामुळे विठोबाचाच मार्ग तू धर. ”
अभंग क्र. २९६६
विश्वास धरूनि राहिलो निवांत । ठेवूनिया चित्त तुझे पायी ॥१॥
तरावे बुडावे तुझिया वचने । निर्धार हा मने केला माझा ॥धृपद॥
न कळे हे मज साच चाळविले । देसी ते उगले घेइन देवा ॥२॥
मागणे ते सरे ऐसे करी देवा । नाही तरी सेवा सांगा पुढे ॥३॥
करावे काही की पाहावे उगले । तुका म्हणे बोले पांडुरंगा ॥४॥
अर्थ
हे देवा मी तुझ्या ठिकाणी विश्वास ठेवून आणि माझे चित्त तुझ्या पायाच्या ठिकाणी ठेवून निवांत झालो आहे. आता तुझे वचन ऐकायचे फक्त एवढेच करायचे मग मी तुझ्या वचनाच्या पुढे तरलो किंवा बुडलो काय त्याविषयी काहीही काळजीच करायची नाही असा निर्धार माझ्या मनाने केला आहे. तू मला खरे देतो आहेस की मला खोटे देवून फसवितो आहेस हे मला काही कळत नाही परंतू जे काही मला तू देशील तेच मी गुपचूप घेईन देवा. देवा माझे मागणेच बंद व्हावे असे तुम्ही काहीतरी करा नाहीतर तुमची पुढे कोणती सेवा करु ते तुम्ही मला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा यापुढे मी काही करु की केवळ साक्षीरुपाने पाहू यासंबंधी तुम्हीच मला सांगा पाडूरंगा. ”
अभंग क्र. २९६८
देवाचिये पायी देई मना बुडी । नको धावो वोढी इंद्रियांचे ॥१॥
सर्व सुखे तेथे होती एकवेळे । न सरती काळे कल्पांती ही ॥धृपद॥
जाणे येणे खुंटे धावे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥
सांगणे ते तुज इतुलेचि आता । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥
तुका म्हणे तुझे होती उपकार । उतरो हा पार भवसिंधु ॥४॥
अर्थ
हे मना देवाच्या पायीच तू बुडी दे इंद्रियांच्या उडीने उगाचच स्वैरभैर धावू नकोस देवाच्या पायाच्या ठिकाणी गेले की सर्व सुखाचा लाभ एकाच वेळी आपल्याला प्राप्त होतो व ते सुख असे आहे की ते कल्पांतातही संपत नाही ते सुख अविनाशी आहे. अरे मना तू जर देवाच्या पायाच्या ठिकाणी बुडी दिली तर तुला जन्ममरणाच्या येरझाऱ कराव्या लागणार नाही आणि दु:खाचे डोंगर ओलांडावे लागणार नाही. हे मना आता तुला एवढेच एक सांगायचे आहे की परधन व परस्त्री हे विषतुल्य तू मान. तुकाराम महाराज म्हणतात, “हे मना माझ्यावर उपकार करणे हे तुझ्या हातात आहे तू जर देवाच्या पायी बुडी दिली तर मी हा भवसागर उतरुन जाऊ शकतो. ”
अभंग क्र. २९६९
आम्ही विठ्ठलाचे दास झालो आता । न चलेचि सत्ता आणिकाची ॥१॥
नावरे तयासी ऐसे नाही दुजे । करिता पंढरिराजे काय नव्हे ॥धृपद॥
कोठे तुज ठाव घ्यावयासी धावा । मना तू विसावा घेई आता ॥२॥
इंद्रियांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगे संचार चाली तुज ॥३॥
तुका म्हणे आम्ही जिंकोनिया काळ । बैसलो निश्चळि होऊनिया ॥४॥
अर्थ
आता आम्ही विठ्ठलाचे दास झालो आहोत त्यामुळे आमच्यावर इतर कोणाचीही सत्ता चालत नाही. पंढरीराजाला आवरता (आकळता) येणार नाही असा येथे दुसरा कोणीही नाही आणि पंढरीरायाने ठरविले तर तो काय करु शकत नाही ? अरे मना आता त्या विठ्ठलावाचून तुला कोठे धाव घ्यायची आहे व धाव घेण्यासाठी चांगले ठिकाण तरी कोठे आहे त्यामुळे तू आता विठ्ठलाच्याच ठिकाणी विसावा घ्यावा. अरे मना ज्या इंद्रियांमध्ये संचार करुन तू व्यापार करत होता व अनेक प्रकारचे व्यवहार करत होता तो व्यवहारच आम्ही आता मोडून टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आम्ही काळाला जिंकून निश्चिंत होऊन बसलो आहोत. ”
अभंग क्र. २९७०
सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला । नाही तरि गेला जन्म वाया ॥१॥
करिता भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरी वाहावसी ॥२॥
काही न लगे एक भावचि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥
अर्थ
हे लोकांनो मी तुम्हाला सांगतो की तुम्ही विठ्ठलाचेच भजन करा त्याचीच भक्ती करा त्याला भजा जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा जन्मच वाया गेला असे समजा. अहो तुम्ही जर संसारासाठी अनेक प्रकारचे कष्ट करत राहाल तर विठ्ठलाची भक्ती करण्यापासून तुम्ही अंतराल आणि भवनदीच्या पुरामधे वाहात जाल. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी दुसरे काहीच लागत नाही केवळ एकनिष्ठ भक्तीभाव लागतो हे मी तुम्हाला विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो आहे. ”
अभंग क्र. २९७१
शब्द झणी येऊ नेदी दृष्टीपुढे । छळवादी कुडे अभक्तते ॥१॥
जळो ते जाणींव जळो त्याचे बंड । जळो तया तोंड दुर्जनाचे ॥२॥
तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडू डोया न धरू भीड ॥३॥
अर्थ
छळवादी आणि अभक्त हे फारच वाईट ते चांगले शब्द आपल्या कानात पुढे आपल्या दृष्टीपुढे देखील येऊ देत नाहीत. अशा या दुर्जन मनुष्याच्या शब्दज्ञानाला तसेच त्याच्या बंडखोरपणाला जाळ लागो आणि त्याचे तोंड देखील जळून जाओ. तुकाराम महाराज म्हणतात “जर असे मनुष्य सत्प्रवृत्ती असलेल्या माणसाला छळण्याकरता आले तर आम्ही त्यांची डोके फोडून त्यांना हाकलून देऊ त्यांची भीड आम्ही धरणार नाही. ”
अभंग क्र. २९७२
भले लोक नाही सांडीत ओळखी । हे तो झाली देखी दुसऱ्याची ॥१॥
असो आता यासी काय चाले बळ । आपुले कपाळ वोढवले ॥धृपद॥
समर्थासी काय कोणे हे म्हणावे । आपुलिया जावे भोगावरी ॥२॥
तुका म्हणे तुम्हा बोल नाही देवा । नाही केली सेवा मनोभावे ॥३॥
अर्थ
चांगले लोक कधीही कोणाची ओळख विसरत नाही परंतू दुसऱ्याचे पाहून आता चांगले लोक देखील ओळख विसरायला लागले आहेत असे दिसत आहेत. आता यापुढे आपले काय बळ चालणार आहे आपले पापच ओढावले आहे असेच म्हणावे लागेल. याबद्दल आता समर्थाला काय म्हणावे आता आपल्या भोगावरच आपण लोटून दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी तुमची मनोभावे सेवाच केली नाही त्यामुळे मी जे काही बोलतो आहे देवा ते तुम्हाला बोलतच नाही. ”
अभंग क्र. २९७३
देवाचे भजन का रे न करीसी तैसे । अखडं हव्यासे पीडतोसी ॥१॥
देवासी शरण का रे नवजासी तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागी ॥ध्रु॥
देवाचा विश्वास का रे नाही तैसा । पुत्रस्नेहे जैसा गुंतलासी ॥२॥
का रे नाही तैसी देवाची ते गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥३॥
का रे नाही तैसे देवाचे उपकार । माया मथ्या भार पितृपूजना ॥४॥
का रे भय वाहासी लोकाचा धाक । विसरुनीया एक नारायण ॥५॥
तुका म्हणे का रे घातले हे वाया । अवघे आयुष्य जाया भक्तिविण ॥६॥
अर्थ
अरे प्रपंचामध्ये अखंड हव्यासाने तू किती कष्ट सहन करतोस त्या प्रकारे तू देवाचे भजन का रे नाही करीत ? अरे बगळा माश्याला पकडण्यासाठी जसा ध्यानस्थ बसतो त्या प्रकारे इतर माणसांना त्रास देण्यासाठी तू का बसतोस परंतू देवाला त्या प्रकारे शरण का जात नाहीस ? अरे जसा तू पुत्राच्या मोहामध्ये गुंतून बसला आहेस तसा देवावर विश्वास का तू ठेवला नाहीस ? अरे तुला पत्नी नागवून ठेवते तरी देखील तुला तिचीच गोडी वाटते त्या प्रकारची गोडी तुला देवाविषयी का रे नाही वाटत ? अरे तू मिथ्या मायामध्ये गुंतून संसाराचा भार खांदयावर वाहून तुला जन्माला घातल्याबद्दल मातृपितृ पूजन जसे तू करतोस तसेच तू देवाचे उपकार का बरे मानत नाहीस ? अरे सर्वश्रेष्ठ एक नारायणाला विसरुन तू लोकांचे भय व त्यांचा धाक का वाहतो आहेस ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे एका भक्तीवाचून तू तुझे सगळे आयुष्य वाया का घातले आहेस ? ”
अभंग क्र. २९७४
मुके होता तुझ्या पदरीचे जाते । मूर्ख ते भोगिते मीमीपण ॥१॥
आपुलिये घरी मैंद होऊनी बसे । कोणासीहि ऐसे बोलो नको ॥२॥
तुका म्हणे तुम्हा सांगतो मी खूण । देवासी ते ध्यान लावुनि बैसा ॥३॥
अर्थ
अरे मूर्खा तू मी मी अशा अहंकारामुळे विविध प्रकारचे दु:ख भोगतोस परंतू त्यापेक्षा तू जर मुका होऊन बसलास तर तुझ्या पदरचे काही जाते काय ? त्यापेक्षा आपल्या स्वत:च्या घरी मैंद होऊन बसलास तर ते योग्य राहील कोणापुढेही जाऊन मीपणाचा अभिमान विनाकारण बोलत जाऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, “मी तुम्हाला तुमचे कल्याण होईल असे हित सांगतो केवळ देवाचे ध्यान लावून तुम्ही शांत बसा. ”
अभंग क्र. २९७५
आषाढी निकट । आला कार्तिकीचा हाट ॥१॥
पुरे दोन्हीच बाजार । न लगे आणीक व्यापार ॥धृपद॥
तेचि घ्यावे तेचि घ्यावे । कैवल्याच्या रासी भावे ॥२॥
काही कोणा नेणे । विठो वाचूनि तुका म्हणे ॥३॥
अर्थ
आषाढी संपली की जवळच लगेच कार्तिकीचा बाजार येत असतो. वारकऱ्यांसाठी हे दोनच बाजार पुरेसे आहेत इतर कोणताही व्यापार त्यांना लागतच नाही. अहो येथे तुम्ही केवळ एक हरीनामच घ्या हरीनामच घ्या आणि कैवल्याच्या राशी आपल्या बांधून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, “निष्ठावंत वारकरी येथे एका विठोबावाचून काहीही व कोणालाही जाणत नाहीत ओळखत नाहीत. ”
अभंग क्र. २९७६
देऊनिया प्रेम मागितले चित्त । जाली फिटाफिट तुम्हा आम्हा ॥१॥
काशाने उदार तुम्हांसी म्हणावे । एक नेसी भावे एक देसी ॥ध्रु.॥
देऊनिया थोडे नेसील हे फार । कुंटिसी विचार अवघियांचा ॥२॥
तुका म्हणे आम्हा भांडवल चित्त । देउनी दुश्चित पाडियेले ॥३॥
अर्थ
हे देवा, तुम्हीं आम्हांला प्रेम देऊन आमचें चित्त मागितलें त्या योगानें उभयतांची फिटाफीट झाली. एका भावार्थानें (कपटानें) घेऊन त्याच्या मोबदला दुसरें जर देतां तर तुम्हांला उदार कसें म्हणावें? प्रेम देऊन आमचें फार मोठें असलेलें चित्त घेऊन जातोस. त्या योगानें सर्व इंद्रियांचा विचार कुंठित करतोस. तुकाराम महाराज म्हणतात,आमचें चित्त हें मुल्य भांडवल त्याचा तूं अभिलाष करून आम्हांला ओस पाडतोस, नागवून सोडतोस.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

